अ‍ॅपशहर

प्रत्येक दिवस आमचाच

बॉलिवूडच्या तरुण स्टार्सपैकी एक असलेल्या आलिया भट्टने ‌‘जागतिक महिला दिना’निमित्तानं मुंटाच्या वाचकांशी खास संवाद साधला. ‘स्वप्नांशी तडजोड कधीच करू नका. केवळ एक दिवस नाही, तर वर्षातला प्रत्येक दिवस आपला आहे’, असं ती स्पष्टपणे सांगते.

Maharashtra Times 8 Mar 2017, 9:44 am
बॉलिवूडच्या तरुण स्टार्सपैकी एक असलेल्या आलिया भट्टने ‌‘जागतिक महिला दिना’निमित्तानं मुंटाच्या वाचकांशी खास संवाद साधला. ‘स्वप्नांशी तडजोड कधीच करू नका. केवळ एक दिवस नाही, तर वर्षातला प्रत्येक दिवस आपला आहे’, असं ती स्पष्टपणे सांगते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम everyday is our
प्रत्येक दिवस आमचाच


‘वुमन्स डे’ आला की महिलांचं गुणगान गायला सुरुवात होते. मग आम्ही सेलिब्रिटी लोक त्यावर प्रतिक्रिया देतो आणि मग प्रत्येक मुलगी म्हणू लागते की तिला तिच्या महिला असण्याबाबत कसा अभिमान आहे वगैरे. मला या सगळ्या भावनांचा आदर आहे. पण माझा प्रश्न असा आहे की आपण हे सगळं आपण केवळ एक दिवस का करतो? महिलांवर असलेल्या जबाबदाऱ्या…त्यांना हवं असलेलं स्वातंत्र्य.. त्यांना हवी असणारी सुरक्षितता ही सगळ्याच दिवशी असायला हवी ना? केवळ एक दिवस महिलांचं गुणगान गायलं आणि बाकीचे दिवस त्यांना ताण येईल इतकं काम दिलं असं होऊ नये. त्यामुळे प्रत्येक दिवस आम्हा महिलांचा हवा असं मला वाटतं.

महिलांनी कधीही त्यांच्या स्वप्नांशी तडजोड करु नये. किंवा इतर कारणांमुळे त्यांच्यावर तशी वेळ येऊ नये ही प्रत्येक पुरुषाची जबाबदारी आहे. आम्हाला स्वप्नं असतात आणि आम्ही ती पूर्ण करायचा नेटाने प्रयत्न करत असतोच. मला लहानपणापासून अभिनेत्री व्हायचं होतं. मला माझ्या पद्धतीने विचार करण्याचं स्वातंत्र्य दिल्यानेच मी इथवर आले. अन्यथा मी इतर कुणीही होऊ शकले असते.

बऱ्याचदा, अगदी महानगरांपासून ग्रामीण भागापर्यंत सगळीकडे अमुक कामं मुलींनी किवा महिलांनीच करावीत असा एक नियम असतो. असं का? सगळ्यांनी सगळी कामं करावीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करते. तर स्त्रीच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांनी कामं करायला काय हरकत नाही. त्यात कसलाही कमीपणा नसावा. आयुष्यात येणाऱ्या चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा करायला हवा. ही वाटचाल पुढे होत राहायला हवी. मुलींच्या शिक्षणाकडेही फार लक्ष दिलं जात नाही. अशा सर्वच कुटुंबियांना मी विनंती करते की मुलींना शिकू द्या. ‌शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्वात फरक पडतो. दरवेळी शिक्षण नोकरीसाठीच उपयोगी यायला हवं असं काही नाही. एक शिकलेली स्त्री घरबसल्या चांगल्या जबाबदाऱ्या उचलू शकते. स्त्री असल्याचा अभिमान प्रत्येकीला आहेच. तो असायलाच हवा. पण तो एका दिवसापुरता नको. तो सतत असायला हवा. कारण स्त्रीत्व ही एका दिवसापुरती येणारी गोष्ट नाहीय. याची जाणीव आधी स्वतःला असायला हवी. ज्या पुरुष वर्गाला ही जाणीव आहे, त्यांचं कौतुक आपण करायला हवंच. आणि ज्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव अद्याप झालेली नाही, त्यांना ती करुन देणंही महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.

महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा.

तुमची,

आलिया

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज