श्रीकांत बोजेवार
shrikant.bojewar@timesgroup.com
...
स्वातंत्र्य मिळाले आणि देशाची, समाजाची घडी बसवण्याची प्राथमिक जबाबदारी त्या काळातील विविध क्षेत्रातील नेतृत्वाने पार पाडली. त्यानंतर स्वातंत्र्य आपल्या अंगवळणी पडले आणि हळूहळू मूल्य, निष्ठा, बांधिलकी या सर्वच बाबतीत मोठी घसरण सुरु झाली. त्या घसरणीचा उतार आपण सध्या पाहतो आहोत. स्वातंत्र्याच्या आधीचा काळ ज्यांनी अभ्यासला, स्वातंत्र्यानंतरचा भारलेला काळ ज्यांनी उद्याचा नागरिक म्हणून अनुभवला आणि आजचा काळ जे अस्वस्थपणे पाहात आहेत, अशा निवडक अभ्यासू ज्येष्ठ भाष्यकारांमध्ये न्या. नरेंद्र चपळगावकर हे एक प्रमुख नाव आहे. सुदैवाने ते विपुल लिहितात आणि अतिशय उत्तम लिहितात. गेली काही वर्षं सातत्याने, विविध निमित्ताने ते आपल्या लेखनातून त्या काळाचे, व्यक्तिंचे चित्रण करुन ठेवत आहेत. त्यातून आपोआपच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचे दस्तावेजीकरण होत आहे. त्यांच्या पुस्तकांच्या यादीत अलीकडेच पडलेली एक मोलाची भर म्हणजे 'हरवलेले स्नेहबंध' हे व्यक्तिचित्रणांचं पुस्तक.
प्रसंगोपात् ज्या व्यक्तिंशी सबंध आला, स्नेहाचे धागे जुळले परंतु त्या आता हयात नाहीत, अशांविषयीच्या आठवणी, चपळगावकरांना भावलेले त्यांचे स्वभावविशेष, जाणवलेले मोठेपण आणि त्यांच्या मृत्युनंतर लेखकाच्या मनात दाटून आलेली हूरहूर यांतून हे लेख विविध प्रसंगी जन्माला आलेले आहेत. पुस्तकातील बहुतांश व्यक्ती महाराष्ट्रातील जाणत्या वाचकांच्या माहितीतील आहेत. त्यांच्याविषयी इतरांनीही भरपूर लिहिलेले आहे, क्वचित त्या व्यक्तींनी स्वतः देखील लिहिलेले आहे. परंतु तरीही या व्यक्तिंची चपळगावकरांच्या दृष्टीतून होणारी ही भेट अनोखी आहे. कारण चपळगावकर लिहिण्याच्या ओघात त्या त्या काळासंबंधी जी माहिती देतात, विधाने करतात त्यातून बरेच नवे काही हाती लागते.
पुस्तकाची सुरुवात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्यावरील लेखापासून होते आणि शेवट पुरुषोत्तम चपळगावकर म्हणजे नरेंद्र चपळगावकर यांच्या वडिलांवरील लेखाने होते. या सर्वच लेखांचे एक सरसकट वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ गुणगान नाही. आपल्याला अमुक व्यक्तीचा असा अनुभव आला म्हणजे तो तसाच आहे, असा निष्कर्ष काढण्याचा यात अट्टहासही नाही. पी.व्ही नरसिंहराव, अरुण टिकेकर, वासुकाका जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ग. प्र. प्रधान, य. दि. फडके, श्री. पु. भागवत. बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, प्रा. मनोहर चिटणीस, संगीतप्रेमी वसंत पाटील, सुशीलाबाई भालेराव, शांताबाई किर्लोस्कर, प्रकाश मेदककर ही या पुस्तकात ज्यांच्यावर लेख आहेत त्यातील नावे. यातील अखेरची सहा नावे त्या अर्थाने व्यापक सामाजिक जीवनातील नसली, तरीही या लेखांमधून त्या व्यक्तींचे वेगळेपण, मोठेपण प्रभावीपणे मनावर ठसते.
पी. व्ही. नरसिंहराव यांचा बहुभाषिक व्यासंग सर्वपरिचित आहे, परंतु त्यांचा शास्त्रीय संगीताचा छंद फार चर्चिला गेलेला नाही. तेव्हाचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ आणि सरचिटणीस पी. व्ही. नरसिंहराव एकत्र दौरा करत, तेव्हा स्वामींच्या आग्रहावरून पीव्ही अनेकदा मालकंसचे स्वर छेडत, हे वाचताना पीव्हींविषयीचा आदर दुणावतो आणि तेव्हाच्या राजकीय वातावरणातील अभिरुचीबद्दलचा आदरही दाटून येतो. वासुदेव गणेश जोशी अर्थात 'लोकमान्यांचे हरकामे' हे एक अनोखे व्यक्तिमत्त्व पुस्तकात भेटते. पुलंच्या नारायणाचाच हा राजकीय अवतार. यांच्याविषयी खरेतर अधिक वाचायलाही आवडेल. चिरोल बदनामी खटल्यातील निकालाविरोधात अपील करण्यासाठी लोकमान्य टिळक लंडनला गेले आणि तिथे ते वर्षभर होते, असा उल्लेख या लेखात आहे. जाताना टिळकांनी ज्या तिघांना सोबत घेतले होते, त्यात वासुदेव जोशी यांचाही समावेश होता. या वर्षभराच्या काळात टिळक आणि हे तिघे कुठे राहिले, त्यांनी काय केले वगैरे तपशील मिळाला तर तो नक्कीच अनेकांना वाचायला आवडेल. तर्कतीर्थांवरील लेखात, ते प्राज्ञशाळेतून विनोबांसोबत गुपचूप निघून गेले होते आणि 'चरखा चालवून काय होणार?' म्हणून परत आले हे वाचून गंमत वाटते. मोठी माणसे घडत असतात, तेव्हा त्यांचीही आपल्या सामान्यांसारखीच घालमेल सुरु असते याची जाणीव होऊन आपण आश्वस्तही होतो. य. दि. फडकेंवर लिहिताना 'इतिहास जेवढा प्राचीन तेवढा तो सांगणाराला कमी अडचणीचा असतो', असे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे असलेले विधान चपळगावकर ओघात करून जातात. विंदांवरील लेखातला एक किस्सा फारच बोलका आहे. विद्यार्थीदशेत असताना, सत्याग्रहात भाग घेतला म्हणून विंदांना तुरुंगात टाकण्यात आले होते. हॉलिन्स नावाच्या तिथल्या इंग्रज अधिकाऱ्याने विंदांचे उत्तम इंग्रजी ऐकून त्यांच्याशी संवाद साधला, तेव्हा विंदांनी त्यांना आपण इंग्रजी वाङ्मय घेऊन बीएची परीक्षा दिली आहे, असे सांगितले. त्यावर अधिकाऱ्याने 'अभ्यासक्रमात शेक्सपीअर आहे का?' असे विचारले आणि मग दोघांनी त्याच विषयावर पंधरा मिनिटे गप्पा केल्या. जाताना त्याने विंदांचा परीक्षा क्रमांक विचारून घेतला. काही दिवसांनी बीएचा निकाल आला, तेव्हा त्या अधिकाऱ्याने टाइम्सचा अंक तुरुंगात पाठवला, त्यात विदांच्या क्रमांकाभोवती वर्तुळ केलेले होते आणि अंकावर From Hollins असे लिहिलेले होते. भावनांच्या कल्लोळांचे असे मार्मिक किस्से सर्वच लेखांत आहेत. मतभेद झाल्यावरही अनंत भालेराव आणि गोविंदभाईंना भेटण्याची इच्छा व्यक्त करणारे चिटणीस, गिरिजादेवींच्या मैफलीचा एकुलता श्रोता होण्याचे भाग्य लाभलेले वसंत पाटील, भालेरावांचा गोतावळा सांभाळणाऱ्या सुशीलाबाई आणि अखेरच्या काळातही 'तुझ्यासाठी मी काय करु' असे विचारणारे वडील, या सगळ्यांच्याच मृत्यूमुळे हरवलेले हे स्नेहबंध संग्रहणीय आहेत. शीर्षकाचा अर्थ नेमकेपणी व्यक्त करणाऱ्या चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या मुखपृष्ठाने ही भावना अधिक गडद होते.
...
हरवलेले स्नेहबंध
लेखक : न्या. नरेंद्र चपळगावकर
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पृष्ठं : १४५, किंमत : १६० रु.