० सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करणाऱ्या 'पाताल लोक' वेब सीरिजची निर्मिती करणं हे धाडसी पाऊल आहे; त्याविषयी काय सांगशील?
माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती 'पाताल लोक'ची संहिता. ज्या पद्धतीनं संहितेचं लिखाण झालं होतं, ते मला विशेष भावलं. पटकथेची मांडणी जटील असली, तरी मुख्य विषय समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे. सोबतच 'बिटवीन द लाईन' खूप काही या संहितेला सांगायचं होतं; ते या संहितेनं नक्कीच केलं आहे. निर्माता म्हणून मी आणि कर्णेश (भाऊ) या संहितेच्या प्रेमात होतो. यासासारख्या 'आऊट ऑफ द बॉक्स' विषयांना निर्मात्यांकडून पाठबळ मिळायला हवं; जे आम्ही केलं.
० सिनेनिर्मितीनंतर वेब सीरिजची निर्मिती हा वेगळा अनुभव होता का?
होय, सिनेनिर्मिती आणि वेब सीरिजची निर्मिती या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. वेब सीरिजमध्ये प्रेक्षकांना पात्रांना अधिक सखोल जाणून घेण्याची संधी मिळते. कारण, सिनेमापेक्षा अधिक बारकाईनं गोष्टी, कथा सादर करावी लागते. बऱ्याच तपशीलात गोष्ट सांगावी लागते. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वेळेची मर्यादा फारशी नसल्यामुळे, कथेचा आणि त्याच्या विविध स्तरांचा विचार इकडे अधिक होतो. त्यामुळे निर्मिती स्तरावरदेखील काम वाढतं. परंतु, याचा अर्थ असा नव्हे की, सिनेनिर्मिती करणं सोपं आहे. सिनेनिर्मितीची स्वतःची अशी आव्हानं आहेत आणि वेब सीरिजच्या निर्मितीची स्वतःची अशी वेगळी आव्हानं आहेत.
० चित्रपट सिनेमागृहांऐवजी थेट ओटीटीवर प्रदर्शित होण्याकडे निर्माती म्हणून तू कसं बघतेस? यामुळे सिनेमागृहांच्या व्यवसायावर आणि सिनेमा पाहण्याच्या दृष्टिकोनावर परिणाम होईल का?
जगभरातील विविध भागांमधील विविध आशय (वेब सीरिज, टीव्ही मालिका, सिनेमे, लघुपट, माहितीपट) ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे, एक फिल्ममेकर म्हणून माझ्यासाठी ओटीटी हे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे, ज्याच्यामुळे आपली कलाकृती जगभर पोहोचू शकते. पण, दुसरीकडे सिनेमागृह आणि मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहणं हे वेगळा अनुभव देणारं व्यासपीठ आहे. ओटीटी किंवा सिनेमागृह या दोघांचंही महत्त्व टाळता येणार नाही. गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार कलाकृती कुठे आणायची ते ठरवायचं आहे. कुटुंबासोबत एकत्र सिनेमा पाहायला जाण्याची आपली परंपरा कधीच संपणार नाही. कारण, माणूस नेहमी प्रत्येक गोष्ट साजरी करून अनुभवत असतो. सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहणं कुटुंबासाठी एखाद्या सणासारखंच असतं. ओटीटीचे खास फायदे आहेत, तर सिनेमागृहाचंही स्वतःचं असं भावविश्व आहे.
० लॉकडाउननंतर इंडस्ट्रीमध्ये कोणते बदल दिसताहेत?
सध्या परिस्थिती अस्थिर आणि अनिश्चिततेनं ग्रासलेली आहे. लोक या कठीण काळातून मार्ग शोधत आहेत. पुढे काय होते ते पाहण्यासाठी आपल्याला धीरानं वाट पहावी लागेल. पण, या संकटातून मनोरंजनसृष्टी नक्कीच पुन्हा उभारी घेईल. पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात होईल आणि सिनेमागृहं नक्कीच हाऊसफुल्ल होतील.
० तुझ्या आगामी 'बुलबुल' आणि 'माई' या वेब सीरिजविषयी काय सांगशील?
'बुलबुल' या महिन्यातच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'माई'बद्दल सध्या बोलणं खूप घाईचं ठरेल. कारण, सध्या त्यावर बरंच काम बाकी आहे. मी आणखी काही विषयांवरदेखील काम करते आहे. त्याच्या लिखाणाच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल. अभिनेत्री म्हणून आणि एक निर्माती म्हणूनही मला खूप काम करायचं आहे.
० वर्षभरापासून अभिनेत्री अनुष्का शर्मा चित्रपटात दिसली नाही. मोठ्या पडद्यावर पुन्हा कधी दिसणार?
लवकरच... मी काही अभिनय सोडलेला नाही. योग्य वेळी आणि योग्य चित्रपटातून मी नक्कीच प्रेक्षकांसमोर येणार. जोपर्यंत मी स्वतःच्या पायावर चालते आहे आणि बोलू शकतेय; तोपर्यंत मी अभिनय करतच राहीन. केळव चर्चेत राहण्यासाठी आणि अभिनेत्रींच्या स्पर्धेत राहण्यासाठी मला कोणत्याही सिनेमात काम करायचं नाही. थोडा ब्रेक घेऊन अनेक गोष्टींची मला चाचपणी करायची आहे; तेच मी सध्या करतेय. स्वतःला वेळ देऊन मला काहीतरी वेगळं करायचं आहे. 'झिरो' सिनेमापर्यंत गेली तीन वर्षं मी सातत्यानं चित्रीकरण करत होते. त्यामुळे सध्या स्वतःसाठी क्रिएटिव्ह ब्रेक घेतला आहे. जोपर्यंत स्वतःच्या पायावर चालते आहे आणि बोलू शकतेय; तोपर्यंत मी अभिनय करतच राहीन.
वाचा: धीरानं घेऊ, माणुसकी जपू! म्हणतायत प्रिया आणि उमेश
वाचा: एकमेकांना सावरत पुढे जाऊ: अश्विनी भावे