जयंती
ऋतुराज वानखेडे,तितिक्षा तावडे,मिलिंद शिंदे
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातही ‘जाति कभी नहीं जाती’ हे वाक्य खेड्यापाड्यात, गावात, शहरात या ना त्या कारणानं प्रचलित असल्याचं आपल्याला दिसतं. धर्मांध आणि जातीयवादाची पट्टी डोळ्यांवर बांधलेल्या समाजाला त्यांच्याच आजूबाजूचा समाज हा विविध रंगांचा दिसतो. हेच विविध रंग त्यांना खुपतात आणि सुरू होतो समाजाच्या धृवीकरणाचा खेळ. या खेळाला राजकीय पाठबळ मिळतं आणि समाजाचे रंगनिहाय तुकडे पडतात. हेच धगधगतं सत्य दाखवण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक शैलेश नरवाडेनं त्याच्या ‘जयंती’ या चित्रपटात केला आहे.
आपल्या भारतीय संविधानानं पुरस्कारलेली आणि भारतीय जनमानसानं शिरोधार्य मानलेली भारतीय धर्मनिरपेक्ष व्यवस्था समाज घटकांकडून सोयीस्करपणे दुर्लक्षित केली जाते. महापुरुषांची नावं वैयक्तिक, राजकीय हितासाठी वापरली जातात आणि त्यांची शिकवण, त्यांनी केलेलं प्रबोधन नजरेआड केलं जातं. समाजालाही अंधारात ठेवण्याचं काम काही पुढारी आणि राजकारणी मंडळी करतात; पण संपूर्ण समाज हा भूलथापांना बळी पडणारा नसतो. काही मंडळी चुकीच्या गोष्टींचा निषेध करतात, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात आणि केवळ ‘जाती’च्या नव्हे, तर ‘मानवजाती’च्या हितार्थ पुढाकार घेतात. याच पुढाकाराची गोष्ट ‘जयंती’ या चित्रपटात संत्या (ऋतुराज वानखेडे) या नायकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येते. ही गोष्ट बोधपूर्ण आहे; पण चित्रपट म्हणून ती पडद्यावर सादर करण्यात लेखक-दिग्दर्शकाची काहीशी गल्लत झाली आहे. कथानक आणि पटकथेला विविध कंगोरे आहेत. सर्वच कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न करताना त्याला पूर्ण न्याय देण्यात दिग्दर्शक कमी पडल्याचं जाणवतं.
चित्रपटाचा केंद्रबिंदू असलेला संत्या दहावी नापास आहे. सहा वर्षं झाली त्यानं शिक्षण सोडलं आहे. आमदाराच्या गोटात तो काम करतोय. त्याला स्वतःचं असं कोणतंही ध्येय नाही. वस्तीतल्या टपरीवर बसून तो त्याच्या मित्रांबरोबर दिवसभर चकाट्या पिटत असतो. संत्याच्या वागणुकीमुळे त्याच्या घरचे आणि वस्तीतले सर्व त्रासलेले असतात. संत्या वस्तीतल्या पल्लवी (तितिक्षा तावडे) या सुशिक्षित मुलीवर एकतर्फी प्रेम करत असतो. काही कारणास्तव संत्याला तुरुंगवास होतो. सहा महिने तो तुरुंगात असतो. आता तुरुंगात त्याच्या बरोबर काय होतं? तुरूंगातून सुटका झाल्यावर त्याच्यात कोणते बदल आणि का होतात? हे चित्रपटात आहे. वस्तीतले माळी सर (मिलिंद शिंदे) असं काय करतात,
जेणेकरून संत्यामध्ये परिवर्तन होतं? याचंही उत्तर चित्रपटात आहे. कथानकाच्या उत्तरार्धात महापुरुषांना जातीच्या नावानं विभागणाऱ्या समाजवृत्तीचं दर्शनदेखील दिग्दर्शक ठळकपणे घडवतो. या चुकीच्या विचारसरणीतून नायकाला, प्रेक्षकांना आणि समाजाला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो.
मुख्य भूमिकेत असलेल्या ऋतुराज वानखेडे या नवोदित अभिनेत्यानं उत्तम काम केलं आहे. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. अभिनेता म्हणून तो ‘लंबी रेस का घोडा है’ असं म्हणायला हरकत नाही. मिलिंद शिंदे यांनी त्यांची भूमिका चोख निभावली आहे. तितिक्षा तावडेला कथानकात फारसा वावर नसूनही तिच्या वाट्याला आलेले प्रसंग तिनं उत्तम साकारले आहेत. आमदाराच्या भूमिकेतले किशोर कदम आणि त्यांचा पीए पॅडी कांबळे अधोरेखित होतात. छायांकनही उत्तम.
