मुंबई: दोन अभिनेत्री एकमेकींच्या मैत्रिणी असू शकत नाही, असं म्हटलं जातं. अभिनेत्रींचं एकमेकींसोबत पटत नाही. बॉलिवूडमध्ये हे गॉसिपचे विषय ठरलेले असतात. बॉलिवूडमध्ये या कॅटफाइट्स काही नव्या नाहीत. करिना-बिपाशा, राणी- ऐश्वर्या यांची भांडणं सगळ्यांनाच माहित आहेत. पण आता कॅटफाइट्स मराठी सिनेसृष्टीतही असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये टशन असल्याचं पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी एका गप्पांच्या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी हिनं अमृतासोबतच्या मैत्रीवर खुलासा केला होता. आता अभिनेत्री सई ताम्हणकर हिनं देखील अमृता आणि तिच्यातील मैत्रीवर भाष्य केलं आहे. सई सध्या तिच्या एका मुलाखतीमुळं चर्चेत आली आहे. या मुलाखतीत सईनं तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी मनमोकळेपणानं शेअर केल्या आहेत.
मराठी सिनेसृष्टीत अशा चर्चा आहेत की, सई आणि अमृता यांच्यात सर्वकाही अलबेल नाही. अमृतालाकडं आलेल्या भूमिका नंतर तुझ्याकडं आल्या त्यामुळ ती तुझ्यावर नाराज आहे का?, असं सईला विचारण्यात आलं होतं. या प्रश्नावर सईनं तिला याबद्दल काहीच माहित नसल्याचं सांगितलं. पण असं तर होणारच ना की, एक भूमिका दोन जणांना विचारली जाते. हा आपल्या कामाचा भाग आहे. या कारणावरून मनात काही तिढी ठेवणं मला बरोबर वाटत नाही. पण मला वाटत नाही, की असं काही झालंही असेल, असं सईनं म्हटलं आहे.
सईला पुढं विचारण्यात आलं की, तू आणि अमृता भेटता का? आणि तेव्हा सर्वकाही ठिक असतं का? यावर सईनं हो...असं उत्तर दिलं. इतकंच नाही तर, आता सोशल मीडियावर ज्या चर्चा आहेत, त्याबद्दल आजच मी अमृताला फोन करून विचारणार असल्याचं सई सांगते.