अ‍ॅपशहर

टक्कर आणतेय चक्कर

एकाच वेळी दोन-तीन सिनेमे समोरासमोर उभे ठाकल्यानं होणाऱ्या नुकसानाचा मुद्दा मुंटानं वारंवार पुढे आणला आहे. ‘सचिन’विरुद्ध चार सिनेमे झाल्यानंतर गेल्या आठवड्यात ‘मुरांबा’ विरुद्ध ‘एफयू’ यांच्यात टक्कर झाली. आता आणखी चार सिनेमेही एकाच वेळी प्रदर्शित होत आहेत. मराठी सिनेसृष्टी अजूनही यातून धडा घेत नसल्याचंच दिसून येतंय…

Maharashtra Times 10 Jun 2017, 3:26 am
एकाच वेळी दोन-तीन सिनेमे समोरासमोर उभे ठाकल्यानं होणाऱ्या नुकसानाचा मुद्दा मुंटानं वारंवार पुढे आणला आहे. ‘सचिन’विरुद्ध चार सिनेमे झाल्यानंतर गेल्या आठवड्यात ‘मुरांबा’ विरुद्ध ‘एफयू’ यांच्यात टक्कर झाली. आता आणखी चार सिनेमेही एकाच वेळी प्रदर्शित होत आहेत. मराठी सिनेसृष्टी अजूनही यातून धडा घेत नसल्याचंच दिसून येतंय…
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi films clash on box office
टक्कर आणतेय चक्कर


गेल्या आठवड्यात बॉक्सऑफिसवर ‘मुरांबा’ विरुद्ध ‘एफ यू’ अशी टक्कर झाली. दोन चांगले मराठी सिनेमे एकत्र प्रदर्शित झाल्यानं अखेर इंडस्ट्रीलाच कसा फटका बसतो त्याचं आणखी एक उत्तम उदाहरण लगोलग पाहायला मिळालं. या चढाओढीत ‘मुरांबा’ पुढे गेल्याचं दिसून येत आहे. पहिल्या आठवड्यात 'मुरांबा'ला अंदाजे २०० स्क्रीन्स मिळाले होते, जे दुसऱ्या आठवड्यातही कायम राहतील. तुलनेत दुसऱ्या आठवड्यात 'एफयू'चे स्क्रीन्स मात्र ४००वरून थेट १५०वर गडगडलेत. यातूनच सिनेमाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल अंदाज लावता येऊ शकतो. त्याबरोबरच ‘धोंडी’, ‘अॅटमगिरी’, ‘झरी’, ‘त्राटक’ हे सिनेमेही या शुक्रवारी प्रदर्शित झाले आहेत. त्यांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो यावर आता लक्ष आहे.

सिनेमांच्या या टक्करमुळे होणारं नुकसान निर्मात्यांना चक्कर आणत असली तरी परिस्थिती बदलण्याचं नाव घेत नाहीय. 'एफयू'नं जवळपास दीड कोटींचा गल्ला जमवला, तर 'मुरांबा'नं ८० लाखांची कमाई केलीय. मिळालेल्या स्क्रीन्सच्या तुलनेत 'मुरांबा'चं यश मोठं असल्याचं सांगितलं जातंय. पण तरीही प्रेक्षक विभागला गेल्याचा फटका या दोन्ही सिनेमांना बसला. हे सिनेमे वेगवेगळे प्रदर्शित झाले असते, तर 'एफयू'नं कदाचित आणखीन चांगला व्यवसाय केला असता असा सिनेतज्ज्ञांचा अंदाज आहे. या आठवड्यात येणाऱ्या चित्रपटांची तशी फार चर्चा नाही. तरीही 'मुरांबा', ‘एफ यू’, 'चि. व चि. सौ. कां', ‘धोंडी’, ‘अॅटमगिरी’, ‘झरी’, ‘त्राटक’ या सिनेमांमध्ये प्रेक्षक खेचण्यासाठी स्पर्धा असेल.

बॉलिवूडचा गल्लाही थंडा
गेल्या आठवड्यात हिंदीमध्ये 'दोबारा', 'अ डेथ इन द गंज', 'डियर माया', 'स्वीटी वेड्स एनआरआय', 'हनुमान दा दमदार' असे सिनेमे प्रदर्शित झाले. मात्र एकानंही दमदार म्हणावी अशी कामगिरी केली नाही. त्यात विशेष म्हणजे 'दोबारा' या हॉररपटाच्या तुलनेत लहान मुलांसाठी असलेला 'हनुमान दा दमदार' पुढे धावताना दिसला. जिथं 'दोबारा'नं ४० लाख कमावले, तिथं 'हनुमान..'नं अंदाजे ७० लाखांची कमाई केली आहे. 'बाहुबली २' आणि 'सचिन'ला मात्र अजूनही गर्दी होताना दिसत आहे. मात्र एकूण चित्र पाहता बॉलिवूडचा गल्लाही थंडा दिसतोय.

स्पर्धा तर होणारच
आजचा प्रेक्षकवर्ग हुशार आहे. आशय चांगला असेल तर आणि तरच सिनेमा चालेल. वर्षाच्या एकूण ५२ आठवड्यांत १०० ते १२५ मराठी सिनेमे येतात. सिनेमा प्रदर्शित करण्याआधी परीक्षा, पाऊस, आयपीएल अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो. त्यातच सलमान किंवा शाहरुखचा सिनेमा म्हटल्यावर आणखीनच आनंद. त्यामुळे मराठी सिनेमांना आपसातली टक्कर टाळणं अशक्य आहे. सिनेमांना अशा पद्धतीच्या स्पर्धेला सामोरं जावंच लागेल. अखेर प्रेक्षकांच्या मनाला जो भिडेल तोच सिनेमा बॉक्सऑफिसवर टिकेल. यासाठी इंडस्ट्रीनं मानसिक तयारी ठेवावी.
- नानूभाई जयसिंघानी, ज्येष्ठ सिनेनिर्माता, व्हिडियो पॅलेस

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज