मास्टर स्क्रिप्ट पहाडांत कुठेतरी गायब झाली म्हटल्यावर देव यांचे हातपाय गळाले. आशेचे सगळे मार्ग बंद झाल्यागत होते. 'या स्क्रिप्टशिवाय चित्रपट पूर्ण होणार तरी कसा? फिल्म बंद करनी पडेगी', असा हताश प्रश्न देव स्वत: युनिटलाच विचारत होते. युनिट बापडं काय बोलणार? 'हरे रामा हरे कृष्णा' बंद करण्याची वेळ आली होती...
....................................................
अभिषेक खुळे
abhishek.khule@timesgroup.com
नेपाळच्या काठमांडूनजीकचं ते अनुपम निसर्गसौंदर्य. तिथं एका ठिकाणी शूटिंगची लगबग. कॅमेरा सेट झाला, रिफ्लेक्टर लागले. 'अॅक्शन...' देव आनंद यांचा आवाज घुमला अन् शॉट सुरू झाला. तीन-चार रिटेक झाले. तरी, शांत स्वभावाच्या देव आनंद यांनी तेवढ्याच संयमानं सीन सुरू ठेवला. त्याचदरम्यान देव आनंद यांची नजर दूर उभ्या असलेल्या एका युवकावर गेली. आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा तो युवक भुरळ पडावी, असाच. सीन संपल्यानंतर देव यांनी सहकाऱ्याला त्या युवकाविषयी विचारलं. सहकाऱ्यानं सांगितलं, 'वे नेपाल के युवराज ग्यानेंद्रसिंग हैं.' देव स्वत: त्यांच्याजवळ गेले. विनंती करत म्हणाले, 'आप यहां सेट पर आईये. नजदीक से शूट देखिये.' मात्र, ग्यानेंद्रसिंग यांनी नकार दिला. म्हणाले, 'नही, आप चलने दीजिये. मैं आप को डिस्टर्ब नही करना चाहता...'
'हरे रामा हरे कृष्णा'... भारतीय चित्रपटसृष्टीतल्या इतिहासातलं एक महत्त्वाचं पान. भारतीय चित्रपटाचं रूपडं पालटणारी कलाकृती म्हणूनही या चित्रपटाकडे पाहिलं जातं. १९७०च्या दशकात या चित्रपटानं खूपच क्रांती केली. रसिकांना नवं काहीतरी मिळालं. नेपाळचं सौंदर्य, उत्कृष्ट कथा, तिची तेवढीच उत्तम मांडणी आणि त्यात शिखर गाठलं ते यातील संगीतानं. नव्या जमान्याचं, परदेशी बाजाचं ढिंच्यॅक संगीत याच चित्रपटातून आर.डी. बर्मन यांनी पहिल्यांदा दिलं, असं मानलं जातं. नेपाळसारख्या स्वर्गस्थळी होत असलेलं हे शूट कलावंत अन् युनिटसाठीही एक पर्वणीच होती. आई-वडील वेगळे झाल्यानं भावा-बहिणीची ताटातूट, हिप्पींचं भावविश्व, व्यसनाधीनता, वाढलेले गुन्हे, प्रेम... असे कित्येक कंगोरे या चित्रपटाला आहेत. एका रसिकाला जे हवं, ते सर्वकाही या चित्रपटात आहे. कथा देव यांची, दिग्दर्शक अन् नायकही तेच.
देव यांचा 'प्रेम पुजारी' पश्चिम बंगालमध्ये वादात सापडला होता. काही समुदायांनी या चित्रपटाचे पोस्टर्सही जाळले होते. विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याचा मुद्दा उपस्थित करून या चित्रपटाविरोधात मोठं आंदोलन उभारलं गेलं होतं. हे सगळं प्रकरण शांत झाल्यानंतर देव नेपाळला गेले. तिथं त्यांना 'हिप्पीं'ना जवळून बघता आलं. हिप्पी म्हणजे प्रस्थापित चालीरितींविरुद्ध स्वच्छंदपणे वावरणारा गट. त्यात प्रामुख्यानं तरुणांचा समावेश असतो. त्यांना पाहून देव यांच्या मनात कथा आकार घेऊ लागली. लगेच ही कथा कागदावर उतरली अन् चित्रपटाची तयारी सुरू झाली. अर्थात, चित्रपट नेपाल की हंसी वादियों में शूट करायचं ठरलं. काम मोठं आणि खर्चिक होतं. देव आपलं पूर्ण युनिट घेऊन नेपाळमध्ये दाखल झाले.