जयंती
निर्मिती ः मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ, दशमी स्टुडिओज्
लेखन-दिग्दर्शन ः शैलेश नरवाडे
कलाकार ः ऋतुराज वानखेडे, तितिक्षा तावडे, मिलिंद शिंदे
छायांकन ः योगेश कोळी
संकलन ः रोहन पाटील
दर्जा ः २.५ स्टार
आपल्या भारतीय संविधानानं पुरस्कारलेली आणि भारतीय जनमानसानं शिरोधार्य मानलेली भारतीय धर्मनिरपेक्ष व्यवस्था समाज घटकांकडून सोयीस्करपणे दुर्लक्षित केली जाते. महापुरुषांची नावं वैयक्तिक, राजकीय हितासाठी वापरली जातात आणि त्यांची शिकवण, त्यांनी केलेलं प्रबोधन नजरेआड केलं जातं. समाजालाही अंधारात ठेवण्याचं काम काही पुढारी आणि राजकारणी मंडळी करतात; पण संपूर्ण समाज हा भूलथापांना बळी पडणारा नसतो. काही मंडळी चुकीच्या गोष्टींचा निषेध करतात, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात आणि केवळ ‘जाती’च्या नव्हे, तर ‘मानवजाती’च्या हितार्थ पुढाकार घेतात. याच पुढाकाराची गोष्ट ‘जयंती’ या चित्रपटात संत्या (ऋतुराज वानखेडे) या नायकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येते. ही गोष्ट बोधपूर्ण आहे; पण चित्रपट म्हणून ती पडद्यावर सादर करण्यात लेखक-दिग्दर्शकाची काहीशी गल्लत झाली आहे. कथानक आणि पटकथेला विविध कंगोरे आहेत. सर्वच कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न करताना त्याला पूर्ण न्याय देण्यात दिग्दर्शक कमी पडल्याचं जाणवतं.
चित्रपटाचा केंद्रबिंदू असलेला संत्या दहावी नापास आहे. सहा वर्षं झाली त्यानं शिक्षण सोडलं आहे. आमदाराच्या गोटात तो काम करतोय. त्याला स्वतःचं असं कोणतंही ध्येय नाही. वस्तीतल्या टपरीवर बसून तो त्याच्या मित्रांबरोबर दिवसभर चकाट्या पिटत असतो. संत्याच्या वागणुकीमुळे त्याच्या घरचे आणि वस्तीतले सर्व त्रासलेले असतात. संत्या वस्तीतल्या पल्लवी (तितिक्षा तावडे) या सुशिक्षित मुलीवर एकतर्फी प्रेम करत असतो. काही कारणास्तव संत्याला तुरुंगवास होतो. सहा महिने तो तुरुंगात असतो. आता तुरुंगात त्याच्या बरोबर काय होतं? तुरूंगातून सुटका झाल्यावर त्याच्यात कोणते बदल आणि का होतात? हे चित्रपटात आहे. वस्तीतले माळी सर (मिलिंद शिंदे) असं काय करतात,
जेणेकरून संत्यामध्ये परिवर्तन होतं? याचंही उत्तर चित्रपटात आहे. कथानकाच्या उत्तरार्धात महापुरुषांना जातीच्या नावानं विभागणाऱ्या समाजवृत्तीचं दर्शनदेखील दिग्दर्शक ठळकपणे घडवतो. या चुकीच्या विचारसरणीतून नायकाला, प्रेक्षकांना आणि समाजाला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो.
मुख्य भूमिकेत असलेल्या ऋतुराज वानखेडे या नवोदित अभिनेत्यानं उत्तम काम केलं आहे. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. अभिनेता म्हणून तो ‘लंबी रेस का घोडा है’ असं म्हणायला हरकत नाही. मिलिंद शिंदे यांनी त्यांची भूमिका चोख निभावली आहे. तितिक्षा तावडेला कथानकात फारसा वावर नसूनही तिच्या वाट्याला आलेले प्रसंग तिनं उत्तम साकारले आहेत. आमदाराच्या भूमिकेतले किशोर कदम आणि त्यांचा पीए पॅडी कांबळे अधोरेखित होतात. छायांकनही उत्तम.
जयंती
निर्मिती ः मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ, दशमी स्टुडिओज्
लेखन-दिग्दर्शन ः शैलेश नरवाडे
कलाकार ः ऋतुराज वानखेडे, तितिक्षा तावडे, मिलिंद शिंदे
छायांकन ः योगेश कोळी
संकलन ः रोहन पाटील
दर्जा ः २.५ स्टार