रमेश नागेश सावंत
सामाजिक जाणिवेचा उद्गार
साहित्यिक प्रकाश खरात यांचा नुकताच प्रकाशित झालेला नवा काव्यसंग्रह ‘जन्ममरण वर्दळीवर येताना’ त्यांच्या संवेदनशील कविमनाचे अथांग दर्शन घडविणारा आहे. ‘निर्मितीचा प्रदेश’ आणि ‘पार्थिव आणि अपार्थिव’ या दोन काव्यसंग्रहांनंतर बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर कवितेच्या प्रांतात आपल्या समर्थ लेखणीने कवी प्रकाश खरात यांनी आपल्या प्रगल्भ प्रतिभेचा आविष्कार ‘जन्ममरण वर्दळीवर येताना’ या काव्यसंग्रहातून साकार केला आहे.
या संग्रहातील एकूण ६६ कवितांपैकी बहुतांश कविता या त्यांच्या सामाजिक सजगतेची सार्थ प्रतीकेच आहेत तर काही कविता व्यक्तिगत संदर्भ असलेल्या आहेत. उदा. ‘निमित्त - वडिलांच्या स्मृतिदिनाचं’, ‘तू विस्तारलस मातृत्वाचं क्षितीज’, ‘कविमित्रा’ आणि या कवितांमध्ये वडील, मावशी, बालमित्र व त्याची पत्नी, आणि दादा-वहिनी यांच्याबाबतच्या कवीच्या भावनांची अतिशय प्रांजळ पण मोजक्या शब्दांत साकारलेली अभिव्यक्ती आहे. तसेच ‘तू तेजाचा वंशज’, ‘तुझा बाणेदार समुद्र’, ‘महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने’, ‘तुझ्यात विलसत होता करुणेचा चांद’. ‘तुझ्या करुणेचे स्रोत’ आणि ‘स्मरण देव आनंदचे’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कविमित्र नामदेव ढसाळ, नरीमनबाबा, मलाला आणि देव आनंद यांना संबोधून लिहिलेल्या कवितांमध्ये त्यांना वाहिलेली आदरांजली आहे. अशा विशिष्ट व्यक्तींचा संदर्भ असलेल्या काही मोजक्या कविता सोडल्या तर इतर सर्व कवितांमधून कवी खरात यांनी आपल्या नेहमीच्याच प्रगल्भ जाणिवेने त्यांच्या मनात साचून राहिलेले व त्यांना डाचत असलेले आजच्या सामाजिक वास्तवाबद्दलचे आपले मनोमय भान प्रकट केले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘नागीण’ या कवितेत ते म्हणतात…
‘हा अगतिक समुद्र, हे नातं तुटलेलं आभाळ
हे केविलवाणे वृक्ष, ही रुग्ण माती
दंशागणिक व्यक्त होणारं शहर’
अशा तऱ्हेने महानगरीय भवतालातून हरवत चाललेल्या निसर्गाबद्दलची संवेदना अतिशय उत्कट शब्दांत मांडणाऱ्या या कवीला दुर्बोध म्हणणे म्हणजे आपली संवेदना हरवून गेल्याचेच लक्षण ठरेल असे वाटते! त्यांच्या कवितेतील प्रत्येक ओळ आणि शब्दांची मांडणी जितकी भेदक आहे तितकीच ती उद्बोधकही आहे. याचप्रमाणे आजच्या स्त्रीबद्दल पुरुषाच्या शारीर भूमिकेतून व्यक्त केलेली पण सखोल चिंतनाची डूब असलेली प्रखर जाणीव ‘तू दुखरी नदी’ या कवितेत दिसून येते -
‘मी पाहतो तुला मांसलतेपल्याड -
तू दुखरी नदी आर्तपणे वाहणारी
माझ्यासमक्ष अविरत खळाळणारी…
मी शिरतो जाणीवेसह तुझ्या सखोल पात्रात
अहंतेचं वस्त्र किनाऱ्यावर ठेवून’
समकालीन अगतिक महानगरीय माणसाच्या विझत चाललेल्या प्रेम व कामभावनांचे विकल दर्शन कवी खरात यांनी ‘फणा उगारलेलं शहर’ या कवितेत कसं तरलपणे तरीही आपल्या वास्तवदर्शी नजरेने पाहिलंय ते रसिकांनी वाचून अवश्य अनुभवण्यासारखे आहे. सरतेशेवटी कवी खरात यांच्या कवितेचा एकूण आशय व प्रवाह याबद्दल डॉ. श्रीपाल सबनीस सरांनी त्यांच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत जे तथ्य सूचित केले हे ते येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते -
‘सौंदर्यवेधी कल्पनाविलास, अर्थपूर्ण प्रतिमांची पखरण, वास्तवाची व्यामिश्रता पेलण्याचे सामर्थ्य, मानवी जीवनाचा अथांग समुद्र ढवळून सत्य शोधणारी प्रवृत्ती आणि चिंतनशील काव्यात्मकतेचा उत्कट आकृतिबंध या वैशिष्ट्यामुळे प्रा. प्रकाश खरात यांची कविता रूढ काव्य वर्तुळाला भेदून नव्या दिशा व नव्या जाणिवा अभिव्यक्त करताना दिसते.’
प्रकाश खरात यांच्या या कविता काहीशा आत्मनिष्ठ असल्या तरी त्या पूर्णतः आत्मकेंद्रित नाहीत. मात्र या कविता निश्चितच त्यांच्या प्रखर सामाजिक आणि मानवीय जाणीवेचा वैश्विक उद्गार आहेत असे या काव्यसंग्रहातून साधार स्पष्ट होते.
‘जन्ममरण वर्दळीवर येताना’ (कवितासंग्रह)
कवी - प्रा. प्रकाश खरात
प्रकाशन : संवेदना प्रकाशन, पुणे
पृष्ठं : ९६
किंमत : १३०रु.
सामाजिक जाणिवेचा उद्गार
साहित्यिक प्रकाश खरात यांचा नुकताच प्रकाशित झालेला नवा काव्यसंग्रह ‘जन्ममरण वर्दळीवर येताना’ त्यांच्या संवेदनशील कविमनाचे अथांग दर्शन घडविणारा आहे. ‘निर्मितीचा प्रदेश’ आणि ‘पार्थिव आणि अपार्थिव’ या दोन काव्यसंग्रहांनंतर बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर कवितेच्या प्रांतात आपल्या समर्थ लेखणीने कवी प्रकाश खरात यांनी आपल्या प्रगल्भ प्रतिभेचा आविष्कार ‘जन्ममरण वर्दळीवर येताना’ या काव्यसंग्रहातून साकार केला आहे.
या संग्रहातील एकूण ६६ कवितांपैकी बहुतांश कविता या त्यांच्या सामाजिक सजगतेची सार्थ प्रतीकेच आहेत तर काही कविता व्यक्तिगत संदर्भ असलेल्या आहेत. उदा. ‘निमित्त - वडिलांच्या स्मृतिदिनाचं’, ‘तू विस्तारलस मातृत्वाचं क्षितीज’, ‘कविमित्रा’ आणि या कवितांमध्ये वडील, मावशी, बालमित्र व त्याची पत्नी, आणि दादा-वहिनी यांच्याबाबतच्या कवीच्या भावनांची अतिशय प्रांजळ पण मोजक्या शब्दांत साकारलेली अभिव्यक्ती आहे. तसेच ‘तू तेजाचा वंशज’, ‘तुझा बाणेदार समुद्र’, ‘महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने’, ‘तुझ्यात विलसत होता करुणेचा चांद’. ‘तुझ्या करुणेचे स्रोत’ आणि ‘स्मरण देव आनंदचे’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कविमित्र नामदेव ढसाळ, नरीमनबाबा, मलाला आणि देव आनंद यांना संबोधून लिहिलेल्या कवितांमध्ये त्यांना वाहिलेली आदरांजली आहे. अशा विशिष्ट व्यक्तींचा संदर्भ असलेल्या काही मोजक्या कविता सोडल्या तर इतर सर्व कवितांमधून कवी खरात यांनी आपल्या नेहमीच्याच प्रगल्भ जाणिवेने त्यांच्या मनात साचून राहिलेले व त्यांना डाचत असलेले आजच्या सामाजिक वास्तवाबद्दलचे आपले मनोमय भान प्रकट केले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘नागीण’ या कवितेत ते म्हणतात…
‘हा अगतिक समुद्र, हे नातं तुटलेलं आभाळ
हे केविलवाणे वृक्ष, ही रुग्ण माती
दंशागणिक व्यक्त होणारं शहर’
अशा तऱ्हेने महानगरीय भवतालातून हरवत चाललेल्या निसर्गाबद्दलची संवेदना अतिशय उत्कट शब्दांत मांडणाऱ्या या कवीला दुर्बोध म्हणणे म्हणजे आपली संवेदना हरवून गेल्याचेच लक्षण ठरेल असे वाटते! त्यांच्या कवितेतील प्रत्येक ओळ आणि शब्दांची मांडणी जितकी भेदक आहे तितकीच ती उद्बोधकही आहे. याचप्रमाणे आजच्या स्त्रीबद्दल पुरुषाच्या शारीर भूमिकेतून व्यक्त केलेली पण सखोल चिंतनाची डूब असलेली प्रखर जाणीव ‘तू दुखरी नदी’ या कवितेत दिसून येते -
‘मी पाहतो तुला मांसलतेपल्याड -
तू दुखरी नदी आर्तपणे वाहणारी
माझ्यासमक्ष अविरत खळाळणारी…
मी शिरतो जाणीवेसह तुझ्या सखोल पात्रात
अहंतेचं वस्त्र किनाऱ्यावर ठेवून’
समकालीन अगतिक महानगरीय माणसाच्या विझत चाललेल्या प्रेम व कामभावनांचे विकल दर्शन कवी खरात यांनी ‘फणा उगारलेलं शहर’ या कवितेत कसं तरलपणे तरीही आपल्या वास्तवदर्शी नजरेने पाहिलंय ते रसिकांनी वाचून अवश्य अनुभवण्यासारखे आहे. सरतेशेवटी कवी खरात यांच्या कवितेचा एकूण आशय व प्रवाह याबद्दल डॉ. श्रीपाल सबनीस सरांनी त्यांच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत जे तथ्य सूचित केले हे ते येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते -
‘सौंदर्यवेधी कल्पनाविलास, अर्थपूर्ण प्रतिमांची पखरण, वास्तवाची व्यामिश्रता पेलण्याचे सामर्थ्य, मानवी जीवनाचा अथांग समुद्र ढवळून सत्य शोधणारी प्रवृत्ती आणि चिंतनशील काव्यात्मकतेचा उत्कट आकृतिबंध या वैशिष्ट्यामुळे प्रा. प्रकाश खरात यांची कविता रूढ काव्य वर्तुळाला भेदून नव्या दिशा व नव्या जाणिवा अभिव्यक्त करताना दिसते.’
प्रकाश खरात यांच्या या कविता काहीशा आत्मनिष्ठ असल्या तरी त्या पूर्णतः आत्मकेंद्रित नाहीत. मात्र या कविता निश्चितच त्यांच्या प्रखर सामाजिक आणि मानवीय जाणीवेचा वैश्विक उद्गार आहेत असे या काव्यसंग्रहातून साधार स्पष्ट होते.
‘जन्ममरण वर्दळीवर येताना’ (कवितासंग्रह)
कवी - प्रा. प्रकाश खरात
प्रकाशन : संवेदना प्रकाशन, पुणे
पृष्ठं : ९६
किंमत : १३०रु.