अ‍ॅपशहर

राजकारणातलं वैर मृत्यूनंतर शमलं! विक्रम गोखलेंच्या आठवणीत अमोल कोल्हे भावुक; काका तुमची आठवण...

Amol Kolhe On Vikram Gokhale आपल्या कसदार अभिनयाने चित्रपट, टीव्ही आणि नाट्यप्रेमी रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं पुण्यात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अभिनेते अमोल कोल्हे यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2022, 4:58 pm
मुंबई- जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज २६ नोव्हेंबर रोजी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेले १७ दिवस त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. गोखले यांना मधुमेह आणि जलोदर झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारांना प्रतिसाद देणं हळूहळू बंद झालं आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकप्रिय अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनीही विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अमोल त्यांच्या आठवणीत भावुक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amol kolhe  vikram goakhale


अमोल यांनी फेसबुकवर विक्रम गोखले यांचा एक फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट करत त्यांनी लिहिलं, 'विक्रमकाका, तुमची उणीव भासत राहील!
जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता
कॅमेराला डबल लूक देईल ,
जेव्हा जेव्हा फक्त देहबोलीतून
पानभर संवाद बोलला जाईल
जेव्हा जेव्हा घेतलेल्या पाॅज मधूनही
अचूक अर्थ पोहोचवला जाईल
जेव्हा जेव्हा एन्ट्रीच्या थाटावरून
पात्राची पूर्ण पार्श्वभूमी उभी राहील
जेव्हा जेव्हा ‘बिटवीन द लाईन’
संवादापेक्षा अधोरेखित होईल..
भूमिका घ्यायला कचरण्याच्या काळात
निर्भीड भूमिका मांडली जाईल..
तेव्हा तेव्हा विक्रमकाका…..
तुमची उणीव भासत राहील!!!'


अमोल यांच्या पोस्टवर अनेकांनी आपल्या दुःखद प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमोल आणि विक्रम गोखले यांचे राजकीय विचार अगदी भिन्न होते. अमोल यांनी त्यांच्यावर अनेकदा टीकाही केली होती. विक्रम गोखले यांनी अभिनेत्री कंगना रणौत हिच्या राजकीय वक्तव्याचं समर्थन केलं होतं. सोबतच यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाला एका कार्यक्रमात हा देश भगव्यांचं आहे तो हिरवा कधीही होणार नाही असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचाही अमोल यांनी तीव्र शब्दात विरोध केला होता. तुमचा एखादा व्यक्ती इस्पितळात असेल तेव्हा त्यालाही भगव्याचंच रक्त द्या असं म्हणाल का, एकीकडे संस्कृतीचे गोडवे गाता आणि दुसरीकडे वसुधैव कुटुंबकमला तिलांजली देता अशा शब्दात त्यांनी विक्रम यांच्यावर टीका केली होती. त्यांच्यातील हे विचारांचं वैर आता कायमचं संपलं आहे. आता अमोल यांनी गोखले यांच्यासाठी भावुक शब्दात पोस्ट केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज