रेडू
शशांक शेंडे,छाया कदम,विनम्र भाबल,गौरी कोंगे,मृण्मयी सुपल
एखाद्या गोष्टीसाठी जिवाचा आटापिटा करावा... आकाश-पाताळ एक करावं... त्या गोष्टीपायी अगदी जीव राहील की जाईल, अशी परिस्थिती ओढवावी... अन् ती गोष्ट किंवा वस्तू समोर दिसल्यावर मात्र अचानक असं काहीतरी घडावं, की हातात आलेली वस्तू सहज कुणाला तरी देऊन मोकळं व्हावं... ती देताना खरंतर आत कुठेतरी खोलवर तुटलेलं असतं. जीव गलबलून गेलेला असतो... पण कुठल्याही माणसाला त्याक्षणी ती वस्तू समोरच्याला द्यावीशी वाटणं, हे त्याच्या सहृदयतेचं लक्षण तर असतंच, पण त्याहून अधिक ती माणूसपणाची जिवंत खूण असते... आसक्ती आणि त्याग यांत फार अंतर नसतंच. फक्त आसक्तीचं त्यागात रूपांतर होण्यासाठी गरज असते, एकाच दिव्य क्षणाची... जो क्षण 'रेडू'मधील तातुच्या (शशांक शेंडे) आयुष्यात आला आणि बघता बघता तातू माणूस म्हणून सहज मोठा होऊन गेला!दोन आठवड्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या'सायकल'चा परिणाम मनावर ताजा असतानाच 'रेडू' प्रदर्शित व्हावा हा सुरेख योगायोग आहे. या दोन्ही सिनेमांमध्ये अनेक साम्यस्थळं आहेत... उदाहरणार्थ, हे दोन्ही सिनेमे पीरियॉडिकल आहेत. दोन्ही सिनेमांत भौगोलिक पार्श्वभूमी म्हणून कोकणचा वापर केलेला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे- 'सायकल'मध्ये सायकल हे एक पात्र आहे, तर रेडूमध्ये 'रेडिओ'... अन् तरीही या दोन्ही सिनेमांची तुलना योग्य नाही. स्वतंत्रपणेच दोन्ही सिनेमे चांगले आहेत. 'रेडू' तर शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर किंवा मधु मंगेश कर्णिक यांच्या एखाद्या भावस्पर्शी लघुकथेसारखाच आहे. आधी छोट्याश्या अवकाशात फिरवणारा आणि शेवटाकडे अचानक 'मूल्य'युक्त काहीतरी देऊन जाणारा.'रेडू'ची गोष्ट साधीच आहे. १९७०-७२ सालाच्या पार्श्वभूमीवर घडणारी. ज्यातून गाणं ऐकू येतं, माणसं बोलतात असा रेडू म्हणजे रेडिओ ही तेव्हा ग्रामीण भागात अप्रूपाचीच गोष्ट होती. अशा काळात मुंबईला राहणारा तातुचा साडू (विनम्र भाबल) अचानक बायकोला (गौरी कोंगे) घेऊन त्याच्या गावी येतो आणि जाताना आपला रेडू तातुला देऊन जातो. अचानक झालेलं रेडूचं हे आगमन बाबाच्या कष्टकरी जगण्याला चैतन्य देऊन जातं, पण...या 'पण'चं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्येच जावं लागेल.'रेडू'च्या कथेचा जीव छोटाच आहे. पण आशय मोठा आहे. तातू हेच यातलं मोठं पात्र... सोबत त्याची बायको (छाया कदम) आणि मुलगी (मृण्मयी सुपल). तसंच त्याचा साडू आणि मेव्हणीही. महत्त्वाचे. या सगळ्यांनीच आपली कामं मस्त आणि सहज केली आहेत. त्यातही तातूची भूमिका करणारे शशांक शेंडे हे सगळ्यात बेस्ट. त्यांचं रेडूप्रेम, रेडूसाठी झपाटणं आणि वेडं होणं सारंच अफलातून. त्यांना छाया कदम यांनी तेवढीच मनापासून साथ दिलीय.... सिनेमातली गाणी आणि संगीतही कथाशयाला साजेसं आहे. संवादांचा फार प्रभाव पडत नाही, पण त्यांची तशी फार आवश्यकताही वाटत नाही... आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवट... तिथे तर शब्दच नि:शब्द होऊन जातात!