अ‍ॅपशहर

विजय केंकरे शंभरीत, ‘काळी राणी’ नाटकासहित नाट्यकारकिर्दीची यशस्वी शतकी खेळी

विजय केंकरे आता ‘काळी राणी’ या आपल्या नव्या नाटकासहित आपल्या नाटयकारकिर्दीचं शतक साजरं करतायेत. ‘काळी राणी’ हे त्यांच १०० व नाटकं ११ डिसेंबरला रंगभूमीवर येतयं.

Authored byमधुरा नेरुरकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2022, 4:59 pm
नाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊन , ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलीतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचविणारे विजय केंकरे आता ‘काळी राणी’ या आपल्या नव्या नाटकासहित आपल्या नाटयकारकिर्दीचं शतक साजरं करतायेत. ‘काळी राणी’ हे त्यांच १०० व नाटकं ११ डिसेंबरला रंगभूमीवर येतयं. या नाटकाची खासियत म्हणजे विजय केंकरे यांचे जसे १०० वे नाटक आहे तसेच या नाटकाशी संबधित असलेल्या कलाकार तंत्रज्ञ यांनीही या नाटकाद्वारे आपल्या नाट्यकारकिर्दीचे वेगवेगळे टप्पे गाठले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Vijay Kenkre


रत्नाकर मतकरी यांचे ९० वे नाटक, प्रदीप मुळ्ये २०० वे नाटक, अजित परब ४० वे नाटक शीतल तळपदे १२५ वे नाटक, मंगल केंकरे ५० वे नाटक वे नाटक राजेश परब ५० वे नाटक, अक्षर शेडगे १४०० वे नाटक आणि डॉ. गिरीश ओक यांचे ५१ वे नाटक. असा भन्नाट योग ‘काळी राणी’ या नाटकाने साधला आहे. ‘काळी राणी’ या नाटकात मनवा नाईक, हरीश दुधाडे, आनंद पाटील, चंद्रलेखा जोशी, आणि डॉ. गिरीश ओक यांच्या भूमिका आहेत. ‘ऑल दि बेस्ट’ ‘हमिदाबाईची कोठी’, ‘हॅम्लेट’ नंतर मनवा नाईक हीचं ‘काळी राणी’ हे नवीन नाटक आहे. डॉ. गिरीश ओक यांचा ६६६६ वा प्रयोग या नाटकाद्वारे रंगणार आहे.

हे नाटक आहे.. एका राणीच जिचं स्वप्न आहे मायानगरीमधल्या रंगीबेरंगी दुनियेवर राज्य करण्याचं, एका अशा लेखकाचं, ज्याचा प्रत्येक चित्रपट सिल्व्हर जुबली आहे.. ज्याच्यासाठी फक्त स्वतःचं नावच सर्वस्व आहे आणि एका निर्मात्याच ज्यांनी या दोघांना चित्रपट सृष्टीची सफर घडवलेली. हा निर्माता म्हणजे चित्रपटसृष्टीनी पाहिलेला सर्वात मोठा शो मॅन. एकमेकांच्या स्वप्नांत अडकलेल्या तीन व्यक्ती तुमच्या भेटीला येणार आहेत. ‘काळी राणी’ या दोन अंकी नाटकामधून.

मल्हार आणि दिशा निर्मित ‘काळी राणी’ या नाटकाचं लेखन रत्नाकर मतकरी यांचं असून दिग्दर्शन- विजय केंकरे यांचं आहे. नेपथ्याची जबाबदारी प्रदीप मुळ्ये तर प्रकाश योजनेची जबाबदारी शीतल तळपदे यांनी सांभाळली आहे. संगीत अजित परब यांचे असून वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. रंगभूषा राजेश परब यांची असून वेशभूषा संध्या खरात यांची आहे सूत्रधार संतोष शिदम आहेत. या नाटकाचे निर्माते प्रिया पाटील, डॉ. माधुरी सरनाईक, अनिता महाजन, ऋतुजा शिदम आहेत.

विजय केंकरे यांनी चित्रपट आणि दूरचित्रवाणीसारख्या माध्यमांमध्येही काम केले असले तरी नाटक हाच त्यांचा पिंड. रंगभूमीवर अव्याहत न थकता काम करणारी जे रंगकर्मी आहेत त्यात विजय केंकरे हे नाव आवर्जून घ्यावे लागले. केवळ पारंपरिक पद्धतीने 'थिएटर' करत राहिले नाहीत, तर प्रयोगशील नाट्यकर्मी म्हणून फार मोलाचे काम त्यांच्या हातून घडले आहे.

व्यवसायिक आणि समांतर रंगभूमीवर त्यांनी सातत्याने काम केलं आहे. एवढंच नाही तर १७ वेगवेगळया देशात प्रयोग झालेआहेत.
विजय केंकरे यांनी परदेशात जाऊन विशेषतः ब्रॉडवे आणि वेस्टएण्डवर जाऊन अनेक नाटकं पाहिली आहेत. या नाटकांच्या निमित्ताने जगातल्या वेगवेगळ्या नाटय शैलीचा अभ्यास केला.

आपल्या वडिलांचा दामू केंकरे यांचा रंगभूमीचा खणखणीत वारसा घेऊन विजय केंकरे यांची वाटचाल सुरु आहे. व्यावसायिक आणि समांतर रंगभूमीवरील सुमारे १०० नाटकांचे दिग्दर्शन करणाऱ्या विजय यांनी आजवर वेगवेगळया भिन्न जातकुळीची नाटकं दिग्दर्शित करून टाइपकास्ट न होण्याची दक्षता घेतली. यातूनच त्यांच्या यशस्वी दिग्दर्शकीय कारकीर्दीची कल्पना येईल.
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख