अभिषेक खुळे
‘सर्कस’ असं नाव घेतलं, तरी तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं? अर्थात तो तंबू, जोकर, नाना करामती दाखविणारे कलाकार अन् वेगवेगळे प्राणी, सोबतीला त्यांना नियंत्रित करणारा रिंगमास्टर. रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’चं म्हणाल, तर ती नावालाच आहे. विविध कमतरता आहेत. त्यामुळे ती नीट उभी राहू शकलेली नाही. रोहितची रिंगमास्टरी अनियंत्रित असल्यानं ही ‘सर्कस’ विस्कळीत झालेली आहे. तुमची कलाकृती एखाद्या वेळी सामान्य असली, तरी चालेल. मात्र, ती विशिष्ट गोष्ट सांगणारी हवी. इथं नेमकी तीच हरवली आहे.
रोहित शेट्टी उत्तम दिग्दर्शक आहे, यात शंकाच नाही. ‘सर्कस’ हा त्याचा पंधरावा चित्रपट. मध्यंतरीच्या त्याच्या एखाद-दोन कलाकृतींचा अपवाद सोडला, तर त्यानं भारतीय सिनेसृष्टीला सकस असंच काही दिलेलं आहे. भविष्यातही त्याच्याकडून अपेक्षा आहेत. मात्र, ‘सर्कस’मधून त्यानं बऱ्यापैकी निराशा केलेली आहे. शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ नाटकावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. ती विनोदी या प्रकारात मोडते. मात्र, सामान्य जीवनात चारचौघांत केले जाणारे विनोद आपण पडद्यावर बघत आहोत, असं वाटत राहतं. अर्थात, सुपर प्लेअर मैदानात प्रत्येक वेळी जादू दाखवू शकत नाही. एखादा झेल सुटू शकतो, अनपेक्षितपणे बाद होऊ शकतो. इथं तेच झालंय.
‘गोलमाल’ सीरिजच्या संकल्पनेला पकडून ‘सर्कस’ सुरू होतो. तेच जमनालालचं अनाथालय आहे. तेथील केअरटेकर आणि डॉक्टर (मुरली शर्मा) जगाला हे पटवून देऊ इच्छितो, की ‘रिश्ते खून से नहीं, परवरीश से बनते हैं.’ अनाथालयात दोन जुळी बाळे येतात. त्यांना दत्तक घेण्यासाठी दोन दाम्पत्ये येणार असतात. डॉक्टर एकेका बाळाची अदलाबदल करतो. यातून त्याला आपलं ‘परवरीश’वालं ‘लॉजिक’ पटवून द्यायचं असतं. दोन बाळे बेंगळुरूच्या एका श्रीमंत घरात जातात, तर दुसरी दोन बाळे उटीमध्ये एका सर्कस चालविणाऱ्या कुटुंबात जातात. त्या दोघांची नावेही सारखी, रॉय आणि जॉय. चौघेही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी भाऊ भाऊ म्हणून राहतात. उटीतलं ‘सर्कस’वालं दाम्पत्य एका अपघातात मरण पावतं. रॉय सर्कस ताब्यात घेतो. त्याला ‘इलेक्ट्रिक मॅन’चं वरदान प्राप्त आहे. म्हणून सर्कशीत तो इलेक्ट्रिसिटी अंगात घेऊन खेळ करण्याचं काम करतो. त्याचे झटके बेंगळुरूच्या रॉयला बसतात. उटीवाल्या रॉयचं मालाशी (पूजा हेगडे) लग्न झालेलं आहे, तर बेंगळुरूवाला रॉय बिंदूच्या (जॅकलिन फर्नांडिस) प्रेमात आहे. एका ‘डील’निमित्त बेंगळुरूवाला रॉय जॉयबरोबर (वरुण शर्मा) उटीमध्ये येतो. तिथं सुरू होतो गैरसमज, गोंधळाचा खेळ.
हा काळ १९४० ते १९६०च्या दशकांदरम्यानचा आहे. त्याकाळची सर्कस आपल्याला माहिती आहे. ‘मेरा नाम जोकर’सारख्या चित्रपटांत ती तंतोतंत उभी केली आहे. या ‘सर्कस’मध्ये मर्यादा होत्या, तरी वातावरणनिर्मिती करता आली असती. ती झाली नाही. परिणामी, सगळं खोटं खोटं वाटतं. नुसत्या ट्राम, त्या काळच्या सिनेमांची नावं, पोस्टर्स, त्या काळची गाणी दाखवून काळ उभा होत नसतो. तो उभा ‘करावा’ लागतो. नाटकांत पार्श्वभागाला पेंटिंगनं बिल्डिंग किंवा बाहेरचं वातावरण दाखवलं जातं. इथंही तेच दिसतं अन् ते हास्यास्पद ठरतं. दीपिका पादुकोणवर चित्रित ‘करंट लगा’ हे गाणं यात आहे. मात्र, त्याचा काही फायदा नाही.
अभिनयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर रणवीरनं पुन्हा त्याचा एकसुरीपणा सिद्ध केला आहे. अपवाद त्याच्या ‘गल्ली बॉय’, ‘पद्मावत’ ‘८३’चा. जॅकलिनकडून तशीही फारशी अपेक्षा नाही. मात्र, पूजाही फारसा प्रभाव दाखवू शकलेली नाही. संजय शर्मा, मुकेश तिवारी, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, टिकू तलसानिया, बृजेंद्र काला, ब्रजेश हिरजी, अनिल चरणजित आदींनी आपल्या अभिनयानं ही कलाकृती बऱ्यापैकी सुसह्य केलेली आहे. गाणी आणि संगीत यथा तथा आहे. विनोदाचीही आपली एक नजाकत, दर्जा असतो, हे यापूर्वीच्या कलाकृतींतून सिद्ध झालंय. नुसते अंगविक्षेप अन् बाष्कळ संवाद म्हणजे विनोद नव्हे, हे इथं जाणवत राहतं.
शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’वर जगभरात कित्येक कलाकृती तयार झाल्यात. भारतात ४० वर्षांपूर्वी गुलजार दिग्दर्शित ‘अंगूर’ आला होता. त्याचीही झलक ‘सर्कस’मध्ये आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो तोकडा पडला. दुहेरी भूमिका आपल्याला नव्या नाहीत. एका भावाला इकडे काही होत असलं, तर त्याचा परिणाम तिकडे दुसऱ्या भावावर होतो, हे आपण ‘किशन कन्हय्या’, ‘जुडवा’ वगैरेंसारख्या चित्रपटांमध्ये पाहिलेलं आहे. इथं फक्त फरक एवढाच, की दुहेरीपेक्षा चौपट भूमिकांचा मामला आहे.
एकंदरीत काय, तर नवं असं यात काहीच नाही. धक्काही लागू न देणारा हा ‘करंट’ दुर्दैवानं ‘करंटा’ प्रयोग आहे. पुढं काय घडू शकतं नि शेवट कसा असेल, याचा अंदाज सामान्य प्रेक्षकही चित्रपट सुरू झाल्यानंतर वीसेक मिनिटांत लावू शकतो. यात सगळंच निराशाजनक आहे, असंही नाही. इतर कलावंतांचा अभिनय त्यांच्या मेहनतीची साक्ष देतो. काही मोजकी दृश्यं निश्चितच विनोदी झालेली आहेत. हां, लहान मुलांना ही कलाकृती कदाचित आवडू शकते. म्हणून वाटलंच अन् वेळ असलाच, तर केवळ त्यांच्यासाठी म्हणून ‘सर्कस’ पाहायला जाऊ शकता. मर्जी तुमची!
सिनेमा : सर्कस
कथा : फरहाद सामजी, संचित बेद्रे, विधी घोडगावकर
दिग्दर्शक : रोहित शेट्टी
निर्माते : रोहित शेट्टी, भूषण कुमार, टी सीरिज
कलाकार : रणवीर सिंग, वरुण शर्मा, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, संजय मिश्रा, मुकेश तिवारी, मुरली शर्मा, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, टिकू तलसानिया, बृजेंद्र काला, अनिल चरणजित आदी.
दर्जा : दोन स्टार
‘सर्कस’ असं नाव घेतलं, तरी तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं? अर्थात तो तंबू, जोकर, नाना करामती दाखविणारे कलाकार अन् वेगवेगळे प्राणी, सोबतीला त्यांना नियंत्रित करणारा रिंगमास्टर. रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’चं म्हणाल, तर ती नावालाच आहे. विविध कमतरता आहेत. त्यामुळे ती नीट उभी राहू शकलेली नाही. रोहितची रिंगमास्टरी अनियंत्रित असल्यानं ही ‘सर्कस’ विस्कळीत झालेली आहे. तुमची कलाकृती एखाद्या वेळी सामान्य असली, तरी चालेल. मात्र, ती विशिष्ट गोष्ट सांगणारी हवी. इथं नेमकी तीच हरवली आहे.
रोहित शेट्टी उत्तम दिग्दर्शक आहे, यात शंकाच नाही. ‘सर्कस’ हा त्याचा पंधरावा चित्रपट. मध्यंतरीच्या त्याच्या एखाद-दोन कलाकृतींचा अपवाद सोडला, तर त्यानं भारतीय सिनेसृष्टीला सकस असंच काही दिलेलं आहे. भविष्यातही त्याच्याकडून अपेक्षा आहेत. मात्र, ‘सर्कस’मधून त्यानं बऱ्यापैकी निराशा केलेली आहे. शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ नाटकावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. ती विनोदी या प्रकारात मोडते. मात्र, सामान्य जीवनात चारचौघांत केले जाणारे विनोद आपण पडद्यावर बघत आहोत, असं वाटत राहतं. अर्थात, सुपर प्लेअर मैदानात प्रत्येक वेळी जादू दाखवू शकत नाही. एखादा झेल सुटू शकतो, अनपेक्षितपणे बाद होऊ शकतो. इथं तेच झालंय.
‘गोलमाल’ सीरिजच्या संकल्पनेला पकडून ‘सर्कस’ सुरू होतो. तेच जमनालालचं अनाथालय आहे. तेथील केअरटेकर आणि डॉक्टर (मुरली शर्मा) जगाला हे पटवून देऊ इच्छितो, की ‘रिश्ते खून से नहीं, परवरीश से बनते हैं.’ अनाथालयात दोन जुळी बाळे येतात. त्यांना दत्तक घेण्यासाठी दोन दाम्पत्ये येणार असतात. डॉक्टर एकेका बाळाची अदलाबदल करतो. यातून त्याला आपलं ‘परवरीश’वालं ‘लॉजिक’ पटवून द्यायचं असतं. दोन बाळे बेंगळुरूच्या एका श्रीमंत घरात जातात, तर दुसरी दोन बाळे उटीमध्ये एका सर्कस चालविणाऱ्या कुटुंबात जातात. त्या दोघांची नावेही सारखी, रॉय आणि जॉय. चौघेही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी भाऊ भाऊ म्हणून राहतात. उटीतलं ‘सर्कस’वालं दाम्पत्य एका अपघातात मरण पावतं. रॉय सर्कस ताब्यात घेतो. त्याला ‘इलेक्ट्रिक मॅन’चं वरदान प्राप्त आहे. म्हणून सर्कशीत तो इलेक्ट्रिसिटी अंगात घेऊन खेळ करण्याचं काम करतो. त्याचे झटके बेंगळुरूच्या रॉयला बसतात. उटीवाल्या रॉयचं मालाशी (पूजा हेगडे) लग्न झालेलं आहे, तर बेंगळुरूवाला रॉय बिंदूच्या (जॅकलिन फर्नांडिस) प्रेमात आहे. एका ‘डील’निमित्त बेंगळुरूवाला रॉय जॉयबरोबर (वरुण शर्मा) उटीमध्ये येतो. तिथं सुरू होतो गैरसमज, गोंधळाचा खेळ.
हा काळ १९४० ते १९६०च्या दशकांदरम्यानचा आहे. त्याकाळची सर्कस आपल्याला माहिती आहे. ‘मेरा नाम जोकर’सारख्या चित्रपटांत ती तंतोतंत उभी केली आहे. या ‘सर्कस’मध्ये मर्यादा होत्या, तरी वातावरणनिर्मिती करता आली असती. ती झाली नाही. परिणामी, सगळं खोटं खोटं वाटतं. नुसत्या ट्राम, त्या काळच्या सिनेमांची नावं, पोस्टर्स, त्या काळची गाणी दाखवून काळ उभा होत नसतो. तो उभा ‘करावा’ लागतो. नाटकांत पार्श्वभागाला पेंटिंगनं बिल्डिंग किंवा बाहेरचं वातावरण दाखवलं जातं. इथंही तेच दिसतं अन् ते हास्यास्पद ठरतं. दीपिका पादुकोणवर चित्रित ‘करंट लगा’ हे गाणं यात आहे. मात्र, त्याचा काही फायदा नाही.
अभिनयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर रणवीरनं पुन्हा त्याचा एकसुरीपणा सिद्ध केला आहे. अपवाद त्याच्या ‘गल्ली बॉय’, ‘पद्मावत’ ‘८३’चा. जॅकलिनकडून तशीही फारशी अपेक्षा नाही. मात्र, पूजाही फारसा प्रभाव दाखवू शकलेली नाही. संजय शर्मा, मुकेश तिवारी, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, टिकू तलसानिया, बृजेंद्र काला, ब्रजेश हिरजी, अनिल चरणजित आदींनी आपल्या अभिनयानं ही कलाकृती बऱ्यापैकी सुसह्य केलेली आहे. गाणी आणि संगीत यथा तथा आहे. विनोदाचीही आपली एक नजाकत, दर्जा असतो, हे यापूर्वीच्या कलाकृतींतून सिद्ध झालंय. नुसते अंगविक्षेप अन् बाष्कळ संवाद म्हणजे विनोद नव्हे, हे इथं जाणवत राहतं.
शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’वर जगभरात कित्येक कलाकृती तयार झाल्यात. भारतात ४० वर्षांपूर्वी गुलजार दिग्दर्शित ‘अंगूर’ आला होता. त्याचीही झलक ‘सर्कस’मध्ये आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो तोकडा पडला. दुहेरी भूमिका आपल्याला नव्या नाहीत. एका भावाला इकडे काही होत असलं, तर त्याचा परिणाम तिकडे दुसऱ्या भावावर होतो, हे आपण ‘किशन कन्हय्या’, ‘जुडवा’ वगैरेंसारख्या चित्रपटांमध्ये पाहिलेलं आहे. इथं फक्त फरक एवढाच, की दुहेरीपेक्षा चौपट भूमिकांचा मामला आहे.
एकंदरीत काय, तर नवं असं यात काहीच नाही. धक्काही लागू न देणारा हा ‘करंट’ दुर्दैवानं ‘करंटा’ प्रयोग आहे. पुढं काय घडू शकतं नि शेवट कसा असेल, याचा अंदाज सामान्य प्रेक्षकही चित्रपट सुरू झाल्यानंतर वीसेक मिनिटांत लावू शकतो. यात सगळंच निराशाजनक आहे, असंही नाही. इतर कलावंतांचा अभिनय त्यांच्या मेहनतीची साक्ष देतो. काही मोजकी दृश्यं निश्चितच विनोदी झालेली आहेत. हां, लहान मुलांना ही कलाकृती कदाचित आवडू शकते. म्हणून वाटलंच अन् वेळ असलाच, तर केवळ त्यांच्यासाठी म्हणून ‘सर्कस’ पाहायला जाऊ शकता. मर्जी तुमची!
सिनेमा : सर्कस
कथा : फरहाद सामजी, संचित बेद्रे, विधी घोडगावकर
दिग्दर्शक : रोहित शेट्टी
निर्माते : रोहित शेट्टी, भूषण कुमार, टी सीरिज
कलाकार : रणवीर सिंग, वरुण शर्मा, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, संजय मिश्रा, मुकेश तिवारी, मुरली शर्मा, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, टिकू तलसानिया, बृजेंद्र काला, अनिल चरणजित आदी.
दर्जा : दोन स्टार