अ‍ॅपशहर

काटछाटीवरच मारा काट!

सेन्सॉर बोर्डाने सिनेमात काटछाट करण्यावरुन सिनेमावाले आवाज उठवू लागलेत. अभिनेत्री-निर्माती अनुष्का शर्मालाही ही कापाकापी पसंत नाही. ‘तुम्ही केवळ सिनेमाला प्रमाणपत्र द्या. ज्यांना तो पाहायचाय तो ते पाहतील. सिनेमात काटछाट सुचवणं दुर्दैवी आहे’, असं तिनं मटाशी बोलताना सांगितलं.

सौमित्र पोटे | Maharashtra Times 21 Mar 2017, 1:09 pm
सेन्सॉर बोर्डाने सिनेमात काटछाट करण्यावरुन सिनेमावाले आवाज उठवू लागलेत. अभिनेत्री-निर्माती अनुष्का शर्मालाही ही कापाकापी पसंत नाही. ‘तुम्ही केवळ सिनेमाला प्रमाणपत्र द्या. ज्यांना तो पाहायचाय तो ते पाहतील. सिनेमात काटछाट सुचवणं दुर्दैवी आहे’, असं तिनं मटाशी बोलताना सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anushka sharma not happy with censor board
काटछाटीवरच मारा काट!


‘सेन्सॉरच्या भूमिकेवरुन आपल्याकडे अलीकडे खूप वाद होऊ लागलेत. सेन्सॉर बोर्डाकडून अनेक सिनेमांवर गदा आणली जाते. काटछाट सुचवली जाते. पण सेन्सॉर बोर्डाचं काम केवळ प्रमाणपत्र देणं इतकंच आहे. याद्वारे त्यांनी वयोगट अधोरेखित करावा. त्यानंतर ज्यांना सिनेमा पाहायचाय ते पाहातील. पण, सिनेमात थेट काटछाट सुचवणं हे दुर्दैवी आहे’, अशा शब्दांत अभिनेत्री आणि आता निर्माती बनलेल्या अनुष्का शर्माने आपलं मत खास ‘मुंबई टाइम्स’कडे मांडलं.

अनुष्का आणि तिचा भाऊ कर्णेश यांनी मिळून आता ‘फिलौरी’ या दुसऱ्या सिनेमाची निर्मिती केली आहे. यापूर्वीं त्यांनी ‘एनएच १०’ हा सिनेमा बनवला होता. पहिल्या सिनेमातून बोध घेता आता निर्माती अनुष्का शर्मा सज्ज झाली आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली, पहिला सिनेमा मी केला. पण पहिल्याचं कोणतंही ओझं आम्हाला आमच्या दुसऱ्या सिनेमावर नको आहे. आशयघन कथा निवडून आम्ही सिनेमा बनवतो आहोत.’ या नव्या सिनेमाबद्दलही तिने आपली भूमिका थेट मांडली. ती म्हणाली, ‘माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी आपोआप घडत गेल्या. जे घडत गेलं त्याला मी फक्त प्रतिसाद देत गेले. सिनेनिर्मितीही त्याचाच एक भाग. पण मला जे आतून वाटतं ते मी करते. मी आधीपासूनच धाडसी मुलगी आहे.’

‘फिलौरी’ची गोष्टही अशीच वेगळी आहे. ही प्रेमकथा आहे. पण ही एका भूताची आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक अंशल याने ही गोष्ट कर्णेशच्या कानावर घातली. अनुष्काचा भाऊ कर्णेश आणि दिग्दर्शक हे दोघे मित्र. दिग्दर्शकाच्या एका मित्राचं लग्न, त्याला मंगळ असल्यामुळे झाडाशी लावून देण्यात आलं होतं. तो धागा पकडून कथानक गुंफण्यात आलं. ‘लोकांना काहीतरी वेगळं‌दिलं तरच ते सिनेमा पाहायला थिएटरमध्ये येतात. प्रेमकहाण्या यापूर्वी खूप आल्या होत्या. मग यात भूत आलं. पण तेही फार भयावह न आणता सरळ साधं, प्रेमळ करण्यावर चर्चा झाली, यातून हा सिनेमा आकारला आला,’ अशी माहितीही तिने दिली.

भूत असावं बहुधा

सिनेमामध्ये भूताचं काम करणाऱ्या अनुष्काला व्यक्तिगत जीवनात कधी भुताचा अनुभव आलाय का, असंही विचारण्यात आलं. त्यावर बोलताना ती म्हणाली, ‘आपण सगळ्यांनीच भूताखेतांच्या गोष्टी ऐकल्या आहेत. कधी कुणाला अनुभवही आला असेल. पण, आपल्या पलिकडे एखादं दुसरं जग असावं असं मला वाटतं. पण त्याचवेळी सगळी भूतं भीतीदायक असतील असं मला वाटत नाही. काही प्रेमळ, साधी भुतंही असतीलच की,’ असं ती हसत हसत सांगते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज