पॅडमॅन
अक्षय कुमार,राधिका आपटे,सोनम कपूर
आपल्या पत्नीच्या मासिक पाळीतल्या स्वच्छतेसंदर्भात तो इतका अस्वस्थ होतो की आपली पत्नीच नाही तर तमाम महिलांसाठी सॅनिटरी पॅड बनवण्याचा निश्चय करतो. हा निश्चय २००१ सालचा आहे. १६ वर्षांपूर्वीचा. जेव्हा सॅनिटरी पॅडची जाहिरात टीव्हीवर लागली की चॅनेल बदललं जाई. कोणी विचारलंच तर ती जाहिरात साबण किंवा अन्य कुठल्या उत्पादनाची आहे, असं सांगितलं जाई. ग्रामीण भागात तर याला किळसवाणं, अपवित्र मानून त्यावर बोलणंही पाप समजलं नाही. या वातावरणात सॅनिटरी पॅडसारखा विषय हाती घेऊन त्याची तड लावणाऱ्या अरुणाचलम मुरुगनंथमच्या खऱ्या आयुष्यावर हा सिनेमा आधारलेला आहे.लक्ष्मीकांत चौहान (अक्षय कुमार)ला गायत्री (राधिका आपटे) शी लग्न केल्यावर कळतं की त्याची बायको मासिक पाळीदरम्यान अस्वच्छ कापड वापरते. तिला अस्पृश्याप्रमाणे ५ दिवस घराबाहेर राहावं लागतं. महिला पाळीच्या दिवसात अस्वच्छ कपडे, राख, लाकडाचा भुसा वापरतात. यामुळे अनेक प्राणघातक रोगांना आमंत्रण मिळतं, असंही त्याला डॉक्टरांकडून कळतं. तेव्हा तो स्वत: सॅनिटरी पॅड बनवण्याचे ठरवतो.यासाठी त्याला त्याच्या पत्नी, बहीण आणि आईच्या तिरस्काराला सामोरं जावं लागतं. गावकरी आणि समाज त्याला वाळीत टाकतात. पण जितका विरोध होतो तितकी त्याची सॅनिटरी पॅड बनवण्याची जिद्द पक्की होते. कुटुंब त्याला सोडते पण तो आपली जिद्द सोडत नाही. त्यात त्याला पुढे दिल्लीची एक एमबीए विद्यार्थिनी परी (सोनम कपूर) मदत करते.'चीनी कम', 'पा', 'शमिताभ', 'की अँड का' असे हटके सिनेमे देणाऱ्या दिग्दर्शक आर. बाल्कीने या सिनेमात मासिक पाळीच्या काळातलं हायजीन या मुद्द्याला पूर्ण न्याय दिला आहे. मासिक पाळीसंदर्भात समाजात जितके 'टॅबू' आहेत, ते मिटवण्यासाठी आजच्या काळातला हा महत्त्वाचा सिनेमा आहे. पण हे सांगताना अनेक ठिकाणी भावनांच्या आहारी जाऊन अनावश्यक उपदेशाचे पाजलेले डोस अंगावर येतात. सॅनिटरी पॅडसंदर्भातली जागरुकता अनेक ठिकाणी उगीच ताणल्यासारखी वाटते. सिनेमाचा मध्यांतरानंतरचा भाग अधिक चांगला आहे. सिनेमा दक्षिणेऐवजी मध्य प्रदेशात घडला आहे, त्यामुळे कथा आणखी आकर्षक होते.सिनेमातली अक्षय कुमारची भूमिका महत्त्वाची आहे. अक्षयनं तिला पूरेपूर न्याय दिला आहे. पॅडमॅनच्या भूमिकेचा प्रत्येक पैलू त्यानं उलगडून दाखवला आहे. राधिका आपटेही आपल्या भूमिकेत सहजतेने वावरली आहे. परीच्या रुपात सोनम कपूरही उत्तम. सिनेमातली महानायक अमिताभ बच्चनची एंट्री छाप पाडून जाते. सिनेमातली 'पॅडमॅन पॅडमॅन', 'हूबहू', 'आज से मेरा हो गया' गाणी श्रवणीय आहेत.नेहमीच्या मारधाड सिनेमांपेक्षा काहीसा हटके, एका चांगल्या सामाजिक विषयावर आधारलेला सिनेमा तुम्हाला पाहायचा असेल तर 'पॅडमॅन' आवर्जून पाहा.