जयंत पवार
भारतीय नाटकांमधलं रवींद्रनाथ टागोरांचं 'डाकघर' हे असं नाटक आहे जे अनेक परदेशी भाषांसह भारतातल्या जवळपास सर्व भाषांमधून सादर झालं आहे आणि आजही ते अनेक दिग्दर्शकांना करून पहावंसं वाटतं. रवींद्रनाथांनी हे बंगालीत १९१२ साली लिहिलेलं नाटक बंगालीत होण्याआधी जगप्रसिद्ध कवी डब्ल्यू. बी. येट्स यांनी लंडनमध्ये इंग्रजीत पहिल्यांदा सादर केलं. मग ते जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच अशा अनेक भाषांत झालं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते जर्मनीतल्या नाझींनी उभारलेल्या छळछावणीत झालं. मुक्तीची आणि सुटकेची आस लागलेल्या मुलाची गोष्ट सांगणारं हे नाटक छळछावणीतल्या ज्यूंना आत्मप्रत्यय देणारं ठरलं असल्यास नवल नाही.
थिएटर ऑलिम्पिक्सच्या शेवटच्या दिवशी ज्येष्ठ आणि ख्यातनाम भारतीय दिग्दर्शक एच. कन्हाईलाल यांच्या 'कलाक्षेत्र' या संस्थेतर्फे 'डाकघर' सादर झालं. एका अप्रतिम नाट्यानुभवाने सोहळ्याची सांगता झाली. कन्हाईलाल यांचं २०१६ साली निधन झालं. त्यांच्या दिग्दर्शनाची अनोखी झलक 'डाकघर'मुळे बघायला मिळाली. कन्हाईलाल हे मणिपुरी दिग्दर्शक. त्यांची संस्था इम्फाळची. मणीपूरने कन्हाईलाल आणि रतन थिय्याम हे दोन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिग्दर्शक मिळवून दिले. या दोन्ही दिग्दर्शकांनी स्वत:ची रंगभाषा निर्माण करून तिच्याद्वारे सौंदर्याचा शोध घेतला. पण दोघांची तऱ्हा न्यारी. एकमेकांपासून खूप भिन्न. रतन थिय्याम यांची नाटकं पात्रबहुल, मार्शल आर्ट आणि मणिपुरी नृत्यशैलीचा कलात्मक वापर करत भव्य पट मांडणारी. नेत्रदीपक. रंगांची उधळण करणारी. चकित करणारी. तर, कन्हाईलाल यांची नाटकं मोजक्या पात्रांची, नेमका आशय मांडणारी, त्यासाठी नटाच्या शरीरापासून संगीत, प्रकाश यांचा नेमका आणि अचूक वापर करण्यावर भर देणारी आणि साधी. कुठेही बडेजाव न मांडणारी. आशयाच्या गाभ्यापर्यंत अलगद जाणारी. त्यांच्या या शैलीचा प्रत्यय 'डाकघर' बघताना आला.
कन्हाईलाल यांची 'पेबेथ', 'नुपी' आणि आता 'डाकघर' ही नाटकं महाराष्ट्रात आली. या तिन्ही नाटकांचं प्रमुख सामर्थ्य होतं ते म्हणजे अभिनेत्री सावित्री यांचं त्यातल्या प्रमुख भूमिकेत असणं. सावित्री या कन्हाईलाल यांच्या पत्नी. आज त्यांनी सत्तरी ओलांडली आहे. ही सत्तरीतली बाई 'डाकघर'मधल्या अमल या आठ वर्षांच्या मुलाच्या प्रमुख भूमिकेत होती.
रवींद्रनाथांनी या छोटेखानी नाटकात अमल या मुलाच्या रूपाने मुक्तीच्या ध्यासाची कथा मांडली आहे. आपल्या चुलत्याकडे दत्तक म्हणून गेलेला हा मुलगा एका छोट्या खोलीत बंदिवान होऊन पडला आहे. डॉक्टरांनी त्याला खोलीबाहेर न पडण्याची सक्त ताकीद दिली आहे कारण तो कुठल्याशा असाध्य रोगाने आजारी आहे. पण अमलला बाहेरचं जग बघायची आस लागली आहे. त्याचा काका त्याला समजावतो, 'तू मोठा होऊन डॉक्टरांसारखा ज्ञानी हो. घरात बसून खूप पुस्तकं वाच. बाहेर पडायची गरजच नाही.' त्यावर अमल म्हणतो, 'मग मला ज्ञानी व्हायचंच नाही. मला बाहेर पडून डोंगर बघायचा आहे, झऱ्याच्या पाण्यात खेळायचं आहे.' पण आता मात्र तो नाईलाजाने खिडकीत बसून राहतो आणि बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांशी बोलत बसतो. त्याच्या घराच्या वाटेवर त्याला दहीवाला भेटतो, राखणदार भेटतो, फुलवालीची मुलगी सुधा भेटते, गावचा मुखिया भेटतो. राखणदाराकडून त्याला कळतं की समोरच्या टेकडीवरची इमारत म्हणजे पोस्ट ऑफिस आहे. मुखिया त्यात भर घालतो. तो म्हणतो, हे डाकघर राजाने बांधलं आहे आणि राजा लहान मुलांना छोटी छोटी पत्रं लिहितो. त्याने तुलाही पत्र लिहिलेलं असणार. अमल कल्पनेने बाहेरचं जग आपल्या मनोविश्वात रचत असतो. आता त्याच्या कल्पनेच्या राज्यात एक राजा येतो. त्याने पाठवलेलं पत्र घेऊन येणारा राजदूत येतो. राजदूत सांगावा आणतो की अमलवर उपचार करायला खास राजवैद्य येणार आहे. आणि खरोखरच राजवैद्य येतोही. पण कल्पनेत दंग झालेला अमल स्वप्न बघतच मरून जातो.
अमल घराच्या चौकटीतून बाहेर पडायचं स्वप्न बघतो. कैद होण्याचं नाकारतो. स्वातंत्र्यासाठी धडपडतो. त्याच्या या स्वातंत्र्यात श्रमाचा आनंद घेण्याची आस आहे. माणसांशी साधलेला संवाद आहे. त्यांचे वेगवेगळे स्वर, त्यातून येणाऱ्या नादमय हाका याची त्याला गंमत वाटते. त्याला समोरच्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे, झरे पाहायचे आहेत. फुलं पाहायची आहेत. राखणदार वाजवतो त्या घंटेचा टण टण असा टोल ऐकू येतो. हा नाद तो कानात साठवतो. दहीवाल्याची 'दहीऽऽ' अशी आरोळी त्याला गमतीशीर वाटते. हे नाद, त्यातले रंग, पक्ष्यांची किलबिल, डोंगराचं सौंदर्य ह्या सगळ्यात सृष्टीचं सौष्ठव भरलं आहे. ते जवळून अनुभवायला आसुसलेला अमल स्वप्न बघत बघत मरून जातो. मुक्तीची मूळ मानवी प्रेरणा जागवणारी ही अमलची कथा दुसऱ्या बाजूने माणसासाठी खरी मुक्ती हे स्वप्नच ठरेल की काय, असा व्याकुळ करणारा विचार हलकेच सोडून जाते.
रवींद्रनाथांच्या संवादांतून आणि प्रसंगरचनेतून एक रोमँटिक मूड सतत पाझरत असतो. सौंदर्याच्या ओढीने तडफडणाऱ्या मानवी मनाचा हा प्रवास शोकात्म आहे. या नाटकाचा हा स्थायी भाव कन्हाईलाल यांनी आपल्या रंगभाषेतून पकडला आहे. छोट्या गोलाकार वर्तुळात वावरणारा अमल आणि मागे पात्रं जाण्यायेण्यासाठी साकारलेल्या अर्धवक्र प्लॅटफॉर्ममधून सूचित होणारी टेकडी याहून अधिकचं नेपथ्य नाटकाला नाही. अमलची खिडकी त्याच्या मागे साकार होते आणि त्या चौकटीत फूल आहे.
कन्हाईलाल यांचे पुत्र एच. टोम्बा यांनी अतिशय नजाकतदार, मधुर संगीत दिलं आहे. त्यात निसर्गातले नाद आहेत आणि पात्रांची सहज लयीतली गाणी आहेत. पात्रांच्या संवादांनाही अशी छान लय आहे की ते देखील एक संगीतच वाटू लागतं. कलावंतांचे पदन्यास, नृत्यमय हालचाली आणि एका लयीतले आगम निर्गम यामुळे नाटक झुलत राहतं.
सावित्री यांनी अमलच्या भूमिकेचा गाभा थेट पकडला आहे. आपल्या अवघ्या वृत्तीत त्यांनी मूलपण आणलं आहे. त्याच्या डोळ्यातून प्रकटणारं कुतूहल, आशंका, अनाम ओढ, लगबग, तडफड, हर्षोल्लास आणि प्राणांतिक घुसमट, निराशा, झाकोळ या सर्व भावनांसाठी सावित्री यांनी हाताचा पायांचा केलेला वापर, डोळ्यांची उघडमीट आणि स्वरातली आर्तता यांची एक सुरेख हार्मनी साधली गेली. या सगळ्याच गोष्टींचा एक घट्ट गोळीबंद आविष्कार साकार होत रवींद्रनाथ टागोरांच्या काव्यात्म आशयाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला.
निर्मिती : कलाक्षेत्र, इम्फाळ
लेखक : रवींद्रनाथ टागोर
दिग्दर्शक : एच. कन्हाईलाल
संगीत : एच. टोम्बा
नेपथ्य : गौरप बुर्राह
प्रकाशयोजना : एल. इबोचाउबा
कलावंत : सावित्री, प्रवीण साइकिया, सपम ब्रोजन, धनंजय राभा, गुरू कोकेन, बादल लोध, सलाम बेमबेम व इतर.
दर्जा : **** (चार)
भारतीय नाटकांमधलं रवींद्रनाथ टागोरांचं 'डाकघर' हे असं नाटक आहे जे अनेक परदेशी भाषांसह भारतातल्या जवळपास सर्व भाषांमधून सादर झालं आहे आणि आजही ते अनेक दिग्दर्शकांना करून पहावंसं वाटतं. रवींद्रनाथांनी हे बंगालीत १९१२ साली लिहिलेलं नाटक बंगालीत होण्याआधी जगप्रसिद्ध कवी डब्ल्यू. बी. येट्स यांनी लंडनमध्ये इंग्रजीत पहिल्यांदा सादर केलं. मग ते जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच अशा अनेक भाषांत झालं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते जर्मनीतल्या नाझींनी उभारलेल्या छळछावणीत झालं. मुक्तीची आणि सुटकेची आस लागलेल्या मुलाची गोष्ट सांगणारं हे नाटक छळछावणीतल्या ज्यूंना आत्मप्रत्यय देणारं ठरलं असल्यास नवल नाही.
थिएटर ऑलिम्पिक्सच्या शेवटच्या दिवशी ज्येष्ठ आणि ख्यातनाम भारतीय दिग्दर्शक एच. कन्हाईलाल यांच्या 'कलाक्षेत्र' या संस्थेतर्फे 'डाकघर' सादर झालं. एका अप्रतिम नाट्यानुभवाने सोहळ्याची सांगता झाली. कन्हाईलाल यांचं २०१६ साली निधन झालं. त्यांच्या दिग्दर्शनाची अनोखी झलक 'डाकघर'मुळे बघायला मिळाली. कन्हाईलाल हे मणिपुरी दिग्दर्शक. त्यांची संस्था इम्फाळची. मणीपूरने कन्हाईलाल आणि रतन थिय्याम हे दोन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिग्दर्शक मिळवून दिले. या दोन्ही दिग्दर्शकांनी स्वत:ची रंगभाषा निर्माण करून तिच्याद्वारे सौंदर्याचा शोध घेतला. पण दोघांची तऱ्हा न्यारी. एकमेकांपासून खूप भिन्न. रतन थिय्याम यांची नाटकं पात्रबहुल, मार्शल आर्ट आणि मणिपुरी नृत्यशैलीचा कलात्मक वापर करत भव्य पट मांडणारी. नेत्रदीपक. रंगांची उधळण करणारी. चकित करणारी. तर, कन्हाईलाल यांची नाटकं मोजक्या पात्रांची, नेमका आशय मांडणारी, त्यासाठी नटाच्या शरीरापासून संगीत, प्रकाश यांचा नेमका आणि अचूक वापर करण्यावर भर देणारी आणि साधी. कुठेही बडेजाव न मांडणारी. आशयाच्या गाभ्यापर्यंत अलगद जाणारी. त्यांच्या या शैलीचा प्रत्यय 'डाकघर' बघताना आला.
कन्हाईलाल यांची 'पेबेथ', 'नुपी' आणि आता 'डाकघर' ही नाटकं महाराष्ट्रात आली. या तिन्ही नाटकांचं प्रमुख सामर्थ्य होतं ते म्हणजे अभिनेत्री सावित्री यांचं त्यातल्या प्रमुख भूमिकेत असणं. सावित्री या कन्हाईलाल यांच्या पत्नी. आज त्यांनी सत्तरी ओलांडली आहे. ही सत्तरीतली बाई 'डाकघर'मधल्या अमल या आठ वर्षांच्या मुलाच्या प्रमुख भूमिकेत होती.
रवींद्रनाथांनी या छोटेखानी नाटकात अमल या मुलाच्या रूपाने मुक्तीच्या ध्यासाची कथा मांडली आहे. आपल्या चुलत्याकडे दत्तक म्हणून गेलेला हा मुलगा एका छोट्या खोलीत बंदिवान होऊन पडला आहे. डॉक्टरांनी त्याला खोलीबाहेर न पडण्याची सक्त ताकीद दिली आहे कारण तो कुठल्याशा असाध्य रोगाने आजारी आहे. पण अमलला बाहेरचं जग बघायची आस लागली आहे. त्याचा काका त्याला समजावतो, 'तू मोठा होऊन डॉक्टरांसारखा ज्ञानी हो. घरात बसून खूप पुस्तकं वाच. बाहेर पडायची गरजच नाही.' त्यावर अमल म्हणतो, 'मग मला ज्ञानी व्हायचंच नाही. मला बाहेर पडून डोंगर बघायचा आहे, झऱ्याच्या पाण्यात खेळायचं आहे.' पण आता मात्र तो नाईलाजाने खिडकीत बसून राहतो आणि बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांशी बोलत बसतो. त्याच्या घराच्या वाटेवर त्याला दहीवाला भेटतो, राखणदार भेटतो, फुलवालीची मुलगी सुधा भेटते, गावचा मुखिया भेटतो. राखणदाराकडून त्याला कळतं की समोरच्या टेकडीवरची इमारत म्हणजे पोस्ट ऑफिस आहे. मुखिया त्यात भर घालतो. तो म्हणतो, हे डाकघर राजाने बांधलं आहे आणि राजा लहान मुलांना छोटी छोटी पत्रं लिहितो. त्याने तुलाही पत्र लिहिलेलं असणार. अमल कल्पनेने बाहेरचं जग आपल्या मनोविश्वात रचत असतो. आता त्याच्या कल्पनेच्या राज्यात एक राजा येतो. त्याने पाठवलेलं पत्र घेऊन येणारा राजदूत येतो. राजदूत सांगावा आणतो की अमलवर उपचार करायला खास राजवैद्य येणार आहे. आणि खरोखरच राजवैद्य येतोही. पण कल्पनेत दंग झालेला अमल स्वप्न बघतच मरून जातो.
अमल घराच्या चौकटीतून बाहेर पडायचं स्वप्न बघतो. कैद होण्याचं नाकारतो. स्वातंत्र्यासाठी धडपडतो. त्याच्या या स्वातंत्र्यात श्रमाचा आनंद घेण्याची आस आहे. माणसांशी साधलेला संवाद आहे. त्यांचे वेगवेगळे स्वर, त्यातून येणाऱ्या नादमय हाका याची त्याला गंमत वाटते. त्याला समोरच्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे, झरे पाहायचे आहेत. फुलं पाहायची आहेत. राखणदार वाजवतो त्या घंटेचा टण टण असा टोल ऐकू येतो. हा नाद तो कानात साठवतो. दहीवाल्याची 'दहीऽऽ' अशी आरोळी त्याला गमतीशीर वाटते. हे नाद, त्यातले रंग, पक्ष्यांची किलबिल, डोंगराचं सौंदर्य ह्या सगळ्यात सृष्टीचं सौष्ठव भरलं आहे. ते जवळून अनुभवायला आसुसलेला अमल स्वप्न बघत बघत मरून जातो. मुक्तीची मूळ मानवी प्रेरणा जागवणारी ही अमलची कथा दुसऱ्या बाजूने माणसासाठी खरी मुक्ती हे स्वप्नच ठरेल की काय, असा व्याकुळ करणारा विचार हलकेच सोडून जाते.
रवींद्रनाथांच्या संवादांतून आणि प्रसंगरचनेतून एक रोमँटिक मूड सतत पाझरत असतो. सौंदर्याच्या ओढीने तडफडणाऱ्या मानवी मनाचा हा प्रवास शोकात्म आहे. या नाटकाचा हा स्थायी भाव कन्हाईलाल यांनी आपल्या रंगभाषेतून पकडला आहे. छोट्या गोलाकार वर्तुळात वावरणारा अमल आणि मागे पात्रं जाण्यायेण्यासाठी साकारलेल्या अर्धवक्र प्लॅटफॉर्ममधून सूचित होणारी टेकडी याहून अधिकचं नेपथ्य नाटकाला नाही. अमलची खिडकी त्याच्या मागे साकार होते आणि त्या चौकटीत फूल आहे.
कन्हाईलाल यांचे पुत्र एच. टोम्बा यांनी अतिशय नजाकतदार, मधुर संगीत दिलं आहे. त्यात निसर्गातले नाद आहेत आणि पात्रांची सहज लयीतली गाणी आहेत. पात्रांच्या संवादांनाही अशी छान लय आहे की ते देखील एक संगीतच वाटू लागतं. कलावंतांचे पदन्यास, नृत्यमय हालचाली आणि एका लयीतले आगम निर्गम यामुळे नाटक झुलत राहतं.
सावित्री यांनी अमलच्या भूमिकेचा गाभा थेट पकडला आहे. आपल्या अवघ्या वृत्तीत त्यांनी मूलपण आणलं आहे. त्याच्या डोळ्यातून प्रकटणारं कुतूहल, आशंका, अनाम ओढ, लगबग, तडफड, हर्षोल्लास आणि प्राणांतिक घुसमट, निराशा, झाकोळ या सर्व भावनांसाठी सावित्री यांनी हाताचा पायांचा केलेला वापर, डोळ्यांची उघडमीट आणि स्वरातली आर्तता यांची एक सुरेख हार्मनी साधली गेली. या सगळ्याच गोष्टींचा एक घट्ट गोळीबंद आविष्कार साकार होत रवींद्रनाथ टागोरांच्या काव्यात्म आशयाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला.
निर्मिती : कलाक्षेत्र, इम्फाळ
लेखक : रवींद्रनाथ टागोर
दिग्दर्शक : एच. कन्हाईलाल
संगीत : एच. टोम्बा
नेपथ्य : गौरप बुर्राह
प्रकाशयोजना : एल. इबोचाउबा
कलावंत : सावित्री, प्रवीण साइकिया, सपम ब्रोजन, धनंजय राभा, गुरू कोकेन, बादल लोध, सलाम बेमबेम व इतर.
दर्जा : **** (चार)