अ‍ॅपशहर

‘वलय’ मिळू लागलंय

कवितेच्या एका कार्यक्रमापासून आता त्यानं मराठी सिने इंडस्ट्रीत गीतकार म्हणून स्थिरावायला सुरुवात केली आहे. सध्या आघाडीच्या मराठी वाहिन्यांवरील चार मालिकांची शीर्षकगीतं त्यानंच लिहिलेली आहेत. वलय मुळगुंद हा पुणेकर तरुण आता सिने इंडस्ट्रीत उभा राहू लागला आहे.

Maharashtra Times 1 Sep 2016, 8:20 am
Asawari.Chiplunkar@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम valay mulgund is a new wanted lyricist in marathi film industry
‘वलय’ मिळू लागलंय


आघाडीच्या मराठी वाहिन्यांवरील चार मालिकांची शीर्षकगीतं पुण्याच्या वलय मुळगुंदनं लिहिली आहेत. हा तरुण आता सिने इंडस्ट्रीत उभा राहू लागला आहे.

‘दुनियादारी’ फेम दिग्दर्शक संजय जाधव यांची स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या एक मालिका सुरू आहे. तिचं नाव ‘दुहेरी’. तिचं शीर्षकगीत लिहिलंय एका पुणेकर तरुणानं, वलय मुळगुंदनं. मुंबई-पुण्यात सादर झालेले स्वरचित कवितांचे कार्यक्रम आणि काही सिनेमांसाठीही वलयनं लिहिलेली सुंदर गाणी यामुळे वलय परिचित आहे. अलीकडेच त्यानं लिहिलेल्या मालिकांच्या शीर्षकगीतांमुळे त्याच्या नावाची सिने इंडस्ट्रीत चर्चा होऊ लागली आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच्या नावाला ‘वलय’ मिळू लागलंय.

‘एका कवितेसाठी’ या कवितांच्या कार्यक्रमापासून वलयची कवी-गीतकार होण्याच्या वाटचालीस सुरुवात झाली. ‘एक झाड शब्दांचं’ हा त्याचा कविता संग्रहही प्रकाशित झाला आहे. फक्त पावसावरच्या कवितांचा ‘पाऊसखुणा’ हा कार्यक्रमही त्यानं मुंबई- पुण्यात सादर केला. यातूनच त्याला ‘अचानक’ या योगेश सोमण दिग्दर्शित सिनेमात पहिलं गीतलेखन करण्याची संधी मिळाली. या पहिल्याच सिनेमात मोठं आव्हान त्याच्यासमोर होतं, ते चालीवर गाणं लिहिण्याचं आणि तेही मोन्टाजेसना वापरलं जाणारं. याविषयी वलय म्हणाला, ‘विशिष्ट प्रसंगानुसार किंवा व्यक्तिरेखांनुसार चित्रित होणारं गाणं लिहिणं त्यामानाने सोपं असतं; कारण त्यात तुम्हाला प्रसंग किंवा व्यक्तिरेखेच्या स्वभावानुसार लिहिता येतं.’ तरीही वलयनं ‘भिंत कोणी कोंडली ही, कोपऱ्याशी भांडली ती, मोकळा श्वास द्या थोडा’ हे गाणं लिहिलं आणि ते चक्क शंकर महादेवन यांनी गायलं. त्यांच्याच स्टुडिओमध्ये झालेल्या या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर त्यांनी थेट वलयच्या पाठीवर शाबासकीची थाप देत सांगितलं, की तू अफाट शब्द लिहिले आहेस. मला फार आवडलं हे गाणं.

यानंतर वलयनं ‘टार्गेट’ सिनेमासाठी ‘वाटा या मोहरल्या आमच्याच येण्याने’ हे गाणं लिहिलं. अवधूत गांधी आणि रमा कुलकर्णी यांनी गायलेल्या या गाण्यानंतर वलयनं ‘दांडगी मुलं’ या सिनेमासाठी दोन गाणी लिहिली. त्यातलं एक महाराष्ट्रगीत अनेक मान्यवरांनी गायलं. त्यात ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांच्यापासून केतकी माटेगावकर या युवा गायिकेपर्यंत अनेकांचा समावेश होता. या वाटचालीत वलयनं लिहिलेली गाणी सुरेश वाडकर, अवधूत गुप्ते, साधना सरगम आणि स्वप्नील बांदोडकर यांसारख्या आघाडीच्या गायकांनाही गायली. सध्या तो सिनेमांप्रमाणेच मालिकांच्या शीर्षकगीतांतही गुंतला आहे.

नुकत्याच सुरू झालेल्या एका वाहिनीवरील तीन मालिकांची शीर्षकगीतं त्यानं लिहिली असून, यानिमित्त त्याच्या गीतांना अमितराज, पंकज पडघन या लोकप्रिय संगीतकारांनी चाली दिल्या आहेत. मुंबईस्थित ‘अदान’ या संस्थेच्या हिंदी नाटकासाठीही त्यानं नुकतीच तीन हिंदी गाणी लिहिली आहेत. तो एका मालिकेसाठी सहसंवाद लेखनही करतो आहे. ‘जय गणेश’ सोनी वाहिनीवरील मालिकेच्या मराठी रूपांतरासाठीचे संवादही वलयनं लिहिले असून, आकाशवाणीसाठी ‘किती जवळ, किती दूर’ या ६० भागांच्या मालिकेचंही लेखन केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज