अ‍ॅपशहर

बदलांसाठीहोऊ सज्ज!

महिलांनी आज वेगवेगळ्या क्षेत्रांत मुसंडी मारली आहे. अनेक क्षेत्रांत महिला आघाडीवर असल्या, तरी काही प्रश्न मात्र आजही कायम आहेत. एक स्त्री म्हणून जगताना तुम्हाला नेमकी कसली उणीव जाणवते हे आम्ही काही महिला सेलिब्रिटींना विचारलं. तसंच ‘जागतिक महिला दिना’निमित्त, महिलांनी खास संकल्प करून त्यांच्या कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं पाहिजे यावर त्यांना बोलतं केलं. याबाबत त्यांना काय वाटतं हे या अभिनेत्रींनी मुंटाच्या व्यासपीठावरुन तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे.

Maharashtra Times 8 Mar 2016, 3:36 pm
समानता फक्त बोलण्यापुरती आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालते असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. स्त्री-पुरुष समानता ही फक्त बोलण्यापुरती आहे. अनेक ठिकाणी अजूनही फक्त पुरुषांचंच वर्चस्व दिसून येतं. यात कुठेतरी बदल व्हायला हवा. त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. शिवाय हल्ली स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुढे जातेय. त्यामुळे समाजात वावरताना मुख्य प्रश्न असतो तो सुरक्षिततेचा. महिलांच्या सुरक्षिततेबाबत आजही फार बरी परिस्थिती नाही. त्यामुळे एक स्त्री म्हणून जगताना सुरक्षितता आणि समानता या दोन महत्वाच्या उणिवा मला जाणवतात. - सुरुची अडारकर, अभिनेत्री
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mahila din
बदलांसाठीहोऊ सज्ज!


हवी आहे सुरक्षितता आम्ही महिला आहोत म्हणून स्वतःचं संरक्षण करू शकत नाही असं नाही. पण महिला अजूनही रूढी आणि परंपरांमध्ये अडकल्या आहेत. त्यामुळे बंडखोर व्हायला किंवा आत्मसंरक्षण करायला त्या धजावत नाहीत. शहरातल्या मुलींच्या बाबतीत ही परिस्थिती बदलू लागली आहे. त्या आक्रमक होऊ लागल्या आहेत. पण गावांमध्ये मात्र चित्र अजूनही निराशाजनक आहे. स्त्रीभ्रूण हत्या अजूनही अस्तित्वात आहेच. ती थांबायला हवी. बलात्काराचं वाढतं प्रमाण रोखण्याची गरज आहे. सुरक्षितता हवी आहे. - शर्मिष्ठा राऊत, अभिनेत्री

स्त्रीत्वाचा अभिमान बाळगा सध्या महिला एका विचित्र परिस्थितीत अडकल्या आहेत असं मला वाटतं. प्रत्येक क्षेत्रात त्या उत्तम काम करू शकतात याबद्दल शंका नसते. पण याची अनेकदा नोंद घेतली जात नाही म्हणून आपण हे दाखवायला जातो की आम्ही किती ग्रेट आहोत. मुळात स्‍त्री ही जात्याच सर्वगुणसंपन्न असते. आपल्यात असलेलं बाईपण जपून त्याचा अभिमान बाळगायला हवा. त्याची ताकद खूप मोठी असते. अनेकदा स्‍त्रीला मागे खेचणारी व्यक्ती ही दुसरी स्‍त्रीच असते. या मानसिकतेतही बदल घडायला हवा. स्त्रियांनी एकत्रित येऊन प्रत्येकीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं. - मधुरा वेलणकर, अभिनेत्री

दृष्टिकोन बदलायला हवा मला भासणारी उणीव ही एखाद्या घटकाबद्दल नसून संपूर्ण दृष्टिकोनाबद्दलच आहे. आज आपण स्त्री-पुरुष समानतेबद्दल कितीही बोलत असलो तरी प्रत्यक्षात ही समानता अंमलात आणायची वेळ आली की आपला दृष्टिकोन बदलतो. एकीकडे आपण मुलींना शिकवायला हवं असं म्हणतो, पण लग्नाची वेळ आली की कमी शिकलेल्या मुलासोबत तिचं लग्न लावून देत नाही. हा दुहेरी दृष्टिकोन मला खटकतो. या बदलाची सुरूवात कदाचित आपण आपल्या पुढच्या पिढीपासून करू शकतो. - गिरीजा ओक-गोडबोले, अभिनेत्री

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज