अ‍ॅपशहर

देशाला हादरवणारी घटना: विषारी वायूद्वारे दोन मुलींसह आईची आत्महत्या; सुसाईड नोट समोर

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत घरात प्रवेश करणाऱ्या कुणीही ज्वलनशील पदार्थाचा उपयोग करू नये, त्यातून भडका उडू शकतो, असं नमूद करण्यात आलं होतं.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 23 May 2022, 7:05 am
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीत राहत असलेल्या मध्यमवयीन महिलेने घरात विषारी वायू सोडून दोन मुलींसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. यामध्ये तिघींचाही गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दिल्लीतील उच्चभ्रू अशा वसंत विहार भागात राहत असलेल्या या महिलेने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे हा धडकी भरवणारा प्रकार उघड झाला. मंजू श्रीवास्तव (५५), अंशिका (३०) आणि अंकू (२६) यांचा यामध्ये मृत्यू झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम delhi suicide
दिल्ली सामूहिक आत्महत्या


घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, झरोके हवा रोखण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलने बंद केले होते. त्यामुळे विषारी वायू कोंडून राहिला आणि याबाबत बाहेर कुणालाही माहिती मिळू शकली नाही. यासाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्य ऑनलाइन मागवले होते. गॅस सिलिंडरचे बटन या महिलेले सुरू ठेवले होते. तर कोळश्याचाही धूर केला होता. कोळश्याचा धूर, गॅस आणि कोंडून राहिलेल्या हवेने विषारी वायू तयार होऊन तिघी गुदमरल्या असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिघींचे मृतदेह बेडरूममध्ये आढळून आले तर त्यांच्या बाजूला कोळसा जळत असल्याचे पोलिसांना दिसले. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रवेश करणाऱ्या कुणीही ज्वलनशील पदार्थाचा उपयोग करू नये, त्यातून भडका उडू शकतो, असे नमूद केले होते.

मोदी सरकारच्या निर्णयानंतर राहुल गांधींनी थेट यादीच काढली; खराखुरा दिलासा देण्याची मागणी

'घरात प्रचंड वायू पसरला आहे. कार्बनमोनॉक्साइड भरून राहिला आहे. तो ज्वलनशील आहे. त्यामुळे आधी खिडक्या दारे उघडा, पंखा लावा. त्याशिवाय काडीपेडी, मेणबत्ती पेटवू नका. संपूर्ण घर विषारी वायूने भरले असल्यामुळे काळजी घ्या', अशा सूचना आत्महत्यापूर्व चिठ्ठीत लिहिल्या होत्या. संबंधित महिलेचा पती उमेशचंद्र श्रीवास्तव यांचे गेल्यावर्षी करोनामुळे निधन झाले होते. तेव्हापासून संपूर्ण कुटुंब निराशेत होते. संबंधित महिलाही सतत आजारी असे, अशी माहिती शेजारील रहिवाशांनी पोलिसांना दिली.

महत्वाचे लेख