प्रिय,
भारत गणेशपुरे, भाऊ कदम
मी नेहमी पत्र वाचून दाखवतो. पण, आज मला पत्र लिहायची संधी मिळालीय. म्हणून तुम्हा दोघांना हे पत्र. भारत तू माझ्या आयुष्यात आलास ते सर म्हणून. तुला पहिली हाक 'भारत सर' अशी मारलेली मला आजही आठवते. तुझं प्रत्येक काम बघण्यासाठी मी आतुर असायचो. कारण, त्यातून मला शिकायला मिळायचं. सरांचा नंतर मित्ररुपी भरत्या कधी झाला हे मलाही कळलं नाही. याचं सर्व श्रेय तुलाच आहे. तुझं ते मोठेपण आहे की तू मला तुझ्या मैत्रीच्या रिंगणात येऊ दिलंस. तू इंडस्ट्रीमधला माझा आई-बाबा, भाऊ आहेस.
भाऊ, तुला आपले दादर स्टेशनवरचे दिवस आठवत असतील. खिशात भुर्जी-पाव खाण्याइतकेही पैसे नसायचे. आपण एक-एक रुपया जोडून एक वडापाव दोघात खायचो. तुझी डोंबिवली ट्रेन चुकल्यावर रात्रभर स्टेशनला बसून मारलेल्या गप्पा आजही आठवतात. तेव्हा आपण म्हणायचो काहीतरी भारी करून दाखवू आणि सगळे आपल्याला ओळखतील. त्या शब्दांमधले काही शब्द आज खरे झाले आहेत. त्याचा मला जितका आनंद होतोय तितकाच तुलाही होतोय हे मला माहितीय. तेव्हाची आपली गट्टी कायम आहे आणि ती पुढेही राहिलं.
- तुमचा हसवणारा मित्र
सागर कारंडे
शब्दांकन - सागर कारंडे