दीपावली
गुणवत्तेची मोठी परंपरा असणाऱ्या दीपावलीचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. दिवाळी अंक हा ललित साहित्याच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा हवा, ही प्रथा यंदाही पाळली आहे. गणेश मतकरी, लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथा, सुहास बहुळकर, मिलिंद बोकील, बाळ फोंडके, अनिल अवचट आदींचे ललित लेख, वसंत आबाजी डहाके, इंद्रजित भालेराव, दासू वैद्य, प्रज्ञा दया पवार आदींच्या कविता यांनी हा अंक सजला आहे. सध्याच्या समाजातल्या अस्वस्थतेचा वेध घेणारी लेखमाला हे या अंकाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यात डहाके, विश्वास उटगी, रवींद्र रुक्मिणी रवींद्रनाथ, हेरंब कुलकर्णी, विजय चोरमारे, मेघना भुस्कुटे सहभागी आहेत. मकरंद जोशी यांनी संयोजित केलेला हा परिसंवाद उत्तम चर्चाविश्व उभे करतो.
(दीपावली : संपादक - अशोक कोठावळे, पाने - २४०, किंमत - २५० रुपये)
अक्षर
निखिल वागळे यांनी सुरू केलेल्या अक्षरचे हे अडतिसावे वर्ष आहे. वेगळा, नवी दृष्टी देणारा मजकूर अक्षरमध्ये असतोच. यंदाही 'नव्या जगाच्या नव्या वाटा..' या लेखमालेत तानाजी पाटील, राजा कर्णिक, प्रमोद डबरासे, सुलेखा नलिनी नागेश, किरण किल्लेदार, स्वाती घोडके यांनी नव्या आव्हानांचा वेध घेतला आहे. वैचारिक लेखांची आघाडी शांता गोखले, जतीन देसाई, निळू दामले, सुनील तांबे, हर्षदा परब यांनी सांभाळली आहे. सतीश भावसार यांची रेखाचित्रे हे या अंकाचे एक वेगळेपण आहे. निवडणुकीत प्रत्यक्ष फिरून 'नरेंद्र मोदी कसे जिंकले' हा पार्थ एम. एन. यांनी मांडलेला अन्वयार्थ लक्षणीय आहे. अनुवादित कविता हेही एक वेगळेपण.
(दीपावली : संपादक - मीना कर्णिक, हेमंत कर्णिक, पाने - २५०, किंमत - २५० रुपये)