उत्कर्ष जोशी, कॉलेज क्लब रिपोर्टर
मराठी रंगभूमीवर एक हजार प्रयोगांचा मानाचा टप्पा गाठणाऱ्या काही मोजक्या कलाकृतींच्या यादीत 'मी मराठी'चंही नाव लवकरच येतंय. नंदेश उमप यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचा हजारावा प्रयोग रविवारी सादर होतोय. या निमित्तानं नंदेशनं ‘मटा’शी खास संवाद साधला…
महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये उमप घराण्याचं स्थान अगदी अजरामर असं आहे. दिवंगत लोकशाहीर विठ्ठल उमप आणि त्यांची पुढची पिढी म्हणजे नंदेश उमप, यांनी महाराष्ट्राची लोककला सर्वदूर पसरवली. याच लोककलेतून महाराष्ट्राचं समग्र दर्शन घडवणारा कार्यक्रम म्हणजे 'मी मराठी'. नंदेश उमप यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमानं लोकप्रियतेचं शिखर गाठलं असतानाच आता 'मी मराठी'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. या कार्यक्रमाचा एक हजारावा प्रयोग रविवार, ५ मार्च रोजी रवींद्र नाट्यमंदिर इथे रात्रौ ८:३० वाजता सादर होणार आहे.
या निमित्तानं 'मटा'सोबत खास संवाद साधताना नंदेश उमप यांनी 'मी मराठी'चा एकूण प्रवास उलगडून दाखवला. 'माझी सर्वात पहिली निर्मिती म्हणजे 'मी मराठी'. त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल खास आपुलकी आहे. ७ मार्च २००७ रोजी गडकरी रंगायतन इथे मी, स्वतः बाबा (शाहीर विठ्ठल उमप) आणि ६२ कलाकारांच्या संचासह 'मी मराठी'चा पहिला प्रयोग सादर केला. १० वर्षांच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले. मात्र प्रेक्षकांनी कायम आमच्यावर भरभरून प्रेम केलं', अशा भावना नंदेशनं व्यक्त केल्या. या प्रयोगाला मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे.
निळू फुलेंची दाद प्रेरणादायी
'मी मराठी'च्या प्रवासाच्या आठवणी सांगताना नंदेश यांनी निळू फुले यांनी 'मी मराठी'बद्दल काढलेल्या उद्गारांची आठवण सांगितली. 'या कार्यक्रमाने मला बसल्या जागी अखंड महाराष्ट्राचं दर्शन घडवलं', असं निळू फुले म्हणाले होते. यातून आम्हाला प्रचंड ऊर्जा मिळाली, असं नंदेश म्हणाले.
अनेकांचे हातभार
'गेल्या १० वर्षांच्या प्रवासात 'मी मराठी'साठी माझी बायको, मुलगी, माझ्या सासरची मंडळी आणि एकूणच कुटुंबीय, मित्र, सर्व कलाकार या सर्वांनी खूप मदत केली. मध्यंतरी जेव्हा काही आर्थिक अडचणी आल्या, तेव्हा प्रसंगी आपलं मानधन न घेता कलाकारांनी काम केलं आणि प्रेक्षकांनी कायमच आमच्यावर प्रेम केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानावेत तितके कमी', अशा शब्दांत नंदेश यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
बाबांचं स्थान अढळ
दिवंगत लोकशाहीर विठ्ठल उमपसुद्धा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग होते. 'बाबांच्या आकस्मिक निधनानंतर 'मी मराठी'बद्दल सर्व चिंतातूर झाले. पण केवळ त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं नाव या जोरावर आम्ही प्रयोग चालू ठेवले आणि यशस्वी झालो. व्यावसायिकता आणि बांधिलकी पाळणं हे त्यांनीच आम्हाला शिकवलं' असं नंदेश म्हणतात.
मराठी रंगभूमीवर एक हजार प्रयोगांचा मानाचा टप्पा गाठणाऱ्या काही मोजक्या कलाकृतींच्या यादीत 'मी मराठी'चंही नाव लवकरच येतंय. नंदेश उमप यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचा हजारावा प्रयोग रविवारी सादर होतोय. या निमित्तानं नंदेशनं ‘मटा’शी खास संवाद साधला…
महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये उमप घराण्याचं स्थान अगदी अजरामर असं आहे. दिवंगत लोकशाहीर विठ्ठल उमप आणि त्यांची पुढची पिढी म्हणजे नंदेश उमप, यांनी महाराष्ट्राची लोककला सर्वदूर पसरवली. याच लोककलेतून महाराष्ट्राचं समग्र दर्शन घडवणारा कार्यक्रम म्हणजे 'मी मराठी'. नंदेश उमप यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमानं लोकप्रियतेचं शिखर गाठलं असतानाच आता 'मी मराठी'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. या कार्यक्रमाचा एक हजारावा प्रयोग रविवार, ५ मार्च रोजी रवींद्र नाट्यमंदिर इथे रात्रौ ८:३० वाजता सादर होणार आहे.
या निमित्तानं 'मटा'सोबत खास संवाद साधताना नंदेश उमप यांनी 'मी मराठी'चा एकूण प्रवास उलगडून दाखवला. 'माझी सर्वात पहिली निर्मिती म्हणजे 'मी मराठी'. त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल खास आपुलकी आहे. ७ मार्च २००७ रोजी गडकरी रंगायतन इथे मी, स्वतः बाबा (शाहीर विठ्ठल उमप) आणि ६२ कलाकारांच्या संचासह 'मी मराठी'चा पहिला प्रयोग सादर केला. १० वर्षांच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले. मात्र प्रेक्षकांनी कायम आमच्यावर भरभरून प्रेम केलं', अशा भावना नंदेशनं व्यक्त केल्या. या प्रयोगाला मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे.
निळू फुलेंची दाद प्रेरणादायी
'मी मराठी'च्या प्रवासाच्या आठवणी सांगताना नंदेश यांनी निळू फुले यांनी 'मी मराठी'बद्दल काढलेल्या उद्गारांची आठवण सांगितली. 'या कार्यक्रमाने मला बसल्या जागी अखंड महाराष्ट्राचं दर्शन घडवलं', असं निळू फुले म्हणाले होते. यातून आम्हाला प्रचंड ऊर्जा मिळाली, असं नंदेश म्हणाले.
अनेकांचे हातभार
'गेल्या १० वर्षांच्या प्रवासात 'मी मराठी'साठी माझी बायको, मुलगी, माझ्या सासरची मंडळी आणि एकूणच कुटुंबीय, मित्र, सर्व कलाकार या सर्वांनी खूप मदत केली. मध्यंतरी जेव्हा काही आर्थिक अडचणी आल्या, तेव्हा प्रसंगी आपलं मानधन न घेता कलाकारांनी काम केलं आणि प्रेक्षकांनी कायमच आमच्यावर प्रेम केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानावेत तितके कमी', अशा शब्दांत नंदेश यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
बाबांचं स्थान अढळ
दिवंगत लोकशाहीर विठ्ठल उमपसुद्धा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग होते. 'बाबांच्या आकस्मिक निधनानंतर 'मी मराठी'बद्दल सर्व चिंतातूर झाले. पण केवळ त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं नाव या जोरावर आम्ही प्रयोग चालू ठेवले आणि यशस्वी झालो. व्यावसायिकता आणि बांधिलकी पाळणं हे त्यांनीच आम्हाला शिकवलं' असं नंदेश म्हणतात.