अ‍ॅपशहर

‘एक मच्छर’…थांबवतोय शूटिंग

नाना पाटेकरांचा ‘एक मच्छर…’ हा प्रसिद्ध डायलॉग आठवतोय? याच मच्छरांमुळे मनोरंजनसृष्टी हैराण झालीय. बरेचसे कलाकार सध्या डेंग्यूमुळे आजारी पडल्यानं मालिका तसंच सिनेमांच्या शूटिंग्जवर याचा परिणाम झाल्याचं दिसून येतंय.

मृण्मयी नातू | Maharashtra Times 26 Sep 2017, 3:41 am
नाना पाटेकरांचा ‘एक मच्छर…’ हा प्रसिद्ध डायलॉग आठवतोय? याच मच्छरांमुळे मनोरंजनसृष्टी हैराण झालीय. बरेचसे कलाकार सध्या डेंग्यूमुळे आजारी पडल्यानं मालिका तसंच सिनेमांच्या शूटिंग्जवर याचा परिणाम झाल्याचं दिसून येतंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम celebrities sick by dengue
‘एक मच्छर’…थांबवतोय शूटिंग


'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतली शनाया, अर्थात रसिका सुनीलचा हॉस्पिटलमधला एक फोटो सध्या व्हायरल होतोय. तिला डेंग्यूची लागण झालीय. सध्या तिच्यावर ठाण्यातल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फक्त रसिकाच नव्हे तर इंडस्ट्रीतले अनेक कलाकार सध्या आजारी आहेत. त्यातही डेंग्यूचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं समजतंय. डासांमुळे डेंग्यूची लागण झाल्यानं अनेक ठिकाणी शूटिंगवर परिणाम झाला आहे.

रसिका आजारी असूनही तिला या आठवड्याअखेरीस काही तासांसाठी का होईना, पण शूटिंगला जावं लागणार आहे. नाटक 'बेबी डॉल'फेम अश्विनी कासारही सध्या घरी आहे. तिलाही डेंग्यूची लागण झाली आहे. मध्यंतरी 'जागो मोहन प्यारे' या मालिकेच्या सेटवर जवळजवळ दहा जणांना एकाच वेळी डेंग्यू झाल्याचं निदान झालं होतं. यात प्रमुख भूमिकेत असलेल्या श्रुती मराठेचाही समावेश होता म्हणे. त्यासोबतच काही दिवसांपूर्वी 'आरंभ' या भव्यदिव्य हिंदी मालिकेतली अभिनेत्री कार्तिक नायरलाही डेंग्यूच झाला होता. खरं तर त्यामुळे मालिकेचा क्लायमॅक्स रखडला होता. मालिका बंद पडायच्या काही दिवस आधी हा प्रसंग घडल्यानं ऐनवेळी प्रोडक्शन टीमची खूप धावपळ झाली होती. 'नामकरण' मालिकेत हर्लीनची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निलू कोहली यांनाही डेंग्यू झाला होता. त्यामुळे त्यांना पंधरा दिवस घरी आराम करावा लागला. कॉमेडीस्टार सुनील ग्रोव्हरला याच आजारानं ग्रासलं होतं. 'डासांपासून सावधान. स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा' असा संदेश देत त्यानं तब्येत सुधारत असल्याचं सोशल मीडियावर लिहिलं.

स्वाइन फ्लूचाही त्रास

केवळ डेंग्यूच नव्हे, तर काही बॉलिवूडकर स्वाईन फ्लूनं त्रस्त आहेत. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि पत्नी किरण राव या दोघांना स्वाईन फ्लू झाला होता. म्हणूनच सत्यमेव जयते वॉटर कपच्या एका मोठ्या सोहळ्यात ते सहभागी होऊ शकले नव्हते. अमेरिकेहून परतल्यावर बॉलिवूडची ग्लॅमगर्ल रिचा चड्डालाही स्वाईन फ्लू झाला होता. गणपती विसर्जनाच्या वेळी नाना पाटेकर यांची अनुपस्थितीही ठळकपणे जाणवली. ते किरकोळ आजारी असल्याचं त्यांचा मुलगा मल्हारनं तेव्हा मीडियाला कळवलं होतं.

आरोग्याला प्राधान्य

कॉमेडीकिंग कपिल शर्माच्या आरोग्याबाबत सध्या उलटसुलट चर्चा रंगतेय. तो सांगतो, की 'गेली दहा वर्षं एकही ब्रेक न घेता मी काम करत आलोय. सततची धावपळ, अनियमित आहार यामुळे मला रक्तदाब, शुगर आणि ताण-तणावांचा त्रास होतोय. सध्या त्यावर उपचार सुरू आहेत. आणखीन काही गंभीर समस्या उद्भवण्याच्या आत मी आरोग्याला प्राधान्य द्यायचं ठरवलंय.' इतकंच नाही तर सोशल मीडियावर अनेक दिवसांनी चाहत्यांशी बोलत तो 'द कपिल शर्मा शो' लवकरच परत घेऊन येणार असल्याचं आश्वासन त्यानं दिलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज