'करून गेलो' सागर
कल्पेशराज कुबल, साठ्ये कॉलेज
वैभव मांगले आणि भाऊ कदम या जोडीनं सुपरहिट केलेलं 'करून गेलो गाव' हे नाट पुन्हा एकदा रंगभूमीवर येतंय. आता या नाटकात वैभवची जागा घेणार आहे सागर कारंडे. या निमित्तानं भाऊ आणि सागर ही लोकप्रिय जोडी रंगभूमीवर एकत्र येणार आहे.
यापूर्वी या दोघांनी 'फु बाई फु', 'चला हवा येऊ द्या'मधून प्रेक्षकांना खदखदून हसवलं आहे. 'जस्ट हलकं फुलकं' या नाटकानंतर तीन वर्षांनी सागर पुन्हा रंगभूमीकडे वळला आहे. 'टीव्हीवर काम करत असताना खूपच बिझी असायचो. त्यामुळे नाटक करायला मिळत नव्हतं. रंगभूमीपासून दूर असल्यामुळे आतून कुठेतरी अस्वस्थ होतो. त्यामुळे टीव्हीमधून थोडा मोकळा वेळ मिळाल्यानं लगेचच नाटकाकडे मोर्चा वळवला', असं सागर सांगतो. महेश मांजरेकर 'करून गेलो गाव' या नाटकावर सिनेमा करणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होत होती. पण, आता नव्या रूपातलं 'करून गेलो गाव' ते घेऊन येत आहेत. लवकरच त्याचा शुभारंभाचा प्रयोग होतोय. २०११ साली १४ एप्रिलला या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग झाला होता. आणि आता सात वर्षांनंतर योगायोगानं पुन्हा १४ एप्रिलाच हे नाटक नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येतंय.
नाटकात सागरच्या तोंडी संगमेश्वरातील कोकणी बोलीभाषा आहे. भाषेचा हेल अचूक जमावा, उच्चार बरोबर यावेत यासाठी सागर सध्या तालमीमध्ये आवर्जून तशाच भाषेत बोलत होता. यापूर्वी सागरनं 'वस्त्रहरण' या नाटकात अर्जुनची भूमिका साकारत त्याचे काही प्रयोग केले होते.
मी विनोदी भूमिकाच स्वीकारतो असं अनेकदा बोललं जातं. पण, माझी प्रत्येक विनोदी भूमिका, ही आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी कशी होईल असा माझा प्रयत्न असतो. प्रेक्षकांना हसवणं खूप कठीण आहे. वेळोवेळी विविध भूमिका साकारताना मला हे जाणवतं.
- सागर कारंडे, अभिनेता