अ‍ॅपशहर

bhai vyakti ki valli: ‘भाई’ वादाच्या भोवऱ्यात; अयोग्य चित्रण केल्याचा दावा

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर बेतलेला 'भाई : व्यक्ती की वल्ली' हा चरित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'गानहिरा हिराबाई बडोदेकर; तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याविषयी चित्रपटात चुकीचे प्रसंग दाखविण्यात आले असून, चित्रपट म्हणून वाट्टेल ते दाखविण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे.

महाराष्ट्र टाइम्स 16 Jan 2019, 10:16 am
पुणे:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhai


महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर बेतलेला 'भाई : व्यक्ती की वल्ली' हा चरित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'गानहिरा हिराबाई बडोदेकर; तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याविषयी चित्रपटात चुकीचे प्रसंग दाखविण्यात आले असून, चित्रपट म्हणून वाट्टेल ते दाखविण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. या अक्षम्य चुकांसाठी चित्रपटकर्त्यांनी जाहीर माफी मागावी,' अशी मागणी हिराबाई बडोदेकर आणि भीमसेन जोशींच्या कुटुंबीयांनी केली आहे.

'देशभरात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, अशा या कलाकारांविषयी या चित्रपटात हीन दर्जाची भाषा वापरण्यात आली आहे. शिवाय, त्यांच्या आयुष्यात कधीही घडलेच नाहीत, अशा प्रसंगांचीही घुसळण करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे आम्ही अतिशय व्यथित झालो आहोत. कलेच्या नावाखाली स्वातंत्र्य घेणे एक, मात्र स्वैरपणे आणि मनाला वाटेल त्या दिशेने आपली कलाकृती नेणे हे योग्य नाही. मात्र, याचे भान न ठेवता आणि 'पुलं'सकट भीमसेनजी, हिराबाई, वसंतराव देशपांडे अशा कुणाहीबाबत पुरेसा अभ्यास न करता हा चित्रपट बनविण्यात आला आहे. नव्या पिढीपुढे चुकीचा इतिहास आणून या महनीय व्यक्तिमत्त्वांचा अनादर करणारे चित्रपटाचे दिग्दर्शक-लेखक-निर्माते यांनी या प्रकाराची जबाबदारी घेऊन चित्रपटातील चुकीचे प्रसंग काढून टाकावेत आणि आपल्या चुकीबद्दल माफी मागावी,' अशी मागणी पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी, हिराबाई बडोदेकर यांचे नातू निशिकांत बडोदेकर आणि नात व गायिका मीना फातर्पेकर यांनी केली आहे.

'आपल्या अत्युच्च दर्जाच्या कलेने या महान कलावंतांनी भारतीय अभिजात संगीतात जी मोलाची भर घातली आहे, त्याची बूज तर सोडाच; परंतु त्यांच्याबद्दल समाजात हीन समज पसरण्यास हा चित्रपट कारणीभूत ठरत आहे. या कलावंतांच्या कलेवर साऱ्या देशाने जे अतूट प्रेम केले, त्याला काळीमा फासणाऱ्या या चित्रपटाकडे रसिकांनीच पाठ फिरवणे आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते. आपल्या दैवतांचे असे विद्रूपीकरण निदान मराठी रसिकांनी तरी खपवून घेऊ नये, असे आमचे कळकळीचे आवाहन आहे,' असेही जोशी व बडोदेकर कुटुंबीयांनी म्हटले आहे.

पुढील प्रसंगांबद्दल नाराजी

- चित्रपटात भीमसेनजी, वसंतराव आणि पुलं हे हिराबाईंच्या घरी दारू पिण्यासाठी जातात, असे दाखविण्यात आले आहे. असे कधीही घडलेच नाही, असे म्हणत या प्रसंगावर आक्षेप घेण्यात आला आहे.

- हिराबाई आणि पुलं, भीमसेन यांच्या वयांत एका पिढीचे अंतर होते. मात्र, चित्रपटात हे अंतर कमी दाखविण्यात आले आहे. शिवाय, हिराबाईंचा उल्लेखही एकेरी करण्यात आला आहे, यावर आक्षेप.

- चित्रपटात रेखाटलेली भीमसेनजींची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने आल्याने त्यांच्या कलेबद्दल भीषण गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.

हिराबाई या आमच्या वडिलांसाठी आईसारख्या होत्या. हिराबाईंच्या घरात दारूची बाटली असणे, त्यांच्याकडे दारू प्यायला आमचे वडील जाणे, हे अतिशय चुकीचे आणि असत्य चित्रण चित्रपटात दाखवले आहे. कलात्मकता दाखविण्याच्या नादात ही घोडचूक केली आहे. हे योग्य नाही. आम्ही व्यथित झालो आहोत.

- श्रीनिवास जोशी

ज्या काळात स्त्रियांना अभिजात संगीताच्या मैफलींना जाण्यासही परवानगी नाकारली जात होती, त्या काळात हिराबाईंनी १९२२ मध्ये मैफलीच्या मध्यभागी बसून आपली कला सादर केली. ही घटना केवळ संगीताच्या क्षेत्रापुरतीच महत्त्वाची नव्हती, तर त्यामुळे सामाजिक क्रांती अधिक वेगवान होण्यास आणि महिला गायकांना प्रतिष्ठा मिळण्यास मदत झाली. अशा या गायिकेविषयी असत्य चित्रण करणे हे भयंकर आहे. नव्या पिढीपुढे तुम्ही असा चुकीचा संदेश देणार का?

- मीना फातर्पेकर

ज्यांनी चित्रपट काढला आहे, त्यांना हिराबाई, वसंतराव आणि भीमसेनजी यांच्याविषयी काहीही माहिती असल्याचे दिसत नाही. त्यांनी जरा अभ्यास करून फिल्म करायला हवी होती. चित्रपटातून दारूचा आक्षेपार्ह प्रसंग वगळण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. आमचे कुटुंब या प्रकारामुळे अतिशय अस्वस्थ झाले आहे.

- निशिकांत बडोदेकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज