अ‍ॅपशहर

पाकिस्तानला चपराक

कमांडर कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला जोरदार चपराक लगावली आहे. जाधव यांच्यावर एकतर्फी खटला चालवत त्यांना घाई-घाईने फाशीची शिक्षा सुनावून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने न्यायाची थट्टा केली होती. जाधव यांना वकिलाची मदत मिळावी, अशी मागणी भारताने वारंवार करूनही ती फेटाळली गेली. जाधव यांना वाचविण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतल्यानंतरही, हा विषय त्या न्यायालयाच्या कक्षेत येत नसल्याची भूमिका घेऊन पाकिस्तानने तसा युक्तिवाद केला. मात्र, पाकिस्तानचे सर्व मुद्दे खोडून काढत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे.

Maharashtra Times 19 May 2017, 2:51 am
कमांडर कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला जोरदार चपराक लगावली आहे. जाधव यांच्यावर एकतर्फी खटला चालवत त्यांना घाई-घाईने फाशीची शिक्षा सुनावून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने न्यायाची थट्टा केली होती. जाधव यांना वकिलाची मदत मिळावी, अशी मागणी भारताने वारंवार करूनही ती फेटाळली गेली. जाधव यांना वाचविण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतल्यानंतरही, हा विषय त्या न्यायालयाच्या कक्षेत येत नसल्याची भूमिका घेऊन पाकिस्तानने तसा युक्तिवाद केला. मात्र, पाकिस्तानचे सर्व मुद्दे खोडून काढत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम verdict on kulbhushan jadhav
पाकिस्तानला चपराक


जाधव यांना अटक करण्यापासून त्यांना शिक्षा जाहीर करेपर्यंत पाकिस्तानने भारताची बाजू ऐकूनच घेतली नाही. वास्तविक, व्हिएन्ना करारानुसार, अशा प्रकारे अटक करण्यात आलेल्यांना त्याच्या देशाकडून वकिली मदत घेता येते. मात्र, ती नाकारत पाकिस्तानने या कराराचा भंग केला होता. याबाबत भारताने केलेला युक्तिवाद विश्वासार्ह असल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकच्या उल्लंघनावर शिक्कामोर्तब केले आहे. जाधव यांच्यावर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात भरण्यात आलेल्या खटल्याच्या विश्वासार्हतेबाबत शंका आहे. जाधव यांच्या कबुलीजबाबाचा व्हिडिओ पाककडून दाखविण्यात येतो. मात्र, तो सादर करण्यालाही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नकार दिला होता. जाधव यांना फाशी झाल्यास तो पाककडून केला गेलेला खून ठरेल, अशी प्रतिक्रिया भारताने व्यक्त केली होती. पाकने न्यायाची अशा प्रकारे विटंबना केल्याने भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेण्याचा योग्य निर्णय घेतला. मात्र, या खटल्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाशी संबंध नसल्याची भूमिका घेत पाकने उभय देशांत २००८मध्ये झालेल्या कराराचा उल्लेख केला होता. पाकची ही भूमिका हेग येथील न्यायालयाने फेटाळली आणि अंतिम निकाल देईपर्यंत पाकिस्तानने जाधव यांना फाशी देऊ नये, असा निकाल दिला. त्याचबरोबर, याबाबत आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचा आणि त्यांची न्यायालयाला माहिती देण्याचा आदेशही दिला. हा भारतासाठी मोठा विजय असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तत्परतेने घेतलेले निर्णय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात परिणामकारक युक्तिवाद करणारे हरीश साळवे यांचे याबाबत कौतुक करायला हवे. मात्र, विजय इतक्यात साजरा करता येणार नाही; कारण जाधव यांच्या फाशीला केवळ स्थगिती मिळाली आहे; ती रद्द झालेली नाही. हा खटला ताकदीने लढवून जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना सुरक्षित भारतात आणण्याला प्राधान्य द्यायला हवे. या निकालाने पाकला नक्कीच झटका बसला आहे. या खटल्यात भक्कम पुरावे सादर करणार असल्याची शेखी मारतानाच आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाला बंधनकारक नसल्याची प्रतिक्रिया पाकने दिली आहे. या परस्परविरोधी भूमिकांवरूनच पाकिस्तानच्या अवस्थेची कल्पना येईल. पाकमध्ये लोकनियुक्त सरकार असले, तरी तिथे लष्कराचेच वर्चस्व आहे आणि अलीकडच्या काळात ते वाढू लागले आहे. जाधव यांना फाशी जाहीर करून पाक लष्कराने भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाद्वारे भारताने पाकचा डाव उलटवला आहे. पाकमधील जाधव यांच्या खटल्याबाबत कशी पावले उचलावीत, हे भारताने आता ठरवायला हवे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज