अ‍ॅपशहर

लढवय्या नेता

गुरुदास कामतांना मुंबई काँग्रेसमध्ये 'बॉस' म्हणत ते कार्यकर्त्यांचे लाडके पण दराराही जबरदस्त...

Maharashtra Times 23 Aug 2018, 12:00 am
गुरुदास कामतांना मुंबई काँग्रेसमध्ये 'बॉस' म्हणत. ते कार्यकर्त्यांचे लाडके पण दराराही जबरदस्त. ज्येष्ठ काँग्रेस नेते व त्यांच्या समवयस्क नेत्यांमध्ये 'गुरू' म्हणून हास्यविनोद करताना दिसणारे कामत पक्षांतर्गत राजकारण असो वा विरोधी पक्षांचा राजकीय हल्ला असो, त्याविरोधात प्रचंड त्वेषाने लढायचे. एखादी न पटणारी गोष्ट पक्षश्रेष्ठांनी लादली तरी ती न बोलता मान खाली घालून करायची हा काँग्रेसी शिरस्ता कामतांनी कधी पाळला नाही. युवक काँग्रेसच्या मुशीत घडलेल्या या कार्यकर्त्याची ऊर्जा प्रथम राजीव गांधी यांनी हेरली. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात त्यांनी मुरलीधर माने, गुरुदास कामत अशा तरुणांना लोकसभेची उमेदवारी दिली. विजयी झाल्यानंतर दिल्लीत या दोघांना खासदार म्हणून मिळालेली घरेही साऊथ अॅव्हेन्यूमध्ये शेजारी शेजारी होती. कामतांना राजीव यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही दिले. त्या काळात हे पद अत्यंत मोक्याचे होते. मात्र, मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मतभेद झाले तेव्हा कामत यांनी तात्काळ राजीनामा देऊन टाकला. त्यांच्या या स्वाभिमानाला तेव्हा अनेकांनी वेड्यातही काढले होते. मात्र, पुढे त्यांच्या आयुष्यात अशाप्रकारे मतभेदांमुळे राजीनामा देण्याची एक श्रृंखलाच तयार झाली. कामत यांनी त्यानंतर ईशान्य मुंबई व उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे अनेकदा प्रतिनिधित्व केले. प्रमोद महाजनांसारख्या दिग्गज नेत्यालाही मोठ्या फरकाने ईशान्य मुंबईत हरवले. मुरली देवरा यांच्यासारख्या पक्षांतर्गत तालेवार नेत्याला टक्कर दिली. मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी २००३ व २००५ साली सोनिया गांधी यांच्या शिवाजी पार्कवरच्या सभा ऐतिहासिक यशस्वी करून दाखवल्या. कामत ए. आर. अंतुले यांना राजकीय गुरू मानत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेरच्या सभेत तेव्हा अडगळीत पडलेल्या अंतुलेंना व्यासपीठावर मुख्य भाषणासाठी बोलावले होते. केंद्रात राज्यमंत्री म्हणून काम करताना केवळ खाते बदलल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेसमधील सर्व पदांचा त्यांनी दोन वर्षांपूर्वीच राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेतला. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे तो त्यांनी नंतर मागेही घेतला. मुंबईतील बदललेल्या वातावरणात काँग्रेसला फारसे बरे दिवस नसताना असा लढवय्या नेता गेल्याने पक्षाची अनपेक्षित पण अपरिमित हानी झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Gurudas-Kamat

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज