अ‍ॅपशहर

वेबवर गाजतेय संत्या-सुर्कीची गोष्ट; ६ लाख व्ह्यूज

ज्या गावात साधी एसटी बसही जात नाही, अशा गावातल्या चार कलाकारांनी एकत्र येऊन गावच्या पार्श्वभूमीवर एक सिनेमा तयार केला ठरवलं. सिनेमांची कोणतीही पार्श्वभूमी, अनुभव नसला, तरी सोबत होती ती जिद्द. या बळावरच त्यांनी महाराष्ट्रभर गाजत असलेला 'संतुर्की' हा मराठी वेब सिनेमा तयार केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jul 2019, 6:23 am
ज्या गावात साधी एसटी बसही जात नाही, अशा गावातल्या चार कलाकारांनी एकत्र येऊन गावच्या पार्श्वभूमीवर एक सिनेमा तयार केला ठरवलं. सिनेमांची कोणतीही पार्श्वभूमी, अनुभव नसला, तरी सोबत होती ती जिद्द. या बळावरच त्यांनी महाराष्ट्रभर गाजत असलेला 'संतुर्की' हा मराठी वेब सिनेमा तयार केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new marathi web cinema based on santya surki story is attracting crowd
वेबवर गाजतेय संत्या-सुर्कीची गोष्ट; ६ लाख व्ह्यूज


रामेश्वर जगदाळे, एमडी कॉलेज

'गावाकडच्या गोष्टी' या वेबवरील गोष्टी खूप गाजल्या. त्यातली संत्या-सुर्कीची जोडी सर्वांना आवडली. पण, त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी यात कळल्या नव्हत्या. त्याच गोष्टींवर आधारित 'संतुर्की' हा मराठी वेब सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. त्याला जवळपास सहा लाख व्ह्यूज मिळाले आहेत. दिग्दर्शक नितीन पवार हा सिनेमा घेऊन आला आहे.

सिनेमा-नाटकात काम करण्याचं स्वप्नं घेऊन अनेक मुलं धडपड करत असतात. सर्वांनाच काम मिळतं असं नाही. म्हणूनच नितीन पवार, अविनाश पवार, संतोष राजमाने, आणि कृष्णत पवार चार कलाकारांनी आपल्या गावातच 'कोरी पाटी प्रोडक्शन'ला सुरुवात केली. मुंबईत राहूनही गावाकडची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे प्रत्येक गावात घडणाऱ्या आणि लोकांना आपल्याशा वाटणाऱ्या गोष्टींवर आधारित 'गावाकडच्या गोष्टी'ची निर्मिती केली.

या प्रवासाबद्दल दिग्दर्शक नितीन पवार म्हणाला, की 'सिनेमात काम करायचं स्वप्न घेऊन मी मुंबईत आलो होतो. पण इथे काम करायचं म्हणजे ओळखी आणि बऱ्याच गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते. पण, गावी जाऊन काहीतरी सुरू करायचं ठरवलं. त्यामधून 'गावाकडच्या गोष्टी'ची निर्मिती झाली. पहिला भाग त्यानंतर दुसरा भाग असे आम्ही एकामागोमाग एक गोष्टी आम्ही देत होतो. तिसऱ्या भागानंतर लोकांचा प्रतिसाद वाढला. हळूहळू संपूर्ण सीरिज महाराष्ट्रानं डोक्यावर घेतली. यातल्या संत्या आणि सुर्की या जोडीबद्दल लोकांमध्ये अनेक प्रश्न होते. त्यांची उत्तरं आम्ही 'संतुर्की'तून देण्याचा प्रयत्न केला आहे.' अवघ्या चार महिन्यांमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'गावाकडच्या गोष्टी'ला काही नामांकित पुरस्कार सोहळ्यात नामांकनही मिळालं होतं.

अभिनयासाठी सोडली सैन्यातली नोकरी

या चित्रपटात आणि सीरिजमध्ये बापू हे पात्र साकारणाऱ्या कृष्णत पवार या कलाकाराला अभिनय क्षेत्रात काम करायचं वेड आहे. अभिनयाच्या वेडापायी त्यानं चालून आलेल्या सैन्यातल्या नोकरीवरही पाणी सोडलं.

राज ठाकरेंनी दिला कॅमेरा

'गावाकडच्या गोष्टी' या मराठी सीरिजच्या संपूर्ण चमूला राज ठाकरे यांनी भेटायला बोलावलं होतं. चित्रीकरणासाठी उपयुक्त ठरेल म्हणून त्यांनी या चमूला एक दर्जेदार कॅमेरा भेट म्हणून दिला. त्या कॅमेराच्या सहाय्यानं 'संतुर्की' चित्रपटातली बरीचशी दृश्यं चित्रीत करण्यात आली आहेत.

गावच्या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव होता. गावच्या गोष्टींवर तसंच गावातल्या मुलांना घेऊन काही करायचं होतं, म्हणून या सीरीजची निर्मिती केली. सिनेमाचं स्वप्न म्हणून त्या गोष्टींमध्ये सोडलेले काही धागेदोरे घेऊन 'संतुर्की'ची निर्मिती झाली.
- नितीन पवार (दिग्दर्शक)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज