'वर्तक नगर' वाचल्यावर तुम्हाला कदाचित ठाणे आठवेल. पण, हे सिनेमाचं नाव असून, तो अतुल तायशेटे या मराठी तरुणानं दिग्दर्शित केला आहे. नुकत्याच झालेल्या झारखंड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण तीन पुरस्कारांनी त्याला गौरवण्यात आलं. जाणून घेऊ या सिनेमाविषयी....
शब्दुली कुलकर्णी
गिरणी कामगारांची व्यथा मांडणारे आणि तेव्हाच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारे अनेक चित्रपट आजवर आले आहेत. संपामध्ये होरपळलेल्या गिरणी कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची कथा प्रेक्षकांचा मनाचा आजही ठाव घेते. हीच पार्श्वभूमी असलेला 'वर्तक नगर' हा हिंदी चित्रपट अतुल तायशेटे या मराठी तरुणानं दिग्दर्शित केला असून, तो वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये गाजतो आहे. नुकत्याच झालेल्या झारखंड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
या सिनेमाची कथा १९८० साली झालेल्या गिरण्यांच्या संपाच्या काळातली आहे. गिरणगावात राहणाऱ्या चार मित्रांच्या आयुष्य या सिनेमात पाहायला मिळतं. कॅलिफोर्निया इथे झालेल्या सिनक्वेस्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये आणि कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. अनेक फिल्म फेस्टिव्हल्समध्ये या सिनेमानं चमक दाखवली आहे. झारखंड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवातच या सिनेमानं झाली. या सिनेमानं तिथे तीन पुरस्कार पटकावले असून, अतुलला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान मिळाला. जिमी शेरगिल आणि रघु राम या कलाकारांनी या चित्रपटात काम केलं आहे. एफटीआयआय या नामवंत संस्थेतून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अतुलची निवड लंडनमधल्या फ्रेंच फिल्म स्कूल इथे समर युनिव्हर्सिटीसाठी झाली. पुढे त्याच्या फ्रेंच शॉर्ट फिल्मची निवड अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली.
आम्ही 'वर्तक नगर' या सिनेमाच्या माध्यमातून एक वेगळा प्रयोग केला. त्या प्रयोगाचं कौतुक अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आलं. विशेष पुरस्कारानं मला गौरवण्यात आलं, त्याचा आनंद अवर्णनीय आहे.
अतुल तायशेटे