चौथी भिंत : चल तुझी सीट पक्की
…
दर्जा : तीन स्टार
…
जयंत पवार
यमाने किंवा यमदूताने पृथ्वीतलावर यावं आणि मर्त्य मानवाच्या निर्वाणात यमाच्या नोंदीत काही तरी गफलत व्हावी, ही लेखकांची लाडकी फँटसी आहे. नाटकापासून सिनेमापर्यंत ती विनोदी अंगाने भरपूर वापरली गेली आहे. 'चल तुझी सीट पक्की' या नाटकात पुन्हा एकदा ती अवतरते. वास्तविक अनेकवेळा वापरलेल्या कल्पनेतली गंमत जवळपास संपलेली असते. पण 'तुझी सीट पक्की' या नाटकामध्ये ह्या फँटसीतली गंमत लेखक-दिग्दर्शक कायम ठेवण्यात आणि कलावंत ती वाढवण्यात सफल होतात. एका परिचित फँटसीचा मनोरंजक प्रवास या नाटकात पाहायला मिळतो. तो तिच्यातल्या मर्त्य मानवाच्या स्वार्थलोलुप वृत्तीकडे निर्ममपणे बघितल्यामुळे. लेखक माणसांचा पक्षपाती न होता सारी सहानुभूती यमदूताला देतो ही या नाटकाला दिलेली वेगळी डूब. अर्थात या फँटसीच्या शक्यता जास्तीत जास्त तपासल्या जात नाहीत, ती मर्यादित परिघातच खेळवली जाते. त्यामुळे तिच्यातून गंमतीपलीकडे फारसं काही निघत नाही हेही खरं.
वसंत इनामदार नावाच्या एका भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याला एकाएकी यमदूत दिसायला लागतो. आधी घाबरलेला हा गृहस्थ नंतर त्याच्याशी बोलायला लागतो. त्याच्या अस्तित्वाला सरावतो. पण तो त्याची बायको आणि दोन मुलं यांना दिसत नसल्यामुळे त्यांना हा वसंतचा भ्रमिष्टपणा वाटतो. यमदूत हा भ्रम नसून वस्तुस्थिती आहे हे कुटुंबाला कळावं आणि त्यांनी आपल्याला वेड्यात काढणं बंद करावं म्हणून वसंत यमदूताला सर्वांपुढे प्रकट व्हायची विनंती करतो. हा यमदूत जेव्हा सर्वांना दिसतो तेव्हा खरं नाट्य सुरू होतं. आधी वसंत मरणार म्हणून त्याच्या मागे त्याच्या अफाट प्रॉपर्टीचा शोध आणि त्यावर कब्जा हेच ध्येय असलेला वसंत इनामदारचा मुलगा वरुण आणि पत्नी उमा पुढे यमदूत आपल्या घरातील चौघांपैकी कुणाही एकाला उचलू शकतो ह्या यमदूताच्या घोषणेने हादरतात आणि मग आपलं मरण टाळणं आणि तिथे दुसऱ्याची कल्पना करणं हा खेळ सुरू होतो.
या संहितेचं वेगळेपण म्हणजे ती ज्या घराचं दर्शन घडवते त्यातली सगळीच माणसं स्वार्थी आहेत. मुलगी पूर्वा हिचा मठ्ठ भाबडेपणा सोडला तर उर्वरित तिघंही लबाड आहेत. त्यांना कुणालाच बळी जायचं नाहीये, मात्र घरातलाच दुसरा कोणी बळी गेला तर त्यांची हरकत असणार नाही. पण हे वेगळेपण इथेच संपतं. माणसं धूर्त, लबाड, स्वार्थी असतात ह्याचा यमदूताला प्रत्यय येतो. पण ह्या पलीकडे या फँटसीचं काय करायचं हे लेखकाला कळत नाही. यमदूत बदलतो पण माणसं बदलत नाहीत. नाटकाच्या प्रारंभी ती जशी असतात तशीच शेवटीही दिसतात. एका मोठ्या अनुभवातून गेल्यावरही त्यांच्यात बदल होत नसेल तर नाटकाचं प्रयोजन काय? माणूस स्वार्थी आहे हे एक सत्य अधोरेखित करण्यापलीकडे माणसाच्या जाणिवेत होणारा बरावाईट बदल दाखवण्याचं काम संहिता करत नाही. यमदूत हा वसंत इनामदारचा आल्टर इगो मानता येत नाही. कारण तो पुढे सर्वांनाच दिसतो. आता तो प्रत्येकाचा आल्टर इगो म्हणावा, आपल्या विवेकाला टोचणी लावणारी 'स्व'जाणीव म्हणावी, तर ती माणसात काही बदल घडवते - त्याला आत्मसाक्षात्कार घडवते. इथे तसं होत नाही. भ्रष्टाचारी वसंत, एका प्रौढ बाईच्या प्रेमात पडलेला वरुण, चंगळवादी जगण्याची चटक लागलेली उमा या व्यक्तिरेखा म्हणून उभ्या राहत नाहीत. त्या माणूस म्हणून काय आहेत, त्यांचं आयुष्य कसं आहे याचे कुठलेच तपशील लेखक देत नाही. ही कॉमेडी असल्यामुळे व्यक्तिरेखाटन ही तिची मागणी आहे. पण माणसांना 'टाइप्स' केल्यामुळे काही फार्सिकल सिच्युएशन्स तेवढ्या निर्माण होतात.
ओंकार राऊत या युवा दिग्दर्शकाचं हे पहिलं व्यावसायिक नाटक. त्याने त्याची केलेली गतिमान हाताळणी, पात्रांच्या स्वभावविशेषानुसार निर्माण केलेल्या विनोदाच्या जागा आणि एकूण प्रयोग रचनेतला सफाईदारपणा यामुळे त्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. या नाटकाचं नेपथ्य मात्र फारच सांकेतिक आहे. प्रदीप मुळ्येंच्या नेपथ्यातली आग्रही रंगसंगती इथे दिसत नाही. मार्बलच्या भिंती श्रीमंती दाखवण्याचा हव्यास असलेल्या माणसाची अभिरुचीहीनता दाखवत असल्या तरी त्या डोळ्यांना सुखावह नाहीत. खिडक्यांच्या लाल चौकटीसुद्धा डोळ्यांना त्रास देतात. प्रकाशयोजना आणि संगीताच्या बाजू ठाकठीक वाटतात. कॉमेडी नाटकात एक श्रवणीय टायटल साँग देण्यापलीकडे संगीतकाराला विशेष काम नसतं. इथे विजय गवंडे यांनी ते चोख पार पाडलं आहे.
नाटकाची रंगत मुख्यत्वे कलावंतांच्या कामामुळे निर्माण होते. मंगेश कदम यांनी वसंत इनामदारची व्यक्तिरेखा उत्तम साकारली आहे. या नाटकात त्यांनीच आपल्या भूमिकेचा व्यक्तिरेखा म्हणून विचार केलेला दिसतो आणि बदलत्या घटनाक्रमानुसार त्याच्या व्यक्तिमत्त्वात होणाऱ्या बदलांचा माग घेतलेला दिसतो. ह्या माणसाच्या मनात सतत काहीतरी चालू आहे, हे आपल्याला कळत राहतं. त्यांनी प्रसंगी गंभीरपणाही धारण करत अकारण विनोदाच्या मागे न जाण्याचा संयम दाखवला आहे. लीना भागवतांच्या उमा ह्या व्यक्तिरेखेला खरे रंग दुसऱ्या अंकात प्राप्त होतात. ते त्यांनी नीट हेरले आहेत आणि ह्या बाईचा अंतरीचा निष्ठूरपणा हसत हसत छान दाखवला आहे. ओंकार राऊतच्या देहबोलीत असलेला लवचिकपणा वरुणच्या जराही गंभीर नसलेल्या वृत्तीला पोषक ठरतो. ओंकारचं संवादांतलं टायमिंग आणि त्यानुरूप आंगिक अभिनयातली सहजता वाखाणण्याजोगी आहे. अनिषा सबनीस हिने पूर्वाच्या मठ्ठपणातली भाबडी छटा आणि त्यामागचा खरेपणा उत्तम दाखवला आहे. जयंत घाटेंची अण्णा ह्या 'टची' भूमिकेतली उपस्थिती प्रसन्न आहे. वसंत वगळता ह्या सगळ्या व्यक्तिरेखा चांगल्या वठवल्या गेल्या असल्या तरी त्या एकरेषीय आहेत. किरण मानेंनी साकारलेला यमदूत हा 'टाइप' आहे. त्यातही एकरेषीयता आहे, पण तिला छेदण्याचा आणि उगाचच फार्सिकल न होता भूमिकेला विश्वासार्हता देण्याचा चांगला प्रयत्न किरण माने करतात, त्यामुळे ही भूमिका लव्हेबल होते.
एक निखळ आणि निव्वळ मनोरंजन म्हणून हे नाटक पाहता येईल.
…
निर्मिती : रचना पेंढारकर-सामंत / नाटक मंडळी
लेखक : नितीन दीक्षित
दिग्दर्शक : ओंकार राऊत
नेपथ्य : प्रदीप मुळ्ये
संगीत : विजय गवंडे
प्रकाशयोजना : भूषण देसाई
कलावंत : मंगेश कदम, किरण माने, लीना भागवत, ओंकार राऊत, अनिषा सबनीस, जयंत घाटे.