अ‍ॅपशहर

उत्तर प्रदेशात ‘दंगल’

अखेर उत्तर प्रदेशातील यादवीचे रौद्ररूप पुढे आले. देशातील सर्वांत मोठ्या राज्यातील विद्यमान मुख्यमंत्र्यांची त्यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. समाजवादी पक्षातील सत्तालढाईत असे काही होईल याची जाणीव अलीकडच्या घडामोडींनी करून दिली होती.

Maharashtra Times 31 Dec 2016, 4:02 am
अखेर उत्तर प्रदेशातील यादवीचे रौद्ररूप पुढे आले. देशातील सर्वांत मोठ्या राज्यातील विद्यमान मुख्यमंत्र्यांची त्यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. समाजवादी पक्षातील सत्तालढाईत असे काही होईल याची जाणीव अलीकडच्या घडामोडींनी करून दिली होती. निवडणुकीला दोन महिने शिल्लक असताना अखिलेश यादव यांचे सहा वर्षांसाठी झालेले निष्कासन म्हणजे सत्तेतून एखाद्या कुटुंबाची वाताहत कशी होऊ शकते याचेही द्योतक ठरावे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमस‌िंह यादव यांना ही टोकाची कारवाई करावी लागण्यामागे अनेक कारणे आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम up akhilesh mulayamsinh yadav samajwadi party
उत्तर प्रदेशात ‘दंगल’


खरे तर मागील पाच वर्षांत अखिलेश यादव यांनी स्वतःची सकारात्मक प्रतिमा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात कमालीचे यश मिळविले होते. शहरी तरुणांसाठी टेक्नोसॅव्ही मुख्यमंत्री म्हणून तर ग्रामीण भागात घरातला कर्ता मुलगा म्हणून अखिलेश यांनी स्वतःला प्रस्थापित केले. बसप प्रमुख मायावती यांच्या काहीशा वादग्रस्त कार्यकाळाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यांची पाच वर्षांतील निष्कलंक छबी लोकांनाही भावली होती. वडील मुलायमसिंहांनी पक्ष सांभाळावा, सत्ता चालविण्यासाठी मार्गदर्शन करावे आणि अखिलेश यांनी त्याबरहुकूम काम करावे असा पायंडा गेली काही वर्षे उत्तर प्रदेशात होता. याचा अर्थ तिथे सारे काही सुरळीत होते असा नाही. २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील निकालांनी समाजवादी पक्षाला धोक्याचा इशारा दिला. पक्षाचे पाचच उमेदवार निवडून आले. आणि हे सारे यादव कुटुंबातीलच होते. विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने सर्वच राजकीय पक्षांनी ‘मित्रां’ची जमवाजमव सुरू केली. अशाच प्रयत्नांचा भाग म्हणून मुलायम यांचे लहान बंधू आणि सपाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल सिंह यांनी उत्तर प्रदेशातील कुख्यात मुख्तार अन्सारीच्या कौमी एकता दलाचे सपामध्ये विलिनीकरण करून घेतले. अखिलेश यासाठी राजी नव्हते. ठिणगी उडाली. अखिलेश यांनी शिवपाल यांच्यासह त्यांच्या चार समर्थकांना मंत्रिमंडळातून बरखास्त केले. मुलायम यांच्या मध्यस्थीनंतर अखिलेश आणि शिवपाल यांच्यातील वाद काहीसा शमला. परंतु, हा समेट तात्पुरता ठरला.

मुलायम यांनी समाजवादी पक्षाच्या ३२५ संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली. यात अखिलेशच्या कट्टर समर्थकांना वगळले होते. मुलायम यांच्या कृतीवर जाहीर भाष्य न करता अखिलेश यांनी परस्परच २३५ उमेदवारांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध केली. वरकरणी हा अखिलेश आणि मुलायम यांच्यातील संघर्ष वाटत असला तरी त्यात शिवपाल यादव, रामगोपाल यादव, आझम खान, अमरसिंह असे अन्य खेळाडूसुद्धा आहेत. यातील प्रत्येक खेळाडूच्या डावपेचांवर सपाचे भवितव्य ठरणार आहे. या कौटुंबिक यादवीमुळे ‘शत प्रतिशत भाजप’चे स्वप्न साकारण्यासाठी आसुसलेले भाजपाध्यक्ष अमित शहा आणि बसपप्रमुख मायावती यांना आनंदाच्या उकळ्या फुटणे स्वाभाविक आहे. हा संघर्ष चिघळावा अशी कामना करणाऱ्यांमध्ये विरोधकांपेक्षाही समाजवादी पक्षातील काही घटक अग्रेसर होते ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही. सपामधील ही ‘दंगल’ सहजासहजी शमणार नाही. राजकीय आखाड्यातील मल्ल अशी मुलायमसिंग यांची ओळख असली तरी राजकीय खेळीत त्यांच्या ‘छोऱ्या’ने त्यांना धोबीपछाड दिली आहे. दुहेरी याद्यांच्या यादवीतून एकूण राज्यालाच सावत्र वागणूक देण्याचे समर्थन कदापि करता येणार नाही, ही बाब ‘नेताजीं’ना कोण सांगणार हादेखील प्रश्नच आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज