आर्थिक पॅकेजमध्ये भूमी, कामगार, चलन तरलता आणि कायद्यावर भर देण्यात आला आहे. हे पॅकेज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा मजबूत आधार असलेले कुटीर उद्योग, गृह उद्योग तसेच कोट्यवधींच्या उपजीविकेचे साधन असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आहे... - पंतप्रधान नरेंद्र मोदी
'लॉकडाउन कायम; पण स्वरूप वेगळे'
'करोना दीर्घकाळ जीवनाचे अंग बनेल, असे आता शास्त्रज्ञही म्हणत आहे. पण आमचे जीवन केवळ करोनाच्या अवतीभोवतीच फिरत राहील, असेही आम्ही होऊ देणार नाही. आम्ही मास्क घालू, दोन मीटर अंतराचे पालन करू, पण आपल्या लक्ष्याला दूर होऊ देणार नाही. त्यामुळे लॉकडाउनचा चौथा टप्पा पूर्णपणे नव्या रंगरूपातील आणि नव्या नियमांतील असेल', असे पंतप्रधानांनी जाहीर केले. राज्यांकडून केंद्राला मिळणाऱ्या सूचनांवर आधारित हे चौथे लॉकडाउन असेल. त्याची पूर्ण माहिती १८ मेपूर्वी देण्यात येईल. नियमांचे पालन करून आम्ही करोनाशी लढू आणि पुढेही वाटचाल करू', असा निर्धार पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
जगावर ओढवलेल्या करोना संकटात संधी साधून भारताला आत्मनिर्भर करण्याचे लक्ष्य ठेवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्यासाठी मंगळवारी २० लाख कोटी रु.च्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्याचबरोबर देशव्यापी लॉकडाउन १७ मेनंतरही सुरू राहील; पण त्याचे स्वरूप सर्वस्वी वेगळे असेल, असेही देशवासीयांना संबोधित करताना स्पष्ट केले. आत्मनिर्भरतेला प्रेरित करणारे हे आर्थिक पॅकेज अर्थव्यवस्थेतील सर्वच घटकांसाठी असेल आणि त्याची विस्तृत माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन टप्प्याटप्प्याने जाहीर करतील, असे पंतप्रधान म्हणाले.
मंगळवारी रात्री आठ वाजता देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ३३ मिनिटांच्या भाषणात करोनाग्रस्त झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज आत्मनिर्भर भारत मोहिमेची महत्त्वाची साखळी म्हणून काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अलीकडेच करोना संकटाचा सामना करण्यासाठीच्या आर्थिक घोषणा आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्णयांना या पॅकेजमध्ये जोडण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'सुमारे २० लाख कोटींचे हे आर्थिक पॅकेज भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) सुमारे १० टक्के आहे. हे पॅकेज सन २०२०मध्ये देशाच्या विकास यात्रेला, आत्मनिर्भर भारत मोहिमेला नवी गती प्रदान करेल. देशवासींसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या देशातील श्रमिक, शेतकऱ्यांसाठी हे पॅकेज आहे. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या आणि देशाच्या विकासात हातभार लावणाऱ्या मध्यमवर्गासाठी, भारताच्या आर्थिक सामर्थ्याला शिखरावर पोहोचविण्यासाठी संकल्प करणाऱ्या भारतीय उद्योगजगतासाठी हे पॅकेज आहे', असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (हाच जीवनमंत्र...८)
यांच्यासाठी तरतुदी
'करोनाचे हे संकट एवढे मोठे आहे की त्यामुळे बड्या-बड्या व्यवस्था हादरल्या आहेत. पण याच परिस्थितीत आम्ही देशातील गरिबांच्या संघर्षशक्तीचे दर्शन घडवले आहे. त्यांनी या काळात खूप कष्ट उपसले आहेत. त्यांना ताकद देण्यासाठी गरीब, श्रमिक, स्थलांतरित मजूर, पशुपालक, मच्छिमार, संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आर्थिक पॅकेजमध्ये महत्त्वाच्या तरतुदी करण्यात येत आहेत', असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.