अ‍ॅपशहर

कुणी राजी, कुठे नाराजी

अजानच्या आवाजावरुन सोनू निगमनं केलेलं ट्विट सोमवारी दिवसभर चर्चेत होतं. या मुद्द्यावरुन इंडस्ट्रीत मात्र दोन गट पडल्याचं दिसून आलं. ‘त्या’ ट्विटमुळे सोनूला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं. तर अनेकांनी मात्र त्याने मांडलेल्या मुद्द्याला पाठिंबा दर्शवला.

मृण्मयी नातू | Maharashtra Times 19 Apr 2017, 3:02 pm
अजानच्या आवाजावरुन सोनू निगमनं केलेलं ट्विट सोमवारी दिवसभर चर्चेत होतं. या मुद्द्यावरुन इंडस्ट्रीत मात्र दोन गट पडल्याचं दिसून आलं. ‘त्या’ ट्विटमुळे सोनूला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं. तर अनेकांनी मात्र त्याने मांडलेल्या मुद्द्याला पाठिंबा दर्शवला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sonu nigams controvercial tweet
कुणी राजी, कुठे नाराजी


आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे सोनू निगम सोशल मीडियावर ट्रेंडींग होता. त्याने ध्वनीप्रदूषणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यालाच थेट हात घातल्याने अनेकांनी त्याला भरभरुन पाठिंबा दिला. काहींनी यावर उघडपणे काही बोलणं टाळलं असलं तरी सोनूने जे म्हटलं ते योग्यच आहे अशी चर्चा सेलिब्रिटींमध्ये होत होती. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, लेखक अपूर्व अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर सोनूला पाठिंबा दिला. तर वाजिद खान, पूजा भट्ट यांनी मात्र काहीशी नाराजी दर्शवली.

सोनूच्या ट्विट्समुळे काहींच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत होती. ‘गुंडागिरी’ शब्दाचा हॅशटॅग वापरत संगीतकार वाजिद खान यांनी लिहिलं, की 'माझ्या प्रिय बंधू सोनू निगम यांचं 'अजान आणि मी मुस्लिम नसूनही'वालं ट्विट बघून मी दुखावलो आहे. मी तुला जेवढं ओळखतो त्यावरुन तुझ्याकडून अशी अपेक्षा मला नव्हती. हा तू नाहीस'. या प्रकारामुळे सोनू खूप ट्रोल झाला. पण इंडस्ट्रीत सोनूची बाजूही अनेकांनी घेतली. 'सोनू जे म्हणाला ते योग्य आहे. नियम हे सगळ्यांना सारखे असावेत. अजान असो वा हनुमान चालीसा, सगळ्यांनी ध्वनीप्रदूषण कसं थांबवता येईल यावर लक्ष केंद्रित करायला हवं. प्रत्येकाला त्यांचे सण आणि इतर धार्मिक गोष्टींचं पालन करण्याचा हक्क आहे. मात्र त्यामुळे दुसऱ्यांना त्रास व्हायला नको', असं गायक शाननं म्हटलंय.

'बळजबरीने चालणाऱ्या धार्मिक रुढी' बंद व्हायला हव्या असं म्हणत राहुल वैद्यनं सोशल मीडियावर सोनूला पाठिंबा दिलाय. ‘अलिगढ’ सिनेमाचा लेखक अपूर्व असरानीनं त्यांचं म्हणणं ट्विटरवर मांडलंय. ते लिहितात, 'जसं मला पहाटे अजान ऐकायचं नाही तसं संध्याकाळी चिकनी चमेलीच्या चालीवर गणेश आरतीही ऐकायची नाहीय. धर्माच्या नावावर लागणारे हे सर्व लाऊडस्पीकर्स बंद करावेत'. तसंच 'अनधिकृतपणे लाऊडस्पीकर्सवर वाजवल्या जाणाऱ्या अजान आणि इतर सगळ्या प्रार्थनांविरुद्ध मोहीम राबवायची असल्यास त्याला मी प्रायोजक बनू इच्छितो. याला काही कल्पक हॅशटॅग सुचवा. मुळात हा मुद्दा अजान किंवा इतरही कुठल्या धर्माचा नसून ध्वनीप्रदूषणाचा आहे. आवाज करून काय साध्य होणार आहे?' असा सवाल विवेक अग्निहोत्री यांनी केला आहे.

याप्रकरणाबत तरुण संगीतकार जुबिन नौटियालला विचारल्यावर तो सांगतो, 'कुणावरही धर्म लादला जात आहे असं मला वाटत नाही. लोकांना ज्यावर विश्वास आहे त्या गोष्टी ते करतात. भारतासारख्या लोकशाही देशात विविध धर्म शांतीनं एकत्र राहत आहे'. तर बाबा सेहगलनं मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं, की 'मी स्वतः यारी रोडला राहतो. पण तिथल्या आवाजांनी मला कधी त्रास झाला नाही. आपण विविध धर्मांतले लोक एकत्र राहत असून एकमेकांचा आदर करावा'. पूजा भट्टनं टिप्पणी करताना म्हटलं, की 'वांद्र्यातल्या एक शांत गल्लीत होणाऱ्या चर्च बेल्स आणि अजानच्या आवाजानेच माझी सकाळ होते. मी उदबत्ती लावते आणि भारताच्या स्पिरिटला सलाम करते.'

नियम हे सगळ्यांना सारखे असावेत. अजान असो वा हनुमान चालीसा, सगळ्यांनी ध्वनीप्रदूषण कसं थांबवता येईल यावर लक्ष केंद्रित करायला हवं.
शान, गायक

मुळात हा मुद्दा अजान किंवा इतरही कुठल्या धर्माचा नसून ध्वनीप्रदूषणाचा आहे. आवाज करून काय साध्य होणार आहे?'
विवेक अग्नीहोत्री, दिग्दर्शक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज