कुमार कांबळे
kumar.kamble@timesgroup.com
...
कोल्हापूरच्या गूळ उत्पादक पट्ट्याला यंदा महापुराचा जबर फटका बसला. यामुळे गुळाची टंचाई तर जाणवणार आहेच, दरही वाढणार आहेत. नवा हंगाम जोमाने सुरू करण्यातही अनंत अडचणी आहेत. गुजरातसह देशाच्या अनेक भागांची बाजारपेठ काबीज करणाऱ्या कोल्हापुरी गुळाची ही गोष्ट.
...
कोल्हापूर जिल्ह्याचा संपूर्ण पश्चिम भाग पश्चिम घाटाच्या घनदाट जंगलांनी व्यापला आहे. शाहूवाडी, आंबा, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यांतील जंगलाच्या हरितछत्राने कोल्हापूरला शुद्ध हवा मिळते. या भागात उगम पावणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा, भोगावती, पंचगंगा, कुंभी-कासारी, हिरण्यकेशी अशा नद्या नितळ पाण्याबरोबर सुपीक मातीही वाहून आणतात. या सुपीक मातीवरच जिल्ह्याचे भरणपोषण होत आले. ही कसदार माती टपोऱ्या मोत्यासारखे धान्य आणि भाजीपाला पिकवते. तेच सत्त्व कोल्हापुरी माणसांत रुजते आणि कोल्हापुरी माणसाचा कणखर बाणेदारपणा उजागर होत राहतो.
कोल्हापुरी माणसाने आपल्या अंगभूत वैशिष्ट्यांबरोबरच पारंपरिक कौशल्ये आणि उद्यमशीलतेची वेगळी ओळख निर्माण केली. बदलत्या काळाशी एकरूप होत असतानाच पारंपरिक जीवनशैली, आहारशैली आणि संस्कृतीही टिकवून ठेवली. ती कालसुसंगतेबरोबरच तिचे सत्त्वही अबाधित ठेवले. कोल्हापुरी पायताण (चप्पल) आणि कोल्हापुरी गूळ हे कोल्हापूरच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक. दोन्हीही पारंपरिक. या दोन्हींच्या निर्मितीत इथला माणूस जीव ओततो. म्हणूनच त्या इथल्या संस्कृतीशी समरस झाल्या. त्या इतक्या की, एखाद्याविरोधात संताप व्यक्त करायचा तर 'पायताण'च हातात येते किंवा पाहुण्यांचं स्वागत करायचं म्हटलं तरी ते कोल्हापुरी चवदार गुळानेच होते. आता तर मोठमोठ्या कार्यक्रमांत आकर्षक वेष्टनात गुळाच्या छोट्या ढेपा घालून पाहुण्यांना प्रेमपूर्वक भेट देण्याची पद्धत रूढ झाली आहे. ग्रामीण भागात आजही वऱ्हाडाचे स्वागत गूळ-खोबरे देऊनच होते.
तर असा हा कोल्हापुरी मातीचा गुण घेऊन आलेला कणीदार गूळ. कालौघात वाढलेल्या सहकारी साखर कारखानदारीमुळे गुऱ्हाळघरे कमी होतील, असे वाटत होते. मात्र, गुऱ्हाळघरे आणि गुळाचे महत्त्वही अबाधित राहिले. बदलत्या जीवनशैलीत होणारी दगदग, त्यातून निर्माण होणाऱ्या व्याधी या पार्श्वभूमीवर हल्ली तर गुळाचे आरोग्यदायी गुणधर्म अधिकच अधोरेखित होत आहेत. त्यामुळे कोल्हापुरी गुळाला मोठी मागणी आहे. जिल्ह्याचा काही भाग वगळला तर अनेक गावांमध्ये गुऱ्हाळघरे दिसतात. हा आकडा जवळपास चारशेच्या दरम्यान आहे. ग्रामीण भागातील अर्थकारणात शेती, दुग्ध व्यवसायाबरोबरच गुऱ्हाळघरांचा किती मोठा वाटा आहे, हे त्यावरून लक्षात येईल. करवीरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी या व्यवसायाला चालना दिली. त्यांच्याच दूरदृष्टीतून उभारलेल्या राधानगरी धरणाने कोल्हापूर जिल्हा सुजलाम्-सुफलाम् झाला. लागोपाठ रूजलेल्या सहकारामुळे जिल्ह्याच्या विकासाने वेग घेतला.
शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ उभारली. अडते आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सौदे सुरू झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळू लागला. त्याचे जीवन सुखकर होऊ लागले. त्या काळात सागरी वाहतूक असल्याने कोल्हापूरचा गूळ राजापूर बंदरावरून पाठविला जात असे. त्यामुळे या गुळाला 'राजापुरी गूळ' अशी ओळख होती. नंतरच्या काळात मात्र तो 'कोल्हापुरी गूळ' या नावाने रूढ झाला. तो त्याच नावाने आजही ओळखला जातो. गुजरातची मोठी बाजारपेठ या गुळाने शाहूकाळपासूनच काबीज केली आहे. ती आजतागायत कायम आहे. जिल्ह्यात तयार होणारा जवळपास ७५ टक्के गूळ गुजरातमध्येच जातो. उरलेल्या २५ टक्क्यांपैकी ५ टक्के राजस्थान आणि २० टक्के स्थानिक बाजारपेठेत विकला जातो.
कणीदार, चवदार आणि कसदार गूळ तयार करायचा तर ऊसही तसाच लागतो. नदीकाठच्या उसाचा गूळ दर्जेदार आणि अत्यंत चवदार होतो. त्यामुळे गुऱ्हाळघरचालक पहिल्यांदा नदीच्या आसपासच्या उसाला पसंती देतात. या उसाच्या रसातून कडक आणि कणीदार गूळ तयार होतो. दुकानांच्या काउंटरवर पिवळ्याधमक आणि चमकदार गुळाच्या छोट्या ढेप्या पाहिल्या की, तो कधी खाईन असे होते. मात्र, हा गूळ बाजारात येईपर्यंतच्या टप्प्यावर खूप काळजी घ्यावी लागते. उसाचा रस ठरावीक वेळेत विशिष्ट तापमानाला उकळणे, त्यातील मळी काढणे, खराब होऊ नये म्हणून आवश्यक तेवढा चुना आणि भेंडीगोळी वापरण्याच्या प्रक्रियेतून शेवटी गूळ तयार होतो. यात गुळवे महत्त्वाची भूमिका बजावतात. हा गुळव्या म्हणजे गुऱ्हाळाचा प्राणच. चांगल्या प्रतीचा गूळ करणे हे सर्वस्वी त्याच्याच हाती. त्याचे गणित बिघडले तर रसाची अख्खी काहील वाया जाण्याचा धोका. तयार झालेला गूळ सौद्यासाठी कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आणला जातो. एक किलोच्या ढेपेपासून ३० किलोच्या रव्यापर्यंत हा गूळ सध्या काढला जातो. मार्केट यार्डात अडत दुकानदार प्रतवारीनुसार गुळाचा दर ठरवतात. गुळाची विक्री होते आणि काही वेळाने गुऱ्हाळघर मालकाच्या, पर्यायाने उत्पादकांच्या हातात पैसे पडतात.
या गोड व्यवसायाच्या व्यथा मात्र मोठ्याच! व्यापारी आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला तर हा व्यवसाय दिवसेंदिवस अत्यंत बेभरवशाचा आणि तितकाच धोकादायक बनत चालला आहे. त्यामागे नैसर्गिक आपत्तीसारखी जशी कारणे आहेत तशीच मानवी कारणेही. कधी अतिरिक्त, तर कधी घटलेले ऊसक्षेत्र, कधी व्यापारी-उत्पादक संघर्ष, कधी कृषीमालावरील कर किंवा अन्य सरकारी धोरण आदी बाबी या व्यवसायाला मारक ठरत आहेत. वेळोवेळी आलेल्या अशा संकटांचा मुकाबला करीत येथील गुऱ्हाळघरमालक पाय रोवून उभे आहेत. यंदाच्या महापुराने मात्र गुऱ्हाळघरेच उद्ध्वस्त झाली. ज्याच्या भरवशावर गुऱ्हाळे सुरू करायची त्या ऊसक्षेत्रालाही मोठा फटका बसला. ऑगस्टमधल्या महापुराने शेती उद्ध्वस्त केली. उभी पिके जवळपास पंधरा दिवस पाण्यात राहिली. नदीकाठच्या उसाचे क्षेत्रही त्याहून जास्त काळ पाण्यात राहिले. कोल्हापूर विभागात जवळपास ४५ लाख मेट्रिक टन उसाला फटका बसला. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ३० लाख, तर सांगली जिल्ह्यात १५ लाख मेट्रिक टन उसाला फटका बसला. साहजिकच चवदार गुळासाठी आवश्यक असलेल्या उसाचा सर्वाधिक पट्टाच खराब झाला. अनेक गुऱ्हाळघरेही पाण्यात राहिली. वडणगे, निगवे, आंबेवाडी येथील गुऱ्हाळघरे तर अनेक दिवस पाण्यात होती. काहिली, घमेली आणि अन्य साहित्य पाण्याबरोबर वाहून गेले. चुलवाने चालविण्यासाठी वर्षांनुवर्षे रचून ठेवलेल्या चिपाडांच्या भल्या मोठ्या बडमी वाहून गेल्या. काही जागेवरच कुजून गेल्या. ऊस गाळपासाठीची यंत्रणा (घाणा), इलेक्ट्रिक मोटारी, डिझेल इंजिन आणि चुलवाने खराब झाली. कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीकडील नोंदीनुसार जिल्ह्यात चारशेच्या आसपास गुऱ्हाळे आहेत. सर्वाधिक गुऱ्हाळे असलेल्या करवीर, राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यांतच यंदा अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी आणि महापुराने उद्ध्वस्त झालेल्या गुऱ्हाळांचे सर्वेक्षण बाजार समितीने केले. त्यात ३९६ गुऱ्हाघरांचे म्हणजे जवळपास सर्वच गुऱ्हाळांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे, तर ९० गुऱ्हाळे महापुराने पूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत. गुऱ्हाळांच्या शेडचे पत्रे उडून गेले. त्यामुळे गूळ घोटण्यासाठीचे वाफे उद्ध्वस्त झाले. काहींची चुलवाने आणि धूर जाण्याच्या चिमण्या कोसळल्या. आंबेवाडी, शाहूवाडी, निगवे, शिये, वडणगे, आदी पूरग्रस्त भागातील गुऱ्हाळघरांचे अपरिमित नुकसान झाले. यावरून गुऱ्हाळांच्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात येईल. गुऱ्हाळाला बोलीभाषेत घाणा म्हटले जाते. घात झाला, नुकसान झाले किंवा केले या अर्थानेही 'घाणा केला' हा शब्द वापरला जातो. महापुराने गुऱ्हाळ व्यवसायाचा यंदा असाच 'घाणा केला' आहे.
यंदाचा हंगाम सुरू होईल की नाही आणि झालाच तर तो किती काळ सुरू राहील, याबाबत अद्याप साशंकताच आहे. कारण मोटारी, इंजिनपासून चुलवाने दुरुस्त करण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यातच परतीचा पाऊसही काही सुचू देईनासा झाला आहे. एकीकडे हंगाम सुरू करायची वेळ आली आहे आणि दुसरीकडे गुऱ्हाळघरमालकांसमोर अनेक अडचणींचा डोंगर आहे, अशा विचित्र परिस्थितीत हा व्यवसाय सापडला आहे.
महापुराने नुकसान झालेल्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले. गुऱ्हाळ व्यावसायिक मात्र यापासून दुर्लक्षित राहिला. त्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेऊन शेतकरी आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची चर्चा घडवून आणली. तेव्हा पाटील यांनी गुऱ्हाळघरांना नुकसानभरपाई देण्यासाठी स्वतंत्र 'जीआर' काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यावर आतापर्यंत काहीच हालचाली झालेल्या नाहीत. सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता अजिबात दिसत नाही. तोडणी कामगार, गुळवे आणि इतर कामगारांना अॅडव्हान्स दिलेला असल्याने काहीही करून गुऱ्हाळघरे सुरू ठेवणेही गरजेचे आहे. असे असले तरी बसलेल्या आर्थिक फटक्यातून बाहेर पडण्यासाठी गुऱ्हाळघरमालकांना पुन्हा कर्जे काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
गुळाची मागणी तर कायम आहे. यंदा उत्पादन घटण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. त्यामुळे कदाचित गुळाला चांगला दरही मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे केमिकलविरहित किंवा सेंद्रिय गुळालाही मोठी मागणी आहे. उत्पादक प्रयोगशील आहे. त्याच्या मालाला मार्केटही उपलब्ध आहे. मात्र, जिल्हा पातळीवरील नेतृत्वाबरोबरच सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका मात्र या व्यवसायाला निमूटपणे सहन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या व्यवसायाला चांगले दिवस आणण्यासाठी आणि कोल्हापुरी गुळाची बाजारपेठ अबाधित राखण्यासाठी आताच काही पावले उचलण्याची आवश्यकता आहे. तरच पुढील हंगामात गुळाची गोडी वाढेल!