शूट सुरू झालं. काम तेवढ्याच मेहनतीनं सुरू होतं. एकदा देव यांनी युनिटला अर्ध्या दिवसाची सुटी दिली. म्हणजे, सकाळी सात ते अकरा यादरम्यानच शूट चाललं. कारण, देव यांना पहाडातील अन्य लोकेशन पाहण्यासाठी हेलिकॉप्टरनं जायचं होतं. शिवाय, सायंकाळी लवकर परतायचं होतं. कारण, अंधार पडल्यावर हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नव्हती. दिवसभर लोकेशनची पाहणी केल्यानंतर सायंकाळी देव सेटवर परतले. सकाळी ठरलेल्या वेळी शूट सुरू करायचं होतं. सेट लागला होता. देव आपल्या खुर्चीवर येऊन बसले अन् असिस्टंटला मास्टर स्क्रिप्ट मागितली. त्यानं सांगितलं, 'स्क्रिप्ट तो मेरे पास नही हैं.' देव आश्चर्यात पडले. सगळीकडे स्क्रिप्टची शोधाशोध सुरू झाली. तास-दोन तास गेले. स्क्रिप्ट मिळेना. मोठीच खळबळ उडाली. स्क्रिप्टशिवाय काम करणार कसं? शूट थांबलं. संयमी असलेल्या देव यांचा पारा आता मात्र चढला होता. स्क्रिप्ट नेमकी कुणाजवळ, कुठं होती, कुणालाच माहिती नव्हतं. तेवढ्यात देव यांना आठवलं... स्क्रिप्ट तर त्यांच्याचजवळ होती. पहाडांचं लोकेशन पाहताना ती कुठेतरी हेलिकॉप्टरमधून खाली पडली होती. देव यांनी 'हरे रामा...' म्हणत डोक्यावर हात मारून घेतला. एवढ्या मोठ्या परिसरात कुठं शोधायची आता मास्टर स्क्रिप्ट? डोळ्यांसमोर अंधारीच आली त्यांच्या. कारण, दिग्दर्शकाची मास्टर स्क्रिप्ट अतिशय महत्त्वाची असते. त्यात शॉट डिव्हिजन, छोट्या छोट्या नोंदी, बारीकसारीक पेपरवर्क असं सारं काही असतं. तीच मिळाली नाही, तर चित्रपट बंद करावा लागणार होता. एवढा मोठा खर्च वाया जाणार होता. काय करावं, कुणालाच काही सुचत नव्हतं. अख्खं युनिट चिंतेत पडलं होतं. स्क्रिप्ट पुन्हा लिहिणंही शक्य नव्हतं. कारण, कुठलंही निर्माण हे पहिल्याच बैठकीत जमून येतं. दुसऱ्यावेळी त्यात ती चमक राहिलंच, असं नाही. 'आता काय करावं', असा प्रश्न पडला असताना देव यांनी ठरविलं, पुन्हा हेलिकॉप्टरनं त्याच स्थळांवरून जायचं अन् स्क्रिप्ट शोधायची. पण, हे शक्य होणार होतं का? कारण, एवढा विस्तीर्ण परिसर अन् एवढीशी स्क्रिप्ट. तरी देव यांना आशा होती.
देव यांनी पुन्हा हेलिकॉप्टरनं परिसर पिंजून काढण्याची तयारी केली. मात्र, समस्या पाठ सोडायला तयार नव्हती. ज्या 'युनिसेफ'चं हेलिकॉप्टर देव या शूटिंगदरम्यान वापरत होते, त्याचा पायलट ऐनवेळी सुटीवर गेला होता. आफतच झाली. एक आशेचा कारण दिसला, तो 'अमेरिकन मिशन'चा. त्यांच्याकडे हेलिकॉप्टरविषयी तातडीनं विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांचं हेलिकॉप्टर नादुरुस्त होतं. आता मात्र आशेचे मार्ग बंद झाले, असं दिसत होतं. देव आणि युनिटचे हातपाय गळाले होते. 'फिल्म बंद करनी पडेगी?' असा हताश प्रश्न देव स्वत: युनिटलाच विचारत होते. युनिट बापडं काय बोलणार? काहीतरी चमत्कार व्हावा, असं प्रत्येकाला मनोमन वाटत होतं. पण, चमत्कार घडतात का? हो... किमान इथंतरी घडला...
सर्वकाही धुंडाळल्यानंतर देव यांना अचानक युवराज ग्यानेंद्रसिंग यांची आठवण झाली. 'युनिसेफ' आणि 'अमेरिकन मिशन'नंतर अख्ख्या नेपाळमध्ये तिसरं हेलिकॉप्टर होतं ते नेपाळच्या राजाजवळ. ग्यानेंद्रसिंग यांना फोन करण्याचं फर्मान देव यांनी सोडलं अन् मरगळ आलेल्या युनिटमध्ये पुन्हा धावपळ उडाली. देव यांनी ग्यानेंद्रसिंग यांना फोनद्वारे समस्या सांगितली. ग्यानेंद्रसिंग एवढंच म्हणाले, 'देवसाब, चिंता मत किजीये. मैं हूँ.' थोड्याच वेळात राजांचं हेलिकॉप्टर सेटवर दाखल झालं होतं. देव यांना घेऊन ते आकाशात झेपावलं. जिथं जिथं देव आधी गेले होते, तिथं तिथं ते घिरट्या घालू लागलं. देव दुर्बिणीतून कोपरानकोपरा पाहात होते. मात्र, स्क्रिप्ट कुठेही दिसत नव्हती. चार-पाच तास गेले. देव यांनी आशा सोडली. परतीचा प्रवास सुरू झाला. तोच पहाडावरील एका झाडाच्या फांदीवर त्यांना काहीतरी दिसलं. पाहतात तर ती स्क्रिप्ट होती, फांदीवर अडकलेली... नाजूक जागेवर. धक्का लागला असता तरी खाली पडून पहाडांत लुप्त होऊ शकली असती. देव ओरडलेच. हेलिकॉप्टर तिथं नेण्यात आलं. 'रेस्क्यू'सारखं ऑपरेशन राबविण्यात आलं. खूप काळजीपूर्वक ती स्क्रिप्ट फांदीतून काढण्यात आली. देव यांनी अधाशीपणानं आपल्याकडे ओढली अन् छातीशी कवटाळली. डोळ्यांत आनंदाश्रू होते त्यांच्या.
हेलिकॉप्टर सेटवर परतलं. स्क्रिप्ट मिळाल्याच्या वार्तेनं युनिटमध्ये नवचैतन्य पसरलं, सगळे नाचू लागले. कधीकधी चमत्कार घडू शकतात, हे इथं सिद्ध झालं होतं. यात मोठं योगदान होतं, ते ग्यानेंद्रसिंग यांचं. देव यांनी त्यांचे खूप खूप आभार मानले. उर्वरित शूट पुन्हा सुरू झालं.
आपल्याजवळच्या किमती, महत्त्वाच्या वस्तूंना आपण बरेचदा गृहीत धरतो, अर्थात माणसांबद्दलही हे लागू होतं. ती जर आपल्यापासून दूर गेली, तेव्हा शरीरातून प्राणच निघून जातात. म्हणून 'जपणूक' ही खूप महत्त्वाची असते. मग ती वस्तूची असो वा माणसाची. देव यांना हाच धडा यानिमित्तानं मिळाला होता.
'हरे रामा हरे कृष्णा' अखेर पूर्ण झाला. ९ डिसेंबर १९७१ला तो रीलिज झाला अन् हिटही झाला. या कलाकृतीची जादू आजही कमी झालेली नाही. 'दम मारो दम'चे सूर आजही गुंजतात. मात्र, ही कलाकृती बनवत असताना एका छोट्याशा चुकीनं देव यांचा 'दम' कसा निघून गेला होता, याची जाणीव ही कलाकृती पाहताना रसिकांना कदाचित होणार नाही. लेकिन हर अच्छे दस्तकारी के पीछे बहोत सी कहानियां और यातनायें छिपी होती हैं दोस्त...!