अ‍ॅपशहर

पं. भीमसेन जोशींना प्रचंड घाबरायच्या लता दीदी, स्वत:च सांगितले होते काही खास किस्से

Pandit Bhimsen Joshi Birth Anniversary :महान गायक पंडित भीमसेन जोशी यांची आज जयंती. भीमसेनजींना ‘भारतरत्न’हा देशातील सर्वोच्च सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. त्याआधी पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण, राष्ट्रीय संगीत पुरस्कार, पद्मविभूषण तसंच महाराष्ट्रभूषण आदी पुरस्कारांनी त्यांचा बहुमान करण्यात आला होता.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2023, 8:48 am
मुंबई: सात दशके भारतीय संगीतावर अधिराज्य गाजवणा-या पंडित भीमसेन जोशी यांची आज जयंती. आपल्या दैवी स्वरांनी रसिकांना मंत्रमुंग्ध करणा-या भीमसेनजींनी शास्त्रीय संगीतासोबत अंभग, भजन, ठुमरी, नाट्यगीत,चित्रपटगीत असे संगातीचे विविध प्रकार हाताळले. भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल बोलताना लता मंगेशकर यांचं नाव न घेणं, अशक्यच. भीमसेन जोशी आणि लता दीदी आपल्या दैवी स्वरांनी रसिकांना मंत्रमुंग्ध करत. पण तुम्हाला माहित्येय का पं. भीमसेन जोशी यांच्यासोबत गायचं आहे, हे जेव्हा लता दीदींना पहिल्यांदा सांगण्यात आलं होतं,तेव्हा त्या प्रचंड घाबरल्या होत्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pandit bhimsen joshi birth anniversary


पंडितजींच्या आठवणींना उजाळा देताना लतादीदींनी त्यांच्या काही काही किस्से शेअर केले होते. लतादीदी पंडितजींना अण्णा अशी हाक मारायच्या.

खुद्द लतादीदींनी सांगितलेला हा किस्सा त्यांच्याच शब्दांत...

पंडितजींना मी अण्णा म्हणत असे. अण्णांबरोबर गाण्यासाठी मला संगीतकार श्रीनिवास खळेंनी बोलवून घेतलं. मी तेव्हा अक्षरश: घाबरून गेले होते. इतक्या मोठ्या उंचीच्या गायकाबरोबर गायचं या कल्पनेने माझे हातपाय कापत होते. मी खळेंना सांगितलं, कुठे मी आणि कुठे पंडितजी? तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी घ्या. पण . मीच गायला हवं, असा हट्ट खळेंनी धरला. माझी भीती काही जाईना. मग मी अण्णांनाच भेटले आणि त्यांना माझी अवस्था सांगितली.

अण्णा म्हणाले, तू अजिबात काळजी करू नकोस. कोणाबरोबर गाते आहेस, हे मनातही आणू नकोस. तरीही गायला सुरुवात करताना मनात भीती होतीच. पण पुढे इतकं सोपं वाटायला लागलं की मी किशोर, रफी यांच्याबरोबर ज्या सहजतेने गायचे तशीच गायला लागले. हे केवळ अण्णांच्या त्या वागणुकीमुळंच शक्य झालं. इतका हा विलक्षण माणूस की, मला माझे वडीलच मिळाल्यासारखं वाटलं.

दीदींनी सांगितलेला आणखी एक किस्सा...

एकदा ते मुंबईत आले असताना मला अचानक फोन आला, 'लता आज मी तुझ्या घरी येऊन जेवणार आहे. काय करशील?' मी विचारात पडले, एवढा मोठा माणूस घरी येतो आहे. त्याच्यासाठी काय जेवण करावं? मग तेच फोनवरून बोलले, 'तू घाबरली असशील. मला जास्त काही नको. फक्त श्रीखंड-पुरी कर.' ते घरी आले. जेवले आणि नंतर गात बसले,असा एक किस्सा दीदींनी सांगितला होता. त्यांची गायकी थोर होतीच, तिच्याबद्दल सगळेच सांगतील. पण ते माणूस म्हणूनही तितकेच थोर होते, याचा अनुभव मी घेतलाय, असंही लतादीदी तेव्हा म्हणाल्या होत्या.

महत्वाचे लेख