अ‍ॅपशहर

मग, टोल का भरायचा?: चिन्मय मांडलेकर

रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांवरुन अनेक कलाकार संताप व्यक्त करत आहेत. लेखक-अभिनेता चिन्मय मांडलेकरनंही त्याचं म्हणणं 'मुंटा'च्या माध्यमातून मांडलं.

महाराष्ट्र टाइम्स 19 Sep 2019, 9:15 am
रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांवरुन अनेक कलाकार संताप व्यक्त करत आहेत. लेखक-अभिनेता चिन्मय मांडलेकरनंही त्याचं म्हणणं 'मुंटा'च्या माध्यमातून मांडलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chinmay


महाराष्ट्रात राहणारा एक सामान्य नागरिक म्हणून मला काही प्रश्न पडले आहेत. मी किंवा कोणत्याही मुंबईकरानं टोलची रक्कम का भरावी? रस्त्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांकडून टोल वसूल केला जातो. पण, रस्तेच जर आम्हाला सुस्थितीत उपलब्ध होणार नसतील, तर टोल का वसूल केला जातोय? खड्ड्यांतून प्रवास करण्यासाठी आम्ही अतिरिक्त पैसे द्यावेत असं प्रशासनाचं म्हणणं आहे का? चांगले रस्ते द्या, अशी गयावया का करावी लागते आम्हाला? आपण विकासाच्या गप्पा ऐकतोय. आपली कशी प्रगती होणार आहे याबाबतच्या जाहिराती पाहतोय. पण, ज्या रस्त्यांच्या माध्यमातून विकास होतो, तो रस्ता कुठेच दिसत नाही.

ज्या रस्त्यावरून आमचा प्रवास सुखकर होईल असे रस्ते आम्हाला का मिळू शकत नाहीत? डांबरी तसंच काँक्रिटच्या रस्त्यांवरही खड्डे आहेत. पेव्हर ब्लॉक रस्त्यांची सुपीक कल्पना तर नेमकी कुणाच्या डोक्यातून आली ते कळत नाही. पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांचा सर्वाधिक त्रास होतो इतकी साधी वस्तुस्थिती त्यांना समजू नये का? माझ्या माहितीनुसार पेव्हर ब्लॉक, ही पादचारी मार्गांसाठी वापरण्यात येणारी सामग्री आहे. पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावरून जड वाहन जातं; तेव्हा तो पेव्हर ब्लॉक उघडतो आणि मागच्या गाडीला आदळतो. माझ्या गाडीवर पेव्हर ब्लॉक आदळल्याच्या अशा अनेक खुणा आहेत. असा उघडलेला पेव्हर ब्लॉक दुचाकी चालकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याचं दर एक-दोन आठवड्यांनी काम निघतं आणि कंत्राटदार त्याचीच वाट पाहत असतात. यातून प्रशासन नेमका कोणाचा फायदा करून देतंय? हे सर्व प्रश्न संबंधित राजकारण्यांना, अधिकाऱ्यांना खडसावून विचारण्याची वेळ आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज