अ‍ॅपशहर

खंडेराय अंतर्धान पावणार

दररोज न चुकता टीव्हीवर खंडेरायांचं दर्शन घेणाऱ्यांसाठी एक बातमी आहे. तुमचं श्रद्धास्थान असलेले खंडेराय आता टीव्हीवरुन अंतर्धान पावणार आहेत. तुफान टीआरपी मिळवणारी ‘जय मल्हार’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय.

मृण्मयी नातू | Maharashtra Times 31 Mar 2017, 3:30 am
दररोज न चुकता टीव्हीवर खंडेरायांचं दर्शन घेणाऱ्यांसाठी एक बातमी आहे. तुमचं श्रद्धास्थान असलेले खंडेराय आता टीव्हीवरुन अंतर्धान पावणार आहेत. तुफान टीआरपी मिळवणारी ‘जय मल्हार’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jay malhar tv serial ends
खंडेराय अंतर्धान पावणार



'जय मल्हार' ही मालिका टीव्हीवर आली आणि अल्पावधीतच त्याचा मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या खंडोबाच्या कथांवर आधारित या पौराणिक मालिकेनं टीआरपीचे अनेक उच्चांक गाठले. तुफान लोकप्रियता मिळवणारी ही मालिका एप्रिलअखेरीस प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचे ९०० हून अधिक एपिसोड्स झाले असून, ९४२ वा एपिसोड हा याचा शेवटचा भाग असल्याचं कळतं.

१५ एप्रिल हा शूटचा शेवटचा दिवस असल्याचं समजतं. खंडोबा, म्हाळसा आणि बानू हे कैलासात जाताना दाखवून मालिकेचा अंत होणार असल्याचं समजतं. निर्माते महेश कोठारे यांनी मालिका संपत असल्याचं बुधवारी संध्याकाळी जाहीर केल्यावर कलाकार-तंत्रज्ञ यांना धक्का बसला. मालिका संपल्याचं कळल्यावर संपूर्ण युनिटला रडू कोसळलं.
मालिका बंद होतेय हे पचवणं अवघड असल्याचं इशा सांगते. ती म्हणाली, की 'प्रेक्षक भक्तीभावाने ही मालिका बघतात हे त्याचं सगळ्यात मोठं यश आहे. आता उच्चांक गाठल्यावर त्याची योग्यवेळी समाप्ती होत आहे असं मला वाटतं. सेटवरची सगळी गंमत आम्ही आता मिस करू'.

सुरभीच्या मनातही यामुळे संमिश्र भावना दाटून आल्याचं ती सांगते. 'कोठारे यांनी हे सांगितल्यावर अक्षरशः गहिवरून आलं. ही मालिका कधी बंद होतेय असं गमतीत आम्ही एकमेकांना चिडवायचो. पण आता ती खरंच बंद होतेय हे समजल्यावर ती होऊ नये असं मनापासून वाटतंय. म्हाळसाच्या या भूमिकेनं मला ओळख दिली आहे', असं सुरभी म्हणाली.

सुपरहिट रेटिंग्स
जय मल्हार ही नेहमी चांगले रेकॉर्ड्स असलेली मालिका असल्याचं निर्माते सांगतात. या मालिकेचा टीआरपी कायम ३च्या आसपास असल्याची माहिती मिळते. या प्रवासात रेटिंग्सचा हा आकडा ६ पर्यंतही गेला होता. मालिकेच्या काही महाएपिसोड्सनं तर ११-१२चा उच्चांक देखील गाठलाय.

भाग्याची गोष्ट
अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाची भूमिका साकारायची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट ठरली. आमचा सेट हा देवालय झालाय. तीन वर्ष साधारण ९०० एपिसोड्स आम्ही एकत्र काम केलंय. मालिका सुरू झाल्यानंतर जेजुरीला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम या मालिकेला मिळालं.
देवदत्त नागे

मूळ कथा संपल्याने…
मालिका सुरू व्हायच्या दीड वर्षं आधीपासून आम्ही त्यावर काम केलंय. शक्यतो त्यात काल्पनिक गोष्टींऐवजी वस्तुस्थिती दाखवण्यावर आमचा भर होता. आता मूळ कथा संपत आल्यानं अखेर आम्ही ऑफएअर जाण्याचा निर्णय घेतलाय.
महेश कोठारे, निर्माते

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज