अ‍ॅपशहर

नव्याने गवसते मराठी

वळवावी तशी वळणारी भाषा अशी मराठी भाषेची ख्याती आहे. मराठीचा गोडवाही न्याराच असा आहे. मराठी डेलीसोपसाठी लेखन करताना तरुण लेखक-लेखिकांना याचा अनुभव येत असतो. भाषेच्या या गोडव्याबद्दल त्यांनी 'मटा'ला काय सांगितलं ते जाणून घ्या त्यांच्याच शब्दांत…

Maharashtra Times 28 Feb 2017, 5:55 am
वळवावी तशी वळणारी भाषा अशी मराठी भाषेची ख्याती आहे. मराठीचा गोडवाही न्याराच असा आहे. मराठी डेलीसोपसाठी लेखन करताना तरुण लेखक-लेखिकांना याचा अनुभव येत असतो. भाषेच्या या गोडव्याबद्दल त्यांनी 'मटा'ला काय सांगितलं ते जाणून घ्या त्यांच्याच शब्दांत…
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi lekhak
नव्याने गवसते मराठी


स्वभाव तशा भाषा
मराठी भाषेचा गोडवा हा जितका शब्दांत असतो तितकाच तो माणसाच्या स्वभावातही असतो असं मला वाटतं. मी आजवर जितक्या मालिका लिहिल्या त्यासाठी वेगवेगळ्या बोलीभाषांचा वापर केला आहे. मग ती 'रात्रीस खेळ चाले'मधली मालवणी भाषा असो किंवा 'का रे दुरावा'मधली शहरी भाषा असो. यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती मालिकेतल्या पात्रांची. त्यांचे स्वभाव त्यांच्या भाषेला कारणीभूत असतात. त्यामुळे कदाचित मराठी बोलीभाषा जोपासली जाते आहे आणि टीव्हीसारख्या माध्यमातून ती घरोघरी पोहोचते आहे.
- प्रल्हाद कुडतरकर

विषयाला अनुसरुन
मालिका लिहिताना त्यातल्या विषयाला अनुसरून त्याची भाषा असावी हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच, ती भाषा प्रेक्षकांना आपलीशी वाटणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे 'जय मल्हार' ही मालिका लिहित असताना त्यातली प्राकृत मराठी भाषा थोडी वळवून ती प्रेक्षकांशी कनेक्ट करणं आवश्यक होतं. 'माझे पती सौभाग्यवती'साठी आणखी एका वेगळा लहेजा असलेली भाषा आम्ही वापरली होती. हल्ली मराठी चॅनेल्सवर वेगवेगळ्या बोलीभाषांतल्या मालिका सुरू आहेत. त्यामुळे प्रांतिक भाषांचा एक वेगळा गोडवा प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो आहे. शिवाय लेखक म्हणून ते साकारताना आम्हालाही तितकाच आनंद मिळतोय.
- आशुतोष पराडकर

नव्याने उलगडली
मराठी मालिकांसाठी लिखाण करताना मराठी भाषा मला नव्याने उलगडत गेली. मराठी भाषेचाच एक प्रकार मावळी भाषा, जिला ग्रामीण भाषेचा लहेजा असतो. ही भाषा मला मालिका लिहिताना शिकायला मिळाली आणि आता ती भाषा ग्रामीण भागातही पुन्हा रुजते आहे. मुळातच प्रेक्षक मालिकांमध्ये खूप गुंततात. त्यामुळे मालिकांद्वारे जर आपण योग्य आणि शुद्ध मराठी भाषा पोहोचवू शकलो, तर भाषेचा दर्जा वाढेल. मराठी भाषा फक्त सोशल मीडियापुरती न वापरता तिचा वापर असा प्रत्यक्षात केला तर आपली भाषा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकेल.
दिग्पाल लांजेकर

पात्रांप्रमाणे लहेजा बदलतो
मला असं वाटतं की मालिकांसाठी लिखाण करणं ही सगळ्यात सोपी गोष्ट असते. एक साधी, सरळ मराठी भाषा आपण मालिकांद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. पण मालिका लिहिताना मराठी भाषेचा लहेजा पात्रांप्रमाणे बदलू शकतो आणि भाषेची ही गोष्ट खरोखरच छान आहे.
मनस्विनी लता रवींद्र

शब्दांकन - ऋतुजा जोशी, संपदा जोशी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज