Karuna.Gosavi
@timesgroup.com
Tweet : @KarunapuriMT
दांडिया-गरब्याचं सेलिब्रेशन, घटाची पूजा, व्रतवैकल्य आणि उपवास या प्रमुख गोष्टींसोबत आता नवरात्रोत्सवाकडे, महिला मिनी डाएट प्लान म्हणून पाहू लागल्या आहेत. म्हणजे उपवासाच्या निमित्तानं नव्यानं डाएट सुरू करणं, आहे तो डाएट बदलणं किंवा नवीन डाएटची ट्रायल घेणं, असा विचार केला जातो. नवरात्राच्या पहिल्याच दिवसापासून आपल्या आहारतज्ज्ञ आणि व्यायामाच्या पर्सनल ट्रेनरशी याबाबत बोलून महिलांनी डाएट प्लॅन सुरू केल्याचं चित्र आहे.
व्यायाम किंवा डाएटचा श्रीगणेशा करण्यासाठी अनेकजण निमित्ताच्या शोधात असतात. कुणी वाढदिवस, कुणी नवीन महिन्याची पहिली तारीख, कुणी नवं वर्षारंभ, तर कुणी विशेष सणवार पाहून नियोजन करतात. या मानवी स्वभावानुसार नवरात्रीचा सणही डाएट ठरवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरतो आहे. नऊ दिवस उपवासाच्या निमित्तानं डाएट प्लॅन आखण्याचाही विचार केला जातो आहे. या नऊ दिवसांतला आहार शरीरासाठी योग्य ठरल्यास, तोच प्लॅन वर्षभर पाळणं शक्य होतं.
‘आज पहिल्याच दिवशी मला डाएट प्लॅन घेण्यासाठी अनेक फोन आले. अनेकींना नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं डाएटला सुरुवात करता येईल किंवा आहे त्या डाएटमध्ये बदल करण्याचं निमित्त मिळेल असं वाटतं,’ असं आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर यांनी सांगितलं.
हेही लक्षात घ्या
उपवास म्हणजे डाएट नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. अनेकदा उपवासाच्या शेंगदाणे, बटाटा, ड्रायफ्रूट, तेल-तुपाचे आणि इतर गोड पदार्थांमुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते. उपवास आहे म्हणून अनेकजणी व्यायामाला सुट्टी देतात. शारीरिक हालचालही मुद्दाम कमी करतात. हे चुकीचं आहे. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतं. नवरात्रीमध्ये उपवासाच्या निमित्तानं वजन कमी करण्याचा उद्देश असेल, तर आपल्या शरीरप्रकृतीचा विचार करून आहार घ्यावा. योग्य पदार्थ आणि व्यायाम यांचा समतोल राखल्यास नऊ दिवसांमध्ये दोन ते तीन किलो वजन कमी होऊ शकतं. वजन कमी करण्याचं न झेपणारं ध्येय ठेवू नका. फळं, ज्यूस, उपवासाला चालणाऱ्या भाज्या यांचं सेवन करा. भरपूर पाणी प्या, असा सल्लाही आहारतज्ज्ञ देतात.