अ‍ॅपशहर

केवळ सिरीयलच्या फायद्यासाठी अमोल कोल्हेंनी 'स्वराज्यरक्षक संभाजी' वापरलं: विश्वास पाटील

Amol Kolhe राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केल्यानंतर आता राज्यातील वातावरण तापलं आहे. मात्र यातच लेखक विश्वास पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jan 2023, 2:41 pm
मुंबई- विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी महाराज या एका वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. पुण्यासह ठिकठिकाणी याविरोधात निदर्शन करण्यात आलं. मात्र राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावर अजित पवार यांची बाजू उचलून धरत संभाजी महाराजांचा धर्मवीर असा उल्लेख कुठे आढळत नसल्याचं म्हटलं होतं. आता प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी कोल्हे यांच्यावर निशाणा साधत त्यांनी केवळ आपल्या मालिकेच्या फायद्यासाठी 'स्वराज्यरक्षक संभाजी' या नावाचा वापर केला असल्याचं म्हटलं आहे. कागदपत्रानुसार, शंभुराजांना 'धर्मवीर' या नावाने ओळखलं जात होतं असं त्यांचं म्हणणं आहे. यासंदर्भात त्यांनी एक फेसबूक पोस्ट करत पुरावे दिले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amol kolhe on sambhaji maaharaj


ही पोस्ट करत विश्वास यांनी लिहिलं, 'संभाजीराजांना 'धर्मवीर' म्हणून अवघा महाराष्ट्र गेली १०५ वर्षे ओळखतो आहे. कागदपत्रे साक्ष देतात. 'स्वराज्यरक्षक संभाजी' हे मार्केटेबल टायटल श्री अमोल कोल्हे यांनी आपल्या सिरीयलसाठी वापरले इतकेच. अस्सल कागदपत्रे सांगतात की, गेली १०५ वर्ष महाराष्ट्र शंभूराजांना 'धर्मवीर' या लाडक्या नावाने ओळखतो आहे. स्वतः संभाजीराजांनी हिंदू धर्मातील अनेक वाईट चालीरीतींचा धिक्कार केला होता. परंतु त्यांनी हिंदू धर्म कधीही सोडला नव्हता, हे त्यांनी स्वतः कोकणातल्या बाकरे शास्त्रांना त्यांच्या हयातीतच स्वतः दानपत्र लिहून दिले आहे. आज-काल विशेषत: राजकारण्यांनी सुशिक्षित व्हायची वेळ आलेली आहे, असे खेदाने म्हणावे लागते.'


आज माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा हिंदू धर्मातील चातुर्वर्ण, कर्मकांडाचा अतिरेक आवडत नाही. पण म्हणून हिंदूधर्मच संपूर्ण वाईट आहे असा त्याचा बिलकुल अर्थ होत नाही. तसेच संभाजी राजे आणि शिवाजी राजे हे 'संपूर्ण हिंदू धर्मा'च्या विरोधी होते. शिवाय औरंगजेब आणि अफजलखान यांच्या क्रौर्र्याचे गाडीभर पुरावे असताना ते संतमहात्मे होते, असे जाहीरपणे सांगायचे महाराष्ट्र देशी जे प्रयोग चालू आहेत. ते पूर्णतः धक्कादायक आणि इतिहासबाह्य आहेत. तात्पर्य, गेल्या शंभरहून अधिक वर्षे अवघा महाराष्ट्र शंभूराजांचा उल्लेख 'धर्मवीर' असाच करत आला आहे. ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या पोवाड्यात संभाजीराजांचा उल्लेख एकदा 'धर्मभास्कर' असा केला होता. अन्यथा 'स्वराज्यरक्षक' हा किताब शंभूराजांना आपल्या सिरीयलच्या उच्चांकसाठी राष्ट्रवादीचे निष्ठावंत खासदार श्री अमोल कोल्हे यांनी वापरला आहे. त्या शब्दाचा त्याआधी इतिहासात कुठेही उल्लेख नाही.' त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. यावर आता अमोल कोल्हे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

महत्वाचे लेख