विलास चाफेकर
वेश्या या शब्दानेही तथाकथित समाजाला अनेकदा धडकी भरते, किंवा त्याला हा शब्द ओंगळवाणा वाटतो. पण याच समाजातील माणसे वेश्यांकडे जात असतात आणि त्यावरच त्या महिलांचाही व्यवसाय चालतो. मात्र हा समाज दांभिक आहे. लपूनछपून वेश्यांकडे जाणाऱ्या याच समाजात वेश्यांना मात्र काहीही स्थान नसते. अशा परिस्थितीत विशीतला एक तरुण शरीरविक्रय करणाऱ्या या महिलांच्या समस्या जाणून घ्यायला आणि त्या सोडवण्यासाठी कणखरपणे उभे राहतो. हा तरुण म्हणजे गिरीश कुलकर्णी आणि त्याने स्थापन केलेली संस्था म्हणजे - ‘स्नेहालय’. वास्तविक वेश्यांमध्ये एका पुरुषाने काम करणं हेच अतिशय अवघड. तेही अगदी तरुण वयात करणे हे तर फारच विलक्षण. पण अहमदनगर शहरातल्या चित्रा गल्लीतल्या वेश्यांचे दैन्य नजरेस पडल्यावर एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या तरुणाच्या मनात एक खोल कळ उमटते हेही लक्षणीय!
वेश्यांचे उजाड जीवन, त्यांना जडलेले रोग, त्यांची व्यसने, त्यांचे शोषण करणारे त्यांचे नातेवाईक, लोक, पुढारी, गुंड, पोलिस आणि लोकांमधील गैरसमज व कर्जदार, दलाल, वेश्यांची मुले व भविष्यच नसलेले त्यांचे जीवन, अल्पवयात मुलींना धंद्यात ढकलणारे स्वार्थी हात, एचआयव्ही, एडस् या आधुनिक रोगांचा विळखा असे सारेच प्रश्न अतिबिकट. पण या प्रश्नांचे आव्हान गिरीशने पेलले. उच्च शिक्षण घेत व प्राध्यापकी करीत तो या रणमैदानात उतरला आणि मग एक वेगळाच अध्याय लिहिला गेला.
गिरीशने नगरमध्ये ‘स्नेहालय’चे रोपटे लावले. त्यातून वेश्यांचे प्रश्न हाताळले, त्यांच्या मुलांना सांभाळले, लहान वयात धंद्यात आणल्या जाणाऱ्या मुलींची सुटका केली. सेक्स स्कँडल उघडकीस आणून ते घडवणाऱ्यांना न्यायालयीन लढा देऊन शिक्षा देववली. एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी यंत्रणा उभारली, दवाखाना व रुग्णालय चालवले आणि असे करता करता स्नेहालयच्या रोपट्याचा वृक्ष केव्हा झाला हे त्याच्याच लक्षात आले नाही. अर्थात यात बापूजी शिंगवींपासून अनेक तरुण सहकाऱ्यांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे.
गिरीश निगर्वी आहे, आर्जवी आहे, अन् लाघवीही आहे. त्यामुळे माणसं मिळवणं व पैसा उभा करणं त्याला जमू शकलं, त्याचबरोबर गिरीश व स्नेहालयच्या कामाची कीर्तीही दूरदूरपर्यंत पोहोचू शकली. अमीर खान सारख्या बॉलिवूडमधल्या प्रख्यात अभिनेत्यानं या कामाची दखल घेतली. अर्थात केवळ त्यामुळे स्नेहालय मोठं ठरत नाही. पण अमीर खानने दखल घेतल्यामुळे स्नेहालयला प्रसिद्धी व पैसा मिळाला, हे नाकारून चालणार नाही.
‘परिवर्तनाची पहाट’ या पुस्तकाच्या लेखिका शुभांगी कोपरकर यांनी हे सर्व प्रभावी रीतीने मांडले आहे. पण गिरीशचं चरित्र लिहिताना गिरीशमधला माणूस शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता, पण ते न झाल्याकारणाने गिरीश महामानव असल्याचा आभास निर्माण होतो. वास्तविक गिरीशला अजून खूप काम करायचं आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे वेश्यांचे जे विविध प्रश्न आहेत, ते प्रश्न का निर्माण झाले, मुळात कोणी वेश्याव्यवसाय करायला का तयार होतं, याचा चिकित्सक अभ्यास थोडक्यात का होईना, या पुस्तकात यायला हवा होता. तिसरी गोष्ट म्हणजे इतक्या अवघड कामात गिरीशने मित्रपरिवाराला कसे सहभागी करून घेतले असेल, त्याची कार्यपद्धती काय होती, प्रोसेस काय होती, कार्यकर्ते धाडसाने रेस्क्यूच्या कामात का सहभागी झाले हे मांडायला हवे होते. ते न झाल्यामुळे हे सारे आश्चर्यजनकरीत्या फरक्त गिरीशमुळे झाले, असे वाटत राहते.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘स्नेहालय’च्या कामामुळे कार्यकर्त्यांची उंची किती वाढली व ‘स्नेहालय’मुळे कोणाच्या आयुष्यात नेमका काय बदल झाला याची चिकित्सक व थोडी सविस्तर मांडणी व्हायला हवी होती. तसंच पुस्तकात पुनरुक्ती खूप आहे, जी टाळता आली असती. हा दोष टाळला तर एरव्ही पुस्तकात सांगितलेली स्नेहालयची कहाणी प्रेरणादायक आहे यात वाद नाही!
...........................................................................................
परिवर्तनाची पहाट
लेखिका : शुभांगी कोपरकर
प्रकाशन : उन्मेष प्रकाशन, पुणे
पृष्ठं : २३९
किंमत : २५० रु.
वेश्या या शब्दानेही तथाकथित समाजाला अनेकदा धडकी भरते, किंवा त्याला हा शब्द ओंगळवाणा वाटतो. पण याच समाजातील माणसे वेश्यांकडे जात असतात आणि त्यावरच त्या महिलांचाही व्यवसाय चालतो. मात्र हा समाज दांभिक आहे. लपूनछपून वेश्यांकडे जाणाऱ्या याच समाजात वेश्यांना मात्र काहीही स्थान नसते. अशा परिस्थितीत विशीतला एक तरुण शरीरविक्रय करणाऱ्या या महिलांच्या समस्या जाणून घ्यायला आणि त्या सोडवण्यासाठी कणखरपणे उभे राहतो. हा तरुण म्हणजे गिरीश कुलकर्णी आणि त्याने स्थापन केलेली संस्था म्हणजे - ‘स्नेहालय’. वास्तविक वेश्यांमध्ये एका पुरुषाने काम करणं हेच अतिशय अवघड. तेही अगदी तरुण वयात करणे हे तर फारच विलक्षण. पण अहमदनगर शहरातल्या चित्रा गल्लीतल्या वेश्यांचे दैन्य नजरेस पडल्यावर एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या तरुणाच्या मनात एक खोल कळ उमटते हेही लक्षणीय!
वेश्यांचे उजाड जीवन, त्यांना जडलेले रोग, त्यांची व्यसने, त्यांचे शोषण करणारे त्यांचे नातेवाईक, लोक, पुढारी, गुंड, पोलिस आणि लोकांमधील गैरसमज व कर्जदार, दलाल, वेश्यांची मुले व भविष्यच नसलेले त्यांचे जीवन, अल्पवयात मुलींना धंद्यात ढकलणारे स्वार्थी हात, एचआयव्ही, एडस् या आधुनिक रोगांचा विळखा असे सारेच प्रश्न अतिबिकट. पण या प्रश्नांचे आव्हान गिरीशने पेलले. उच्च शिक्षण घेत व प्राध्यापकी करीत तो या रणमैदानात उतरला आणि मग एक वेगळाच अध्याय लिहिला गेला.
गिरीशने नगरमध्ये ‘स्नेहालय’चे रोपटे लावले. त्यातून वेश्यांचे प्रश्न हाताळले, त्यांच्या मुलांना सांभाळले, लहान वयात धंद्यात आणल्या जाणाऱ्या मुलींची सुटका केली. सेक्स स्कँडल उघडकीस आणून ते घडवणाऱ्यांना न्यायालयीन लढा देऊन शिक्षा देववली. एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी यंत्रणा उभारली, दवाखाना व रुग्णालय चालवले आणि असे करता करता स्नेहालयच्या रोपट्याचा वृक्ष केव्हा झाला हे त्याच्याच लक्षात आले नाही. अर्थात यात बापूजी शिंगवींपासून अनेक तरुण सहकाऱ्यांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे.
गिरीश निगर्वी आहे, आर्जवी आहे, अन् लाघवीही आहे. त्यामुळे माणसं मिळवणं व पैसा उभा करणं त्याला जमू शकलं, त्याचबरोबर गिरीश व स्नेहालयच्या कामाची कीर्तीही दूरदूरपर्यंत पोहोचू शकली. अमीर खान सारख्या बॉलिवूडमधल्या प्रख्यात अभिनेत्यानं या कामाची दखल घेतली. अर्थात केवळ त्यामुळे स्नेहालय मोठं ठरत नाही. पण अमीर खानने दखल घेतल्यामुळे स्नेहालयला प्रसिद्धी व पैसा मिळाला, हे नाकारून चालणार नाही.
‘परिवर्तनाची पहाट’ या पुस्तकाच्या लेखिका शुभांगी कोपरकर यांनी हे सर्व प्रभावी रीतीने मांडले आहे. पण गिरीशचं चरित्र लिहिताना गिरीशमधला माणूस शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता, पण ते न झाल्याकारणाने गिरीश महामानव असल्याचा आभास निर्माण होतो. वास्तविक गिरीशला अजून खूप काम करायचं आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे वेश्यांचे जे विविध प्रश्न आहेत, ते प्रश्न का निर्माण झाले, मुळात कोणी वेश्याव्यवसाय करायला का तयार होतं, याचा चिकित्सक अभ्यास थोडक्यात का होईना, या पुस्तकात यायला हवा होता. तिसरी गोष्ट म्हणजे इतक्या अवघड कामात गिरीशने मित्रपरिवाराला कसे सहभागी करून घेतले असेल, त्याची कार्यपद्धती काय होती, प्रोसेस काय होती, कार्यकर्ते धाडसाने रेस्क्यूच्या कामात का सहभागी झाले हे मांडायला हवे होते. ते न झाल्यामुळे हे सारे आश्चर्यजनकरीत्या फरक्त गिरीशमुळे झाले, असे वाटत राहते.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘स्नेहालय’च्या कामामुळे कार्यकर्त्यांची उंची किती वाढली व ‘स्नेहालय’मुळे कोणाच्या आयुष्यात नेमका काय बदल झाला याची चिकित्सक व थोडी सविस्तर मांडणी व्हायला हवी होती. तसंच पुस्तकात पुनरुक्ती खूप आहे, जी टाळता आली असती. हा दोष टाळला तर एरव्ही पुस्तकात सांगितलेली स्नेहालयची कहाणी प्रेरणादायक आहे यात वाद नाही!
...........................................................................................
परिवर्तनाची पहाट
लेखिका : शुभांगी कोपरकर
प्रकाशन : उन्मेष प्रकाशन, पुणे
पृष्ठं : २३९
किंमत : २५० रु.