अ‍ॅपशहर

विज्ञानप्रचारासाठी झटणारे शास्त्रज्ञ

अत्यंत अभ्यासू आणि विज्ञानाच्या प्रसारासाठी सदा तत्पर अशी त्यांची विशेष ओळख असलेले डॉ. भालचंद्र उदगावकर यांचा जन्म १४ सप्टेंबर १९२७ रोजी झाला. सुरुवातीला दादरच्या महापालिका शाळेत आणि नंतर राजा शिवाजी विद्यालयात ते शिकले. पुढे भौतिकशास्त्र घेऊन ते एम. एस्सी. झाले.

महाराष्ट्र टाइम्स 14 Apr 2019, 10:25 am
अत्यंत अभ्यासू आणि विज्ञानाच्या प्रसारासाठी सदा तत्पर अशी त्यांची विशेष ओळख असलेले डॉ. भालचंद्र उदगावकर यांचा जन्म १४ सप्टेंबर १९२७ रोजी झाला. सुरुवातीला दादरच्या महापालिका शाळेत आणि नंतर राजा शिवाजी विद्यालयात ते शिकले. पुढे भौतिकशास्त्र घेऊन ते एम. एस्सी. झाले. ते मॅट्रिकला पहिले आले. एम. एस्सीलाही ते मुंबई विद्यापीठात पहिले आले. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या श्रेयनामावलीत भाभा, वि. वा. नारळीकर (जयंतरावांचे वडील), एम. जी. के. मेनन अशा दिग्गजांसह उदगावकरांचे नाव झळकते आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फण्डामेंटल रिसर्चमध्ये खुद्द डॉ. होमी भाभांनी त्यांची मुलाखत घेऊन त्यांची निवड केली. त्यानंतर सैद्धान्तिक भौतिकशास्त्रात प्रा. उदगावकरांनी एवढे मूलभूत काम केले, की ते होमी भाभांचे उजवे हात बनले. परदेशातील अनेक नोबेलविजेत्या शास्त्रज्ञांसह उदगावकरांनी काम केले. रुईया, रूपारेल, झेवियर, एल्फिन्स्टन यांसारख्या कॉलेजांतील हुशार मुलांना टीआयएफआरमध्ये आठवड्यातून एकदा बोलावून त्यांना शास्त्रज्ञांबरोबर चर्चा करण्याची संधी त्यांनी मिळवून दिली. मुंबई विद्यापीठ जरी १८५७मध्ये सुरू झाले असले तरी तेथे भौतिकशास्त्राचा विभाग नव्हता. प्रा. उदगावकरांच्याच प्रयत्नांनी हा विभाग १९७२मध्ये स्थापन झाला. सातवी ते नववीच्या मुलांसाठीही त्यांनी ‘बॉम्बे असोसिएशन फोर सायन्स एज्युकेशन’ (बेस) या संस्थेतर्फे विज्ञान प्रदर्शने घ्यायला सुरुवात केली. जगात अणुयुद्ध होऊ नये म्हणून बट्र्राड रसेल यांनी स्थापन केलेल्या पग्वाश समितीचे प्रा. उदगावकर २० वर्षे सभासद होते आणि त्याचे अध्यक्ष होते प्रा. रॉटब्लेट. ते अमेरिकाधार्जिणे असल्याने ‘तुम्ही जागतिक संस्थेचे अध्यक्ष आहात’ हे भान त्यांना आणून देण्याचे काम प्रा. उदगावकर करीत. या समितीस तिच्या कामाबद्दल १९९५ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यातील अर्धा वाटा अध्यक्षांचा आणि अर्धा वाटा समितीचा होता. समिती सदस्य म्हणून प्रा. उदगावकर हा पुरस्कार घ्यायला ओस्लोला गेले होते. लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करावा, अंधश्रद्ध राहू नये, देशात विज्ञानप्रसार व्हावा म्हणून ते आयुष्यभर झटले. ते १९८२ ते १९९१ अशी नऊ वर्षे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने १९८७मध्ये भारत जन-विज्ञान जथ्था काढला तेव्हा त्या कार्यक्रमाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. देशभरच्या सर्व राज्यांतील विज्ञान परिषदांचे ते सल्लागार होते. पद्मभूषण, हरी ओम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित होते. २१ डिसेंबर २०१४मध्ये त्यांचे निधन झाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम scientist dr bhalchandra udgaonkar
विज्ञानप्रचारासाठी झटणारे शास्त्रज्ञ


-नीरज पंडित
neeraj.pandit@timesgroup.com

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज