अ‍ॅपशहर

रीलमध्ये डोळा मारल्याने ट्रोल करणाऱ्यांवर भडकल्या ऐश्वर्या नारकर; म्हणाल्या- 'ही विकृती थांबायला हवी'

Aishwarya Narkar: 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' ही लोकप्रिय ऐतिहासिक हिंदी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेमध्ये राधाबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्याशी या निमित्तानं झालेल्या गप्पा.

Authored byहर्षल मळेकर | महाराष्ट्र टाइम्स 8 Aug 2022, 1:10 pm
मुंबई: 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' ही ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. बराच मोठा तामझाम असलेल्या या भव्यदिव्य मालिकेत भूमिका साकारण्याचा एकूणच अनुभव खूप छान असल्याचं अभिनेत्री ऐश्वर्या नारकर म्हणतात. यापूर्वी अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या ऐश्वर्या यांनी दैनंदिन मालिका, सोशल मीडियावरील वावर, ट्रोलिंग अशा विषयांवर त्यांची मतं मांडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Aishwarya Narkar


प्रेक्षक स्वीकारतील का?

मुळात दैनंदिन मालिकेकडून आपण फार अपेक्षा ठेवू शकत नाही. कंटेट चांगला असेल, तर करायलाही छान वाटतं. पण ते एक चक्र आहे. वेगळा विषय घेऊन, सर्जनशील विचार करून केलेल्या मालिका प्रेक्षक स्वीकारतातच असं नाही. प्रेक्षकांना त्याच त्या सासू-सुना, स्वयंपाकघरातील कट-कारस्थानं अशा लाऊड पद्धतीचं नाट्य लागतं. रोजची कामं करता-करता एपिसोड्स पाहिले जातात. मालिकांचं सिनेमासारखं नाही. सिनेमा पूर्ण एकाग्रतेनं पाहिला जातो. त्यामुळे त्यातला आशय तसा वेगळा असेल तर लोकांपर्यंत पोहोचतो. पण टीव्हीच्या बाबतीत तसं होत नाही. त्यात काहीसा अतिरंजितपणा असेल तरच मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेऊ शकतात. त्याला काही पर्यायही नाही. जिथे रोजच्या रोज आपल्या आयुष्यात काही वेगळं घडत नाही, तिथे मालिकांमध्ये ते घडण्याची अपेक्षा करता येत नाही. प्रॅक्टिकली ते शक्य होत नाही. त्यामुळे यात सुधारायला वगैरे हवं असं काही वाटत नाही.

View this post on Instagram A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

ठरवून काही नाही

'सोयरे सकळ' या नाटकाच्या नंतर मी इन्स्टाग्रामवर खातं उघडलं होतं. सुरुवातीला मी हातात असतील तसे फोटो अपलोड करत होते. आता काय झालंय, की 'कोलॅब'मध्ये मी बऱ्याच गोष्टी करते, विशेषत: साड्यांसाठी. मुळात साडी मला अतिशय आवडते. ती मला छान कॅरीही करता येते. कोलॅबमुळे साड्यांचे फोटोशूट होतात. श्रद्धा, आशय, श्रुती, दीपाली यांच्याबरोबर मी ही फोटोशूट केली आहेत. एका वेळी फोटोशूट केलं की किमान ५०० तरी फोटो असतात. मग त्यापैकी निवडक मी अपलोड करते. सोशल मीडियावर ठरवून सक्रिय राहणं असं काही त्यात नाहीय. तुम्ही नीट पाहिलं तर माझ्या पोस्ट कुठल्याही प्रोजेक्टसंदर्भातल्या नसतात किंवा काही खासगीही नसतात.

हे वाचा-ना डायलॉग्ज ना काय घडलं ते आठवतंय; ब्रेकअप झाल्याने अशी होती प्राजक्ताची अवस्था

विकृती थांबायला हवी
View this post on Instagram A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

मध्यंतरी मी काही रील्स नऊवारीत केल्या होते. एक-दोन रील करताना त्यात मी डोळा मारल्याचं दाखवलं होतं. तेव्हा अनेकांचं म्हणणं होतं, हे तुमच्या वयाला शोभतं का? अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत असतात. तुम्हाला जर एखादी गोष्ट खटकत असेल तर अनफॉलो करा, इतकं सोपं आहे. ते पाहण्याची सक्ती तर नाहीय ना. पण ही विकृती आहे. तसे ग्रुप्स आहेत. ही विकृती कुठेतरी थांबायला हवी. सोशल मीडियाचा अशा पद्धतीनं कुणीही वापर करू नये. आपल्याला लोकांची तोंडं धरता येत नाही. फार झालं तर मी अशा लोकांना सरळ ब्लॉक करून टाकते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज