मुंबई टाइम्स टीम
भारतीय दंड संहितेतील ३७७ कलम अवैध ठरवून, समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्याला अलीकडेच एक वर्ष पूर्ण झालं. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देशभरात त्याची चर्चा झाली. त्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं 'ग्राझिया' या मासिकानं अलीकडेच 'सेलिब्रेट विथ प्राईड' या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला अभिनेत्री राधिका आपटेची विशेष उपस्थिती होती. यावेळी 'मुंटा'शी बोलताना राधिकानं तिची बिनधास्त मतं मांडली. 'या विषयावर लोक आता आधीपेक्षा जास्त बोलू लागले आहेत. तसं बिनधास्त आणि खुलेपणानं बोलायलाच हवं', असं ती म्हणाली.
त्या निर्णयाबाबत ती म्हणाली की, 'खरं तर हा निर्णय खूप आधीच घ्यायला हवा होता. देशातल्या सगळ्यांना समान हक्क आणि स्वातंत्र्य असायला हवं. कुणावर आणि कसं प्रेम करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अर्थात, यासाठी योग्य वय आणि संमती मात्र असायला हवी. यात काहीच गैर नाही. दुसऱ्याला हक्क देणारे आपण कुणीही नाही. आपले हक्क आपल्याला मिळताहेत का? आपण किती अपराधीपणाची भावना घेऊन जगतो हे आपण स्वतःलाच विचारायला हवं. आपण किती गोष्टी करत नाही, किती लोकांवर आपण प्रेम करतो, आपण कोण आहोत असे अनेक प्रश्न आपण स्वतःलाही विचारत नाही. त्यामुळे दुसऱ्यांचे अधिकार नाकारणारे आपण कुणीही नाही.'
कामाच्या निमित्तानं जगभर फिरताना काय चित्र पाहायला मिळतं, असं विचारल्यावर ती म्हणाली, की 'मी ज्या ग्रुपमध्ये फिरते त्या ग्रुपमधल्या सगळ्यांमध्ये या विषयांबाबत जागरूकता आहे. अलीकडेच मी एके ठिकाणी ट्रेननं प्रवास करत होते. त्यावेळी प्रवासामध्ये माझ्यासोबत एक महिलाही होती. त्या महिलेचे केस छोटे होते म्हणून एक पुरुष तिला काहीबाही बोलत होता. छोटे केस आहेत म्हणजे ती समलैंगिक असावी असा त्याचा समज झाला होता. त्यामुळे तिला वाईट वाटलं. पण, शेवटी मी तिची समजूत घातली. लोकांमध्ये याबाबत आणखी जागरूकता असायला हवी. आपल्या चित्रपटांमधून ते हल्ली होतंय.' असं ती सांगते.
फोटो : विनय राऊळ