वृत्तसंस्था, लंडन
सन २०००मध्ये गाजलेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कथित सट्टेबाज संजीव चावला याला भारताच्या हवाली करण्याचा निर्णय वेस्टमिन्स्टर न्यायालयाने सोमवारी दिला. या प्रकरणात दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेट कर्णधार हॅन्सी क्रोनिए गुंतला असल्याने मोठी खळबळ उडाली होती. चावलाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाल्याने भारतात आणून त्याच्यावर मॅच फिक्सिंगप्रकरणी खटला चालवणे आता शक्य होणार आहे.
मूळचा दिल्लीचा असलेला संजीव चावला सन १९९६मध्ये व्यावसायिक व्हिसावर ब्रिटनमध्ये जाऊन स्थायिक झाला होता. मात्र, त्याचे भारतात येणे-जाणे होते. सन २०००मध्ये फिक्सिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर चावलाचा पासपोर्ट रद्द करण्यात आला. मात्र, सन २००५मध्ये त्याने ब्रिटिश पासपोर्ट मिळवून तेथील नागरिकत्वही मिळवले. मॅच फिक्सिंग प्रकरणात चावलाने बुकी आणि क्रोनिए यांच्यात मध्यस्थी केल्याचा आरोप आहे.
जून २०१६मध्ये चावलाला लंडनमध्ये अटक झाली होती. हे प्रकरण वेस्टमिन्स्टर न्यायालयात गेल्यानंतर चावला यास भारताच्या ताब्यात देण्याविरोधात निकाल देण्यात आला. मात्र, पुढे हे प्रकरण लंडनच्या उच्च न्यायालयात गेल्यानंतर वेस्टमिन्स्टर न्यायालयाचा आदेश रद्द करून उच्च न्यायालयाने चावलाची प्रत्यार्पण प्रक्रिया नव्याने सुरू करण्याचे आदेश दिले होते. चावलाला तिहारच्या तुरुंगात पूर्णपणे सुरक्षेत ठेवण्यात येईल, असे आश्वासन भारत सरकारकडून तेव्हा दिले गेल्याने उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. त्यानुसार वेस्टमिन्स्टर न्यायालयाने सोमवारी आपला आधीचा आदेश रद्द करून चावला याच्या प्रत्यार्पणचा मार्ग मोकळा केला.
हे प्रकरण आता गृहमंत्री साजिद जावेद यांच्या विचारार्थ पाठवले जाणार असून, त्यांना योग्य वाटल्यास दोन महिन्यांच्या आत जावेद यांना चावलाच्या प्रत्यार्पणाचा आदेश जारी करावा लागणार आहे.