अ‍ॅपशहर

दलित हल्ल्यांवरून राजकारण पेटले

भाजपशासित गुजरातमध्ये दलित युवकांना झालेली मारहाण आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्याबाबत भाजप नेत्याने काढलेल्या अपशब्दांमुळे विरोधी पक्षांनी भाजपला लक्ष्य केले आहे. दलित अत्याचारांबाबत राज्यसभेत झालेल्या चर्चेत विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडले.

Maharashtra Times 22 Jul 2016, 4:43 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली/उना/लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 arrested in connection with attack on dalits in una rajnath singh tells lok sabha
दलित हल्ल्यांवरून राजकारण पेटले


भाजपशासित गुजरातमध्ये दलित युवकांना झालेली मारहाण आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्याबाबत भाजप नेत्याने काढलेल्या अपशब्दांमुळे विरोधी पक्षांनी भाजपला लक्ष्य केले आहे. दलित अत्याचारांबाबत राज्यसभेत झालेल्या चर्चेत विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडले. तर बसप, समाजवादी पार्टी, काँग्रेस, डावे पक्षांनीही भाजपविरोधात एकी साधत, दलित राजकारणाला हवा देण्याची खेळी केली.

मृत गायीचे कातडे काढणाऱ्या युवकांना गुजरातच्या उनामध्ये झालेल्या मारहाणीबद्दल दलितांमध्ये असलेल्या अस्वस्थतेला विरोधकांनी राज्यसभेत तोंड फोडले. ‘तालिबानी मानसिकतेमुळेच दलितांविरोधातील अत्याचार सतत वाढत आहेत. गोरक्षक संघटनेवर का बंदी घालत नाही’, असा सवाल जेडीयूच्या शरद यादव यांनी केला. त्यांच्या सुरात काँग्रेसनेही सूर मिसळला. ‘दलित अत्याचाराच्या घटना पंतप्रधानांच्या गुजरात मॉडेलचे खरे रूप दर्शवते. गुजरातमध्ये पुढील वर्षी निवडणूक होत असून, या घटनांमुळे पुन्हा जातीय तणाव वाढू शकतो’, असा संशय काँग्रेसच्या अहमद पटेल यांनी व्यक्त केला. ‘जेव्हा जेव्हा दलितांचे प्रश्न उभे ठाकतात, तेव्हा सरकार शब्दांना कृतीची जोड देत नाही’, अशी टीका माकपच्या सिताराम येचुरी यांनी केली. एकीकडे संसदेत भाजपवर टीकेचे प्रहार होत असतानाच, दयाशंकर यांच्याविरोधात लखनऊमध्ये बसप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

गुजरातमधील पीडितांच्या भेटीला राहुल

मृत गायीचे कातडे काढणाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडलेल्या गुजरातच्या सोमनाथ जिल्ह्यातील मोटा गावात जाऊन गुरुवारी राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. ‘ही दोन विचारधारांची लढाई आहे. एकीकडे गांधीजी, बाबासाहेब आहेत. तर दुसरीकडे संघ, गोळवलकर व नरेंद्र मोदी आहेत. पण आम्ही त्यांच्या विचारांचा पराभव करू’, असे राहुल म्हणाले.

दयाशंकर यांची अटक अटळ

मायावती यांच्याविषयी अनुद्गार काढणारे उत्तर प्रदेशचे भाजप उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा शब्द सत्तारूढ समाजवादी पार्टीने दिला आहे. त्यानंतर दयाशंकर गायब झाले असून, त्यांची अटक अटळ मानली जात आहे.

केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर दलितांवरील हल्ल्यांत वाढ झाल्याचा विरोधकांचा आरोप अवास्तव असून, केंद्र सरकार दलितांवरील हल्ले सहन करणार नाही. उना येथील घटनेनंतर गुजरात सरकारने त्वरित कारवाई करत १६ जणांना अटक केली आहे. - राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज