अ‍ॅपशहर

भाषिक विद्वेष की सौहार्य

डॉ पद्माकर दुभाषीमाझी १९७७ साली बेळगावला विभागीय आयुक्त म्हणून नेमणूक झाली...

Maharashtra Times 2 Sep 2018, 4:00 am

डॉ. पद्माकर दुभाषी

माझी १९७७ साली बेळगावला विभागीय आयुक्त म्हणून नेमणूक झाली. पदभार स्वीकारण्याच्या दुसऱ्याच दिवशी 'अॅग्रीकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी'चे तत्कालीन अध्यक्ष रामभाऊ पोतदार यांनी मला एका कार्यक्रमाचे आमंत्रण दिले. ते मी स्वीकारले. कार्यक्रमात त्यांनी माझे स्वागत मराठी भाषेतून केले, म्हणून मी माझे भाषणही मराठीतच केले. दुसऱ्या दिवशी 'नाडोक्ष' या स्थानिक कन्नड वृत्तपत्रातून मला बजावण्यात आले, 'आम्ही दुभाषींना सांगू इच्छितो, की त्यांनी मराठीत बोलू नये.' मी सावध झालो. मी येण्याआधी काही महिने मराठी-कन्नड संघर्ष विकोपाला गेला होता. सीमेच्या दोन्ही बाजूला आणि बेळगावातही दंगल, जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. पुन्हा भडका उडेल, अशी एकही घटना घडू नये, हे पाहणे माझ्यासाठी गरजेचे होते. मला राणी पार्वतीदेवी कॉलेजचे प्राचार्य चिटणीस यांनी एका कार्यक्रमाला बोलाविले होते. सावधगिरी म्हणून मी त्याविषयी डीआयजी गरुडाचार यांच्याशी बोलतो. 'तुम्ही तिकडे जाऊच नका,' असा सल्ला त्यांनी मला दिला. तो मनोमन पटलेला नसला, तरी मी चिटणीस यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. लवकरच माझ्या लक्षात आले, की गरुडाचार यांचा सल्ला चुकीचा आणि पूर्वग्रहदूषित होता. त्यांच्यासारख्या अधिकाऱ्याचा मराठी भाषिकांबद्दलचा दुजाभाव त्यातून व्यक्त होत होता.

काही दिवसांनी भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्या समारंभात मी अस्खलीत कन्नड भाषेमध्ये भाषण केले. 'ते कन्नड भाषेत बोलतात. आपल्यापेक्षा चांगले बोलतात,' अशी चर्चा उपस्थितांमध्ये झाली. म्हैसूर केडरवर नियुक्ती झाल्यानंतर मी म्हैसूर भागात बोलली जाणारी कन्नड शिकलो होतो. तेथील लोक उत्तर कर्नाटकातील भाषेला 'होटरू' (विशिष्ट दर्जा नसलेली) समजतात. या समारंभानंतर काही कन्नड अभिमानी लोकांमध्ये माझ्याविषयी असलेली दूषित भावना मावळली. मी मला भेटायला येणाऱ्या कन्नड भाषिकांशी कानडीमध्ये, तर मराठी भाषिकांशी मराठी भाषेत संवाद साधत होतो. मी दोघांचेही प्रेम आणि विश्वास संपादित केला. मी मराठी भाषिकांशी मराठीमध्ये बोलतो, मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होतो, याविषयी कर्नाटक सरकारने कधीही आक्षेप घेतला नाही. बेळगावात दरवर्षी कन्नड राज्योत्सवाच्या दिवशी मराठी भाषिक काळा दिवस पाळत. मिरवणूक काढत. त्यावेळी आमनेसामने संघर्ष होत असे. मी मराठी भाषकांची समजूत काढली. राज्योत्सवाला गालबोट न लावता दुसऱ्या दिवशी तुमची विरोधाची मिरवणूक काढा, असे सांगितले. माझे म्हणणे त्यांनी ऐकले. बेळगावातील माझ्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात मराठी आणि कन्नड भाषिकांत एकदाही संघर्ष झाला नाही. माझ्या दृष्टीने ही अतिशय समाधानाची गोष्ट होती.

बेळगाववरून केंद्र सरकारमध्ये बदली झाल्यानंतर कन्नड चळवळीचे कट्टर नेते सिद्धनगौडा पाटील म्हणाले, 'आतापर्यंत आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी बेंगळुरूला धाव घेत होतो. दुभाषींनी दाखवून दिले, की सर्व प्रश्न येथेच सोडविता येतात.'

(लेखक निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज