जब हॅरी मेट सेजल: स्व’च्या शोधातील ‘युरोप टूर
शाहरुख खान, अनुष्का शर्मा, सयानी गुप्ता
जयदीप पाठकजी
Jaydeep.Pathakji@timesgroup.com
दिग्दर्शक इम्तियाज अलीचा प्रत्येक सिनेमा वेगळा असतो. समकालीन तरुणांची गोष्ट सांगायची त्याची एक स्वतःची अशी शैली आहे. सध्याच्या काळात जगणाऱ्या तरुणाईचं आयुष्य, हवं तसं आयुष्य जगण्यात येत असलेल्या अडचणी, चाकोरीबाहेर जाऊन काही तरी वेगळं करण्याची धडपड, स्वतःचा शोध घेण्यासाठी सुरू असलेला प्रवास असं सारं काही तो आपल्या चित्रपटातून दाखवतो. ‘जब हॅरी मेट सेजल’मध्येही असा दोन व्यक्तिरेखांचा ‘स्व’चा प्रवास उलगडतो. मात्र, इथे प्रमुख व्यक्तिरेखेत शाहरुख खान असल्यानं चित्रपटाचं रूपांतर कधी शाहरुखपटात झालं, हे कदाचित इम्तियाज अलीलाच समजलं नसावं, अशी परिस्थिती आहे. काळ बदलला, संदर्भ बदलले तरीही ‘आयुष्य बदलणारी युरोप टूर’ काही आपला पिच्छा सोडत नाही. कथेत फारसा दम नसलेला आणि मांडणीतही वैशिष्ट्य नसलेला ‘जब हॅरी मेट सेजल’ सहज जाता जाता पाहण्याजोगा सिनेमा आहे. म्हणजे तो समजा पाहायचा राहिला तर काही फरक पडणार नाही, इतका तो वरवरचा झाला आहे
हरिंदरसिंग अर्थात हॅरी (शाहरुख खान) युरोपात टूरिस्ट गाइडचे काम करीत आहे. एका कुटुंबासह युरोप टूरवर आलेल्या सेजलचे (अनुष्का शर्मा) लग्न ठरलेले असून, टूर संपताना अगदी विमानतळावर असतानाच तिला आपली ‘एंगेजमेंट रिंग’ हरविल्याचे समजते. त्या कारणावरून तिचे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे भांडण होते. कुटुंबातील व्यक्तींना पुढे पाठवून ही अंगठी शोधण्यासाठी सेजल तिथेच थांबते. अंगठी शोधण्यासाठी सेजल हॅरीला गळ घालते. दीर्घ अशा ‘युरोप टूर’मध्ये सेजल आणि तिचा होणारा नवरा कुठे कुठे गेले, कोणत्या ठिकाणांना भेटी दिल्या आदी गोष्टींच्या आधारे ही अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मूळचा पंजाबचा असलेला, उराशी अनामिक दुःख बाळगून स्वतःच्या कमतरतांवर मात करीत जगत असलेला हॅरी आणि दुसरीकडे एक व्यक्ती म्हणून आपण कसे आहोत, याचा शोध घेणारी सेजल यांचा एक अनोखा प्रवास सुरू होतो. कथेमध्ये हॅरी आणि सेजल अशी दोनच पात्रे सातत्याने येत राहतात. एक अंगठी शोधण्याच्या प्रवासात स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा शोधही इथे घेतला जातो. सातत्याने विविध मुलींशी फ्लर्ट करण्याचा इतिहास असलेल्या, मात्र कोणाशीही मनापासून सूत न जुळलेल्या हॅरीचे पात्र इथे लेखक-दिग्दर्शक ‘हायलाइट’ करतो. मध्यंतरापर्यंत जरा बरं चाललंय, असा आपला समज होतो. मध्यंतरानंतर मात्र ‘जब हॅरी मेट सेजल’ खूपच संथ होतो आणि पुढं काय होणार, याचादेखील अंदाज येतो. असा एकदम आयुष्यच बदलून टाकणारा प्रवास नक्की कोणत्या हॅरी-सेजलच्या वाट्याला आला असेल, असा भाबडा विचार मनात येऊन जातो. इम्तियाज अलीच्या एकूण शैलीशी हे सारं काही ‘मॅच’ करतंच. मात्र, पुढच्या टप्प्यावर जाताना या प्रवासात मुख्य व्यक्तिरेखांमध्ये प्रेमाचा अनोखा बंध निर्माण होतो आणि या व्यक्तिरेखांना एकत्र आणण्यानेच सारं काही ‘हॅप्पी हॅप्पी’ होणार असल्याचा समज लेखक-दिग्दर्शकाने करून घेतल्याने इतर चित्रपटांप्रमाणे इथेही ‘सेफ गेम’ खेळला जातो. आणि इथेच इम्तियाज अलीचा सिनेमा ‘शाहरुखशरण’ होतो. म्हणजे तो तसा होण्यापलीकडे दुसरा सशक्त पर्याय नव्हताही. मात्र, या हॅरी-सेजलच्या या अनोख्या प्रवासात थोडं काही ‘आउट ऑफ द बॉक्स’ दाखवायची संधी इम्तियाज अलीकडे होती. तशा काही जागाही पटकथेत आहेत. मात्र, ते खुलवलं जात नाही. अंगठीचा शोध हे एक निमित्त होतं. या संपूर्ण प्रवासात हॅरी आणि सेजल या दोघांच्या गुणदोषांचं दर्शन घडतं. हॅरीच्या भूतकाळातील काही घटना ओझरत्या दाखवल्या जातात. मात्र, त्याचा भूतकाळ उलगडून सांगितला जात नाही. चित्रपट सर्वसमावेशक होण्यासाठी नायक पंजाबचा, तर नायिका गुजराती दाखवली जाते. मुख्य व्यक्तिरेखाच टूरिस्ट गाइड असल्याने समग्र युरोपचं दर्शन घडवलं जातं. ‘रोमँटिक हिरो’ साकारणं शाहरुखसाठी नवीन नाही. मात्र, आता त्याचा अभिनय परिपक्व वाटतो. त्याच्या संवादांचा लगाम देऊन अनेक प्रसंगात ‘सायलेन्स’मधूनही उत्तम परिणाम साधला जातो. काही प्रसंग छान जमून आले आहेत. मात्र, काही प्रसंगात शाहरुख-अनुष्काची केमिस्ट्री ओढून-ताणून जुळवली आहे. बेधडक सेजल अनुष्कानं मस्तपणे साकारली आहे. अर्थात तरीही ‘जब वी मेट’च्या करिनाची सर तिला नाहीच. सुनिधी चौहानचं ‘राधा’ आणि अरजितसिंगचं ‘बीच बीच में’ सिनेमाच्या आशयाचा ‘साउंड’ पुढे नेणारं. के. यू. मोहननची सिनेमॅटोग्राफीही अप्रतिम! तांत्रिकदृष्ट्या सरस असलेला आणि अभिनयाच्या पातळीवरही जमलेला ‘जब हॅरी मेट सेजल’ वेगळा नाहीच. गेल्या काही वर्षांत याच कथानकाचे आणि मुख्य व्यक्तिरेखांचं आयुष्य बदलणारा प्रवास दाखवणारे अनेक सिनेमे आपण पाहिले आहेत. इम्तियाज अली शाहरुखला घेऊन काही वेगळे दाखवील, अशी अपेक्षा होती. मात्र, इथे ती पूर्ण होत नाही. सिनेमाचा एकूण बाज कोणत्याही ‘शाहरुखपटा’प्रमाणेच आहे. स्वतःचा शोध, उरात साठलेल्या दुःखाला कवटाळून बसण्याची भूमिका वैगरे गोष्टी फक्त तोंडी लावण्यापुरत्याच. शाहरुखच्या चाहत्यांसाठी ‘मस्ट’ असलेल्या या प्रवासाला जायचं का नाही याचा निर्णय सर्वस्वी तुम्हाला घ्यायचा आहे.
Jaydeep.Pathakji@timesgroup.com
दिग्दर्शक इम्तियाज अलीचा प्रत्येक सिनेमा वेगळा असतो. समकालीन तरुणांची गोष्ट सांगायची त्याची एक स्वतःची अशी शैली आहे. सध्याच्या काळात जगणाऱ्या तरुणाईचं आयुष्य, हवं तसं आयुष्य जगण्यात येत असलेल्या अडचणी, चाकोरीबाहेर जाऊन काही तरी वेगळं करण्याची धडपड, स्वतःचा शोध घेण्यासाठी सुरू असलेला प्रवास असं सारं काही तो आपल्या चित्रपटातून दाखवतो. ‘जब हॅरी मेट सेजल’मध्येही असा दोन व्यक्तिरेखांचा ‘स्व’चा प्रवास उलगडतो. मात्र, इथे प्रमुख व्यक्तिरेखेत शाहरुख खान असल्यानं चित्रपटाचं रूपांतर कधी शाहरुखपटात झालं, हे कदाचित इम्तियाज अलीलाच समजलं नसावं, अशी परिस्थिती आहे. काळ बदलला, संदर्भ बदलले तरीही ‘आयुष्य बदलणारी युरोप टूर’ काही आपला पिच्छा सोडत नाही. कथेत फारसा दम नसलेला आणि मांडणीतही वैशिष्ट्य नसलेला ‘जब हॅरी मेट सेजल’ सहज जाता जाता पाहण्याजोगा सिनेमा आहे. म्हणजे तो समजा पाहायचा राहिला तर काही फरक पडणार नाही, इतका तो वरवरचा झाला आहे
हरिंदरसिंग अर्थात हॅरी (शाहरुख खान) युरोपात टूरिस्ट गाइडचे काम करीत आहे. एका कुटुंबासह युरोप टूरवर आलेल्या सेजलचे (अनुष्का शर्मा) लग्न ठरलेले असून, टूर संपताना अगदी विमानतळावर असतानाच तिला आपली ‘एंगेजमेंट रिंग’ हरविल्याचे समजते. त्या कारणावरून तिचे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे भांडण होते. कुटुंबातील व्यक्तींना पुढे पाठवून ही अंगठी शोधण्यासाठी सेजल तिथेच थांबते. अंगठी शोधण्यासाठी सेजल हॅरीला गळ घालते. दीर्घ अशा ‘युरोप टूर’मध्ये सेजल आणि तिचा होणारा नवरा कुठे कुठे गेले, कोणत्या ठिकाणांना भेटी दिल्या आदी गोष्टींच्या आधारे ही अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मूळचा पंजाबचा असलेला, उराशी अनामिक दुःख बाळगून स्वतःच्या कमतरतांवर मात करीत जगत असलेला हॅरी आणि दुसरीकडे एक व्यक्ती म्हणून आपण कसे आहोत, याचा शोध घेणारी सेजल यांचा एक अनोखा प्रवास सुरू होतो. कथेमध्ये हॅरी आणि सेजल अशी दोनच पात्रे सातत्याने येत राहतात. एक अंगठी शोधण्याच्या प्रवासात स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा शोधही इथे घेतला जातो. सातत्याने विविध मुलींशी फ्लर्ट करण्याचा इतिहास असलेल्या, मात्र कोणाशीही मनापासून सूत न जुळलेल्या हॅरीचे पात्र इथे लेखक-दिग्दर्शक ‘हायलाइट’ करतो. मध्यंतरापर्यंत जरा बरं चाललंय, असा आपला समज होतो. मध्यंतरानंतर मात्र ‘जब हॅरी मेट सेजल’ खूपच संथ होतो आणि पुढं काय होणार, याचादेखील अंदाज येतो. असा एकदम आयुष्यच बदलून टाकणारा प्रवास नक्की कोणत्या हॅरी-सेजलच्या वाट्याला आला असेल, असा भाबडा विचार मनात येऊन जातो. इम्तियाज अलीच्या एकूण शैलीशी हे सारं काही ‘मॅच’ करतंच. मात्र, पुढच्या टप्प्यावर जाताना या प्रवासात मुख्य व्यक्तिरेखांमध्ये प्रेमाचा अनोखा बंध निर्माण होतो आणि या व्यक्तिरेखांना एकत्र आणण्यानेच सारं काही ‘हॅप्पी हॅप्पी’ होणार असल्याचा समज लेखक-दिग्दर्शकाने करून घेतल्याने इतर चित्रपटांप्रमाणे इथेही ‘सेफ गेम’ खेळला जातो. आणि इथेच इम्तियाज अलीचा सिनेमा ‘शाहरुखशरण’ होतो. म्हणजे तो तसा होण्यापलीकडे दुसरा सशक्त पर्याय नव्हताही. मात्र, या हॅरी-सेजलच्या या अनोख्या प्रवासात थोडं काही ‘आउट ऑफ द बॉक्स’ दाखवायची संधी इम्तियाज अलीकडे होती. तशा काही जागाही पटकथेत आहेत. मात्र, ते खुलवलं जात नाही. अंगठीचा शोध हे एक निमित्त होतं. या संपूर्ण प्रवासात हॅरी आणि सेजल या दोघांच्या गुणदोषांचं दर्शन घडतं. हॅरीच्या भूतकाळातील काही घटना ओझरत्या दाखवल्या जातात. मात्र, त्याचा भूतकाळ उलगडून सांगितला जात नाही. चित्रपट सर्वसमावेशक होण्यासाठी नायक पंजाबचा, तर नायिका गुजराती दाखवली जाते. मुख्य व्यक्तिरेखाच टूरिस्ट गाइड असल्याने समग्र युरोपचं दर्शन घडवलं जातं. ‘रोमँटिक हिरो’ साकारणं शाहरुखसाठी नवीन नाही. मात्र, आता त्याचा अभिनय परिपक्व वाटतो. त्याच्या संवादांचा लगाम देऊन अनेक प्रसंगात ‘सायलेन्स’मधूनही उत्तम परिणाम साधला जातो. काही प्रसंग छान जमून आले आहेत. मात्र, काही प्रसंगात शाहरुख-अनुष्काची केमिस्ट्री ओढून-ताणून जुळवली आहे. बेधडक सेजल अनुष्कानं मस्तपणे साकारली आहे. अर्थात तरीही ‘जब वी मेट’च्या करिनाची सर तिला नाहीच. सुनिधी चौहानचं ‘राधा’ आणि अरजितसिंगचं ‘बीच बीच में’ सिनेमाच्या आशयाचा ‘साउंड’ पुढे नेणारं. के. यू. मोहननची सिनेमॅटोग्राफीही अप्रतिम! तांत्रिकदृष्ट्या सरस असलेला आणि अभिनयाच्या पातळीवरही जमलेला ‘जब हॅरी मेट सेजल’ वेगळा नाहीच. गेल्या काही वर्षांत याच कथानकाचे आणि मुख्य व्यक्तिरेखांचं आयुष्य बदलणारा प्रवास दाखवणारे अनेक सिनेमे आपण पाहिले आहेत. इम्तियाज अली शाहरुखला घेऊन काही वेगळे दाखवील, अशी अपेक्षा होती. मात्र, इथे ती पूर्ण होत नाही. सिनेमाचा एकूण बाज कोणत्याही ‘शाहरुखपटा’प्रमाणेच आहे. स्वतःचा शोध, उरात साठलेल्या दुःखाला कवटाळून बसण्याची भूमिका वैगरे गोष्टी फक्त तोंडी लावण्यापुरत्याच. शाहरुखच्या चाहत्यांसाठी ‘मस्ट’ असलेल्या या प्रवासाला जायचं का नाही याचा निर्णय सर्वस्वी तुम्हाला घ्यायचा आहे.