वृत्तसंस्था, चंडीगड
सन १९९९ मध्ये सीमेवरील कारगिल भागात पाक सैनिकांनी केलेली घुसखोरी व तेथील प्रदेशावर काही काळ मिळवलेला कब्जा हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश होते, असा ठपका आजवर ठेवला गेला असताना, 'तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना या घुसखोरीबाबतची पूर्वकल्पना देण्यात आलेली होती', असा दावा रॉ या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख अमरजितसिंह दुलत यांनी केला आहे. कारगिल युद्धाच्या काळात दुलत हे गुप्तचर विभागात कार्यरत होते.
चंडीगड येथे शनिवारी एका कार्यक्रमातील चर्चेदरम्यान दुलत यांनी वरील दावा केला. 'कारगिल परिसरात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती गुप्तचरांच्या माध्यमातून विभागाला मिळालेली होती. ती माहिती तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्यापर्यंत तातडीने पोहोचवण्यात आली होती', असे दुलत यांनी या चर्चेदरम्यान नमूद केले. 'या माहितीला लष्करानेही काही जोडमाहिती दिलेली होती', अशी पुस्ती दुलत यांनी जोडली. 'पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे पाकिस्तानी लष्कराच्या हातचे बाहुले आहे का', असा प्रश्न विचारला असता, 'इम्रान यांचे मूल्यमापन करण्यासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा', असे ते म्हणाले.
'गुप्तचरांकडे सातत्याने विविध प्रकारची माहिती येत असते. अशा माहितीची खातरजमा १०० टक्के करणे निव्वळ अशक्यच असते. अशा माहितीचे आयुष्य अत्यंत कमी असते व तिचा उपयोग मोठ्या हुशारीने करावा लागतो', यावर या कार्यक्रमातील बहुतांश वक्त्यांचे एकमत झाले. 'अनेकदा नको त्या गोष्टींचे खापर गुप्तचरांच्या अपयशावर फोडले जाते. मात्र प्रत्यक्षात ते यंत्रणेचे अपयश असते', अशीही भावना यावेळी व्यक्त झाली.