रंगमंच कामगारांसाठी ‘ऑपरेशन विमा’
मुंबई टाइम्स टीमरंगमंचा कामगारांना सुरक्षा मिळावी यासाठी रंगभूमीवरील काही कलाकार प्रयत्नशील आहेत अभिनेता अजय पूरकर हे त्यापैकीच एक नाव...
मुंबई टाइम्स टीम
रंगमंचा कामगारांना सुरक्षा मिळावी यासाठी रंगभूमीवरील काही कलाकार प्रयत्नशील आहेत. अभिनेता अजय पूरकर हे त्यापैकीच एक नाव. अजयच्या 'ऑपरेशन जटायू' या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग नुकताच दीनानाथ नाट्यगृहात पार पडला. यावेळी पूरकर यांनी स्वखर्चाने सहा रंगमंच कामगारांचा अपघाती विमा उतरवला. येत्या एक-दोन वर्षात किमान शंभर रंगमंच कामगारांचा विमा उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
अजय यांनी अनेक नाटकं, सिनेमांतून चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 'फर्जंद' चित्रपट, 'कोडमंत्र' नाटकातल्या त्यांच्या भूमिका अलीकडेच गाजल्या होत्या. तसंच 'भाई' चित्रपटातली पं. भीमसेन जोशी यांची भूमिका देखील प्रेक्षकांना आवडली. नाटकाचे दौरे, टेम्पोतून करावा लागणारा प्रवास यामुळे रंगमंच कामगारांच्या जीवाला धोका असतो. दुर्दैवानं काही अपघात घडल्यास दिलासा म्हणून त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना काही रक्कम मिळावी म्हणून हा विमा उतरवण्यात आला आहे. मनोज परब, बाळकृष्ण पडीलकर, विक्रांत दळवी, सुमित सुर्वे, दीपक सकपाळ, प्रशांत कदम या कामगारांचा प्रत्येकी दोन लाखांचा विमा उतरवण्यात आला असल्याची माहिती नाटकाचे निर्माते दिनेश पेडणेकर यांनी दिली. विम्याच्या हप्त्यापोटी भरावी लागणारी रक्कम येणाऱ्या वर्षातही अजय पुरकर स्वत: भरणार आहेत.
रंगमंच कामगारांमुळे नाटक उभं राहतं. प्रेक्षकांकडून कलाकारांचं भरभरुन कौतुक होतं. त्यांना कामाचं मानधन देखील चांगलं मिळतं. पण, जे सार्वधिक जोखीम पत्करून नाटक उभं करतात ते नेहमीच पडद्याआड राहतात. त्यांच्यासाठी जितकं होईल तितकं काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. सहा रंगमंच कामगारांपासून सुरुवात करण्यात आली असून, हा आकडा आणखी वाढेल. ते सुरक्षित असतील तर आपलं नाटक सुरक्षित राहील.
- अजय पुरकर, अभिनेता