अ‍ॅपशहर

गुन्हे मागे घ्या, नाहीतर इस्लाम स्वीकारू!

आरक्षणाच्या मागणीसाठी जाळपोळ, तोडफोड करून सार्वजनिक व खासगी मालमत्तेचं हजारो कोटींचं नुकसान करणारे हरयाणातील जाट आंदोलक आता कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून सरकारला ब्लॅकमेल करू लागले आहेत. 'आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा इस्लाम धर्म स्वीकारू,' अशी धमकी झज्जर जिल्ह्यातील २०० जाट कुटुंबांनी दिली आहे.

Maharashtra Times 24 Mar 2016, 11:41 am
मटा ऑनलाइन वृत्त । चंदीगड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 200 hundred jat families threaten to convert to islam
गुन्हे मागे घ्या, नाहीतर इस्लाम स्वीकारू!


आरक्षणाच्या मागणीसाठी जाळपोळ, तोडफोड करून सार्वजनिक व खासगी मालमत्तेचं हजारो कोटींचं नुकसान करणारे हरयाणातील जाट आंदोलक आता कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून सरकारला ब्लॅकमेल करू लागले आहेत. 'आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा इस्लाम धर्म स्वीकारू,' अशी धमकी झज्जर जिल्ह्यातील २०० जाट कुटुंबांनी दिली आहे.

सरकारी नोकरी व शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जाट समाजानं केलेल्या हिंसक आंदोलनाची सुरुवात छाडा व माटेन या गांवापासून झाली होती. माटेन गावातील लोकांनी या मुद्द्यावर नंतर माघार घेतली. मात्र, छाडा गावातील तरुणांची आरक्षणाची मागणी कायम होती. या गावातील आठ तरुणांवर हिंसाचार व लुटमारीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून ते सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळं गावकरी संतापले आहेत. येत्या ५ एप्रिलपर्यंत गावातील तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे न घेतल्यास धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी 'छाडा'तील २०० कुटुंबांनी दिली आहे.

या संदर्भात गावकऱ्यांनी २७ मार्च रोजी 'खाप' पंचायत बोलावली आहे. त्यात इस्लाम स्वीकारण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. धर्मांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी छाडातील गावकरी गुरगावातील मौलानांच्या संपर्कात आहेत. गावकऱ्यांनी झज्जरचे पोलीस अधीक्षक जशनदीप सिंह यांच्याशी संपर्क साधून सुरक्षा पुरविण्याची मागणीही केली आहे. सिंह यांनी यास दुजोरा दिला असला तरी गावकऱ्यांनी धर्मांतराचा उल्लेख कुठेही केला नसल्याचं म्हटलं आहे. अखिल भारतीय जाट संघर्ष समितीच्या महिला विभागाच्या प्रमुख विनोद बाला यांनी मात्र गावकऱ्यांचा धर्मांतराचा इशारा खरा असल्याचं म्हटलं आहे. 'आम्हाला त्यांची भूमिका मान्य नाही. मात्र, त्यांचाही नाइलाज आहे. कुणी ऐकतच नसल्यानं निषेध म्हणून धर्म बदलण्याच्या निर्णयाप्रत ते आले आहेत. आम्ही त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहोत,' असं बाला यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